
New dehli News : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे या पदावर आता कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच आता भाजपला गेल्या काही वर्षांत भ महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. विशेषतः महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीसारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये महिला मतदारांच्या पाठिंब्यामुळे भाजपने बाजी मारली. त्यामुळे येत्या काळात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महिला नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. हे करीत असताना भाजपने अध्यक्षपदाच्या रुपाने एका दगडात अनेक पक्षांवर निशाणा साधला आहे.
भाजपमधील (BJP) संघटनांनात्मक निवडणुकीमुळे गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड रखडली आहे. त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मुदत संपल्याने या नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरु आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक निवडणुका सुरु आहेत. त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपसाठी दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा ही राज्ये पारंपरिकदृष्ट्या कमजोर गड राहिले आहेत. या मोहीमेमागे या भागात भाजपचे अस्तित्व वाढवणे आणि सत्ताधारी अथवा प्रमुख विरोधी पक्षांचे प्रभाव कमी करणे हे उद्दिष्ट आहे. भाजपने नवा राष्ट्रीय अध्यक्ष दक्षिण भारतातून नेमण्याची रणनीती आखली आहे, तर त्याचा उपयोग अनेक प्रकारे होणार आहे. तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा या सर्व राज्यात प्रदेशात पक्षाची मुळे रुजवणे स्थानिक जनतेशी अधिक चांगली नाळ जुळवणे शक्य होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील महिला नेतृत्वासाठी सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. महिला नेतृत्वाचा प्रतीकात्मक आणि रणनीतिक दोन्ही दृष्टिकोनातून मोठा प्रभाव पडेल, असे संघाचे मत आहे. गेल्या काही वर्षांत भाजपाला महिला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे, विशेषतः महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीसारख्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये. पक्षाच्या महिला केंद्रित योजना आणि लाभार्थी मतपेढीच्या रणनीतीला अधिक बळकट करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
दक्षिणेत प्रभाव वाढवण्यासाठी मोठे पाऊल
त्यामुळे येत्या काळात भाजपने ऐतिहासिक पाऊल टाकत इतिहासात प्रथमच या पदावर महिला नेत्याला संधी देण्याचे ठरवले असल्याचे समजते. हे करीत असताना या पदासाठी इच्छुक असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman), वनथी श्रीनिवासन आणि डी. पुरंदेश्वरी यांच्या नावांची चर्चा आहे. या तीन ही महिला नेत्या या दक्षिणेतील राज्यातील आहेत. येत्या काळात भाजपचा दक्षिणेतील राज्यातील प्रभाव वाढवण्यासाठी मोठे पाऊल मानले जात आहे.
महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू होणार
2029 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून लोकसभेत महिलांसाठी 33 टक्के आरक्षण लागू करण्याची तयारी केंद्र करत आहे. राष्ट्रीय राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी डिझाइन केलेले घटनादुरुस्ती विधेयक, नारी शक्ती वंदन कायदा मंजूर झाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यादृष्टीने भाजपकडून येतंय काळात महिलांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे.
2029 साली मतदारसंघाची पुनर्रचना होणार
2029 साली लोकसभा, विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना होणार आहे. त्यामधील दक्षिणेतील राज्यातील लोकसभेचे मतदारसंघ काम होणार आहेत. त्यामुळे त्याचा परीणाम आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीवर होऊ नये म्हणून आतापासूनच भाजपकडून पावले उचलली जात आहेत. त्यासोबतच दक्षिणेतील राज्यात भाजपचा मोठ्या प्रमाणात विस्तार व्हावा, या दृष्टीने भाजपने तयारी सुरु केली आहे.
येत्या काळात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची संधी दिल्यास भाजप दक्षिण भारतात आपली पकड मजबूत करू शकतो. यासोबतच मोदी सरकारचा महिला सक्षमीकरणाचा संकल्पही यातून पुढे जाईल, असा मतप्रवाह पक्षात आहे. निर्मला सीतारमण यांनी यापूर्वी संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले आहे आणि त्यांना पक्ष संघटनेचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्याचा फायदा येत्या काळात भाजपला होऊ शकतो.
