
Bihar Politics : बिहारमधील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पुत्र तेजप्रताप यादव यांना पक्षासह कुटुंबातून बेदखल केले आहे. त्यामुळे तेजप्रताप कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे उत्सुकता वाढली आहे. पण बिहारच्या राजकारणात आणखी एक तरूण चेहरा सध्या देशाचे लक्ष वेधून घेत आहे. ते म्हणजे केंद्रीय मंत्री चिराग पासवान.
देशातील राजकीय हवामानतज्ज्ञ म्हणून चिराग यांचे वडील रामविलास पासवान यांना ओळखले जायचे. राजकीय हवा कोणत्या दिशेला वाहत आहेत, हे पाहून ते आपली राजकीय भूमिका ठरवायचे, असे त्यावेळचे चित्र असायचे. चिराग अद्याप तेवढे प्रगल्भ झाले नसले तरी बिहारच्या राजकारण त्यांनी आपले वजन मात्र चांगलेच वाढवले आहे. ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नसले तरी किंगमेकर होण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी ते स्वत: आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत.
रामविलास पासवान यांच्या 20 वर्षांपूर्वीच्या डावपेचाची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. 2005 मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक ठरली होती. त्यावेळी केंद्रात यूपीएची सत्ता होती. तर पासवान केंद्रीय मंत्री. मात्र, बिहारच्या निवडणुकीत त्यांनी एकला चलोची भूमिका घेतली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे 29 जागांवर विजय मिळवत ते किंगमेकरच्या भूमिकेत आले होते. एनडीए विरुध्द यूपीए अशा झालेल्या या लढतीत एनडीए बहुमताचा जवळ पोहचले होते. पासवान यूपीएला पाठिंबा देतील असे वाटत असतानाच त्यांनी सगळा खेळ बिघडवला.
पासवान यांनी मुस्लिम मुख्यमंत्री असावा, असा हट्ट धरला अन् यूपीएच्या हातून सत्ता गेली. एनडीएने नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली राज्यात अल्पमतातील सरकार स्थापन केले. पण हे सरकार फार काळ टिकले नाही. त्यानंतर काही दिवसांत पून्हा झालेल्या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले. पासवान यांच्या पदरी मात्र निराशा पडली. तेव्हापासून नितीश कुमार आणि सत्ता हे जणू समीकरणच बनले. आता रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग नितीश कुमार यांच्या वाटचालीत अडथळा बनू पाहत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
चिराग हे वडिलांनी 20 वर्षांपूर्वी टाकलेला डावपेच पुन्हा टाकतील की नाही, हे लवकरच समजेल. कारण यावेळी त्यांच्यासमोर किंवा सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. भाजपला राज्यात पक्षाचा पहिला मुख्यमंत्री करायचा आहे. तसे नेते उघडपणे बोलतही आहेत. पण नितीश कुमारांमुळे सध्यातरी ते शक्य होताना दिसत नाही. कमी जागा असूनही नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. आगामी निवडणुकीतही हीच स्थिती राहिल्यास पुन्हा नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्याचा निर्णय भाजपसाठी आत्मघातकी ठरू शकतो. त्यामुळे राज्यात नितीश कुमारांशिवाय सत्ता आणायची असल्यास चिराग यांना ताकद देण्याची खेळी भाजपकडून खेळली जाऊ शकते.
बिहार हेच चिराग यांचे राजकीय मैदान आहे. केंद्रात मंत्रिपद कायम ठेवायचे असेल तर बिहारमधील ताकद त्यांना अधिक वाढवावी लागणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वबळावर नशीब आजमावले होते. पण त्यांना भोपळाही फोडता आला नाही. यावेळी ते स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरून पक्षाला ताकद देण्याची शक्यता आहे. राज्याच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले, यासाठी तर ते नक्कीच हे करणार नाहीत. त्यांना किंगमेकर व्हायचे आहे. बिहारसह केंद्रातही आपली ताकद दाखवून देण्याची ही मोठी संधी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे 20 वर्षांपूर्वी केंद्रात मंत्री असताना वडिलांनी स्वबळाचा नारा दिला होता, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती चिरागही करणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.