
New Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजय मिळवण्यासाठी आम आदमी पक्षाने जोर लावला आहे. तर भाजपनेही आपचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. यामध्ये काँग्रेसही मागे नाही. मात्र, या निवडणुकीत कोण जिंकणार, आप की भाजप? यावर राजकीय वर्तुळात चर्चा झडत आहेत. या रेसमध्ये काँग्रेस सध्यातरी कुठेच दिसत नाही. या निवडणुकीत पाच मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत. त्यावरच जय-पराजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपने त्यांच्याविरोधात मोहित उघडत खूप आधीपासून भ्रष्टाचार आणि दिल्लीतील पायाभूत सुविधांचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. त्यामुळे केजरीवाल काहीसे अडचणीत आले आहेत. पण त्याचा फायदा भाजपला कितपत होणार, हाही चर्चेचा मुद्दा आहे.
दिल्लीमध्ये जवळपास 20 टक्के मतदार दलित आहेत. बहुतेकांचे वास्तव्य झोपडपट्टीमध्ये आहे. हा मतदार आतापर्यंत आपच्या मागे उभा राहिला आहे. पण या निवडणुकीत मतांचे विभाजन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही मते काँग्रेस आणि काही भाजपच्या बाजूनेही झुकू शकतात. त्याचा फटका काही मतदारसंघात आपच्या उमेदवारांना बसेल.
दुसरा महत्वाचा फॅक्टर म्हणजे मुस्लिम मतदार. हे प्रमाण 13 टक्के असून मागील दोन निवडणुकीत या मतदारांनी आपला मोठी साथ दिली आहे