त्याशिवाय डी. (दग्गुबाती) पुरंदेश्वरी यांचे आंध्र प्रदेशच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. पुरंदेश्वरी आंध्र प्रदेशमधून खासदार आहेत आणि त्यांनी राज्यात भाजपचे अध्यक्षपदही सांभाळले आहे. पुरंदेश्वरी या सुषमा स्वराज यांच्यासारख्या प्रभावी वक्त्या मानल्या जातात. त्यांनी दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांमध्ये यशस्वी कारकीर्द गाजवली आहे. त्या तेलुगू, तामिळ, हिंदी, इंग्रजी आणि फ्रेंच भाषांमध्ये पारंगत आहेत. जुलै २०२३ मध्ये त्यांची आंध्र प्रदेशमध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि अलीकडेपर्यंत त्या या पदावर होत्या. पुरंदेश्वरी यांना विविध देशांमध्ये गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळासाठी निवडण्यात आले होते. त्यांनी परदेशात जाऊन पाकिस्तानचा पर्दाफाश केला. दक्षिण भारतात त्या पक्षाचा मोठा चेहरा बनू शकतात. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.
तामिळनाडू विधानसभेत कोयंबटूर दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वनथी श्रीनिवासन या एक प्रसिद्ध वकील आहेत. 1993 मध्ये त्या भाजपमध्ये सक्रिय झाल्या आणि तेव्हापासून त्यांनी पक्षात अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवली. वनथी यांनी तामिळनाडू भाजपमध्ये राज्य सचिव , महासचिव आणि राज्य उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये वनथी यांची भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यांची भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीवर सदस्य म्हणून निवड झाली. वनथी श्रीनिवासन या कायदेविषयक तज्ज्ञआहेत. महिला सक्षमीकरण, संघटनात्मक मजबूती आणि विधानमंडळातील सक्रिय भूमिकेमुळे त्यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांचे नाव देखील चर्चेत आहे.
दक्षिणेतील राज्याची चिंता
लोकसंख्या नियंत्रणात ऐतिहासिकदृष्ट्या चांगली कामगिरी करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांनी चिंता व्यक्त केली आहे की सध्याच्या लोकसंख्येच्या आकडेवारीवर आधारित नवीन सीमांकनामुळे संसदेतील त्यांचे प्रतिनिधित्व कमी होऊ शकते. सरकारी सूत्रांनुसार, त्यांच्या चिंता गांभीर्याने घेतल्या जात आहेत. दक्षिणेकडील राज्यांच्या राजकीय सहभागाशी तडजोड केली जाणार नाही. प्रतिनिधित्व समान राहील आणि लोकसंख्या नियंत्रणात यशस्वी झालेली राज्ये नवीन जागा वाटप सूत्रात वंचित राहणार नाहीत, याची खात्री करण्यासाठी यंत्रणांचा विचार केला जात आहे.
प्रादेशिक पक्षांचा प्रभाव कमी करण्याचा भाजपचा डाव
त्याशिवाय येत्या काळात भाजपला कमजोर असलेल्या दक्षिण भारतात आपली पकड मजबूत करण्याची संधी या निमित्ताने चालून आली आहे. येत्या काळात राष्ट्रीय अध्यक्षपदाचा वापर करून भाजप अनेक गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला दक्षिणेत आव्हान देण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्याशिवाय या राज्यात स्थानिक प्रादेशिक पक्षांचा प्रभाव आहे. त्यामध्ये डीएमके, तेलगू देसम पक्ष, बीआरएस, वायएसआर काँग्रेस या पक्षाचा प्रभाव कमी करण्याचा भाजपचा डाव आहे.
संघटनात्मक संतुलन राखण्याचा प्रयत्न
येत्या काळात ओबीसी, दलित किंवा इतर मागासवर्गीय गटांमध्ये प्रभाव टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. उत्तर भारतातील ब्राह्मण, ठाकूर, बनिया नेतृत्वाच्या तुलनेत दक्षिण भारतातील ओबीसी, एससी नेतृत्व पुढे आणून संघटनात्मक संतुलन राखण्याचा प्रयत्न आहे. भाजपने ही रणनीती 2026-2029 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन आखलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.