
Bihar Politics : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह इतर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. ही तयारी करत असताना मुख्यमंत्रिपदाची भाजपची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यांच्या नेत्यांकडून सातत्याने हे पद भाजपलाच मिळायला हवी, अशी आठवण विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना करून देत आहे. खरेतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी ती चूक केली नसती तर कदाचित भाजपवर ही वेळ आली नसती.
बिहारमध्ये भाजपला एकदाही मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. नितीश कुमार यांच्यासोबत सत्तेचे स्वप्न साकार झालं असलं तरी पक्षाचा नेता अजूनही सीएमच्या खुर्चीवर बसलेला नाही. ही सल भाजप नेत्यांच्या मनात आहे. याची सुरूवात 2000 साली झाली आहे. वाजपेयी पंतप्रधान असताना 2000 मध्ये बिहारची निवडणूक झाली. त्यावेळी राज्यात विधानसभेच्या 324 जागा होत्या.
नितीश कुमार यांची समता पार्टी, रामविलास पासवान यांचा लोक शक्ती आणि जनता दल आदी पक्ष भाजपसोबत होते. पण सीएम पदाचा चेहरा आणि जागावाटपावरून नितीश कुमारांनी एनडीएतून बाहेर पडत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. राज्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी नितीश कुमारांचे हे पहिले मोठे पाऊल होते.
2000 च्या निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला 124 जागा मिळाल्या. भाजप 67 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर तर नितीश कुमारांचा पक्ष 34 जागांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. निवडणुकीनंतर एनडीए एकजुट झाली, पण त्यांच्याकडे 151 आणि लालूंकडे 159 आमदार सोबत आले. कोणत्याच आघाडीकडे बहुमत नसताना त्यावेळी वाजपेयी आणि अडवाणी यांनी सत्तेचा सारीपाट मांडला आणि नितीश कुमारांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकली.
भाजपमधील सुशीलकुमार मोदी यांच्यासह बड्या नेत्यांना पक्षाने बाजूला करत नितीश कुमार यांना महत्व दिले. नितीश कुमार यावेळी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले होते. पण बहुमत नसल्याने ते परीक्षेला सामोरे जाण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. ते केवळ सात दिवस मुख्यमंत्री होते.
नितीश कुमार सात दिवसांचे मुख्यमंत्री राहिले असले तरी त्यांनी बिहारसह केंद्रातही आपले राजकीय वजन दाखवून दिले होते. वाजपेयी आणि अडवाणी यांनी नितीश कुमारांना झुकते माप देत केलेली चूक पुढे भाजपला चांगलीच महागात पडत गेली. 2005 पर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि नितीश कुमारांनी आपला पक्ष संयुक्त जनता दलामध्ये विलीन केला.
बिहारमधून झारखंड स्वतंत्र राज्य बनल्यानंतर विधानसभेच्या जागा 243 पर्यंत खाल्या आहे. 2005 च्या निवडणुकीत जेडीयूला 88 जागांवर विजय मिळाला. भाजपला मात्र केवळ 55 जागांवर समाधान मानावे लागले. दोन्ही पक्ष एकत्र आले. 2010 च्या निवडणुकीत जेडीयूने तब्बल 115 जागा जिंकल्या. भाजपचीही ताकद वाढली आणि 91 जागा मिळाल्या. तर लालूंच्या पक्षाला केवळ 22 जागा मिळाल्या होत्या.
बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूची विद्यमान आघाडी खूप जूनी आहे. पण त्यावेळची स्थिती आजची स्थिती पूर्णपणे बदलली आहे. सध्याच्या विधानसभेत भाजपला जेडीयूपेक्षा जवळपास दुप्पट जागा आहेत. पण त्यानंतरही नितीश कुमार यांनाच भाजपला मुख्यमंत्री करावे लागले आहे. 2000 मध्येही भाजपने हेच केले होते. सत्तेसाठी नितीश कुमारांना झुकते माप द्यावे लागले होते.
आज 25 वर्षानंतर भाजप पुन्हा याच चक्रव्युहात अडकले आहे. नितीश कुमारांना दुखवून चालणार नाही, याची जाणीव भाजप नेतृत्वाला आहे. पण इतर नेत्यांच्या मनातील मुख्यमंत्रिपदाची सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही. वाजपेयी आणि अडवाणी यांनी त्यावेळी केलेली चूक आता भाजप कशी सुधारणार, की यापुढेही नितीश कुमारांवरच भरवसा ठेवणार, हे पुढील काही दिवसांतच समजेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.