
प्रकाश पाटील
Mumbai News: शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाला मोठ्या आव्हानांनी घेरलेले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पक्षाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. परंतु, आपल्यातील लढवय्येपणा कमी झालेला नाही, सहकारी पक्ष बरोबर असतील किंवा नसतील तरी ‘महाराष्ट्रकारणा’साठी लढणे थांबविणार नाही, असा संदेश देण्याची वेळ आली आहे.
निवडणुका संपल्या. सत्ताधारी पुन्हा सत्तेवर आले, तर विरोधक आहेत त्याच खुर्च्यांवर बसले. आता पुढील पाच वर्षे महाविकास आघाडीला सरकारविरोधात लढावे लागणार आहे. त्यामध्ये बदललेले असे चित्र सध्या तरी दिसत नाही. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray ) यांची शिवसेना सत्तेवर कधी येणार, हाच प्रश्न आहे. सत्ता येते आणि जाते, पण कधी कधी राजकारणात शहाणपणाने निर्णय घ्यावे लागतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या ‘डेंजर झोन’मध्ये आहे.
राजकारणात यश अपयश येत असते, पण एकदा निर्णय चुकला की त्याचा परिणामही सहन करावा लागतो. उद्धव ठाकरेंना 2014 मध्येच कळले होते की देशात नरेंद्र मोदींची लाट आहे. प्रवाहाविरोधात जाण्याची जी धमक लागते, ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होती. ती उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही. 2024 च्या विधानसभेचे निकाल आणि त्यानंतरची परिस्थिती याचा विचार केला तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) पुढील पाच वर्षांत संघर्ष करावा लागेल, असे दिसते.
केंद्रात मोदी-शहा आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे ते कधीही शिवसेना मोकळे रान देणार नाहीत. केवळ शिवसेनेला नव्हे तर राज ठाकरे यांच्या मनसेलाही लवकर सुगीचे दिवस येतील, असे वाटत नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडे लढवय्या कार्यकर्त्यांची कमतरता आहे. पुन्हा पक्ष बांधणे आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेणे अवघड आहे. विधानसभा (२०२४) निकालानंतर आघाडीचे विश्लेषण जर करायचे असेल तर शिवसेनेने मिळविलेल्या वीस जागाही चांगले यश म्हणावे लागेल. पण हे वीस कसे राहतात.
सभागृहात आणि बाहेरही म्हणजे राज्यात सरकारविरोधात आवाज किती आणि कसा बुलंद करतात, हे काळच ठरवेल. भाजप विरोधात लढणे तसे सोपे नाही. काँग्रेसविरोधात शिवसेनेला लढणे सोप होते. पण भाजपसोबत तसे लढणे सोपे नाही, हे कदाचित उद्धव ठाकरे आणि विशेषतः संजय राऊत यांच्या लक्षात आले असेल.
उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जो हल्लाबोल केला. त्यात आपली भूमिका बदलली नाही, त्याचे स्वागतच करायला हवे. पण एकीकडे पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करताना दुसरीकडे फडणवीस यांच्याविरोधात जी नेहमीची धार होती, ती कमी झाल्याचे दिसते. काही अंशी उद्धव ठाकरेंना वाटते की शिवसेनेला आज ते दिवस आले आहेत, हे भाजपमुळे आले आहेत. याचे स्वागत आहे. कधी बलाढ्य शक्तीविरोधात लढावं लागतं. आज उद्धव ठाकरे लढत आहेत, त्याचे परिणाम काय होतील माहीत नाही, पण उद्धव ठाकरे लढत आहेत. हा संदेश राज्यातील जनतेसमोर गेला आहे. हे नाकारून चालणार नाही.
शिवसेनेला पुन्हा एकदा रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. कार्यकर्त्यांचे संघटनाही महत्त्वाचे आहे. खासदार संजय राऊत यांच्यासह प्रत्येक कार्यकर्ता रस्त्यावर उतरला पाहिजे. जेथे अन्याय तेथे शिवसेना हा जुना मंत्र पुन्हा अंगीकारण्याची खरी गरज आहे. आज राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेवर आहेत.
भाजपच्या ध्येयधोरणांविरोधात फक्त उद्धव ठाकरे लढतील, भले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) बरोबर असले नसले तरी फरक पडत नाही, हा संदेश राज्यातील जनतेला देण्याची गरज आहे, असे वाटते. उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष आजपर्यंत रंग बदलत आली, आता रंग बदलण्याची नव्हे तर लढण्याची वेळ आली आहे, इतकेच.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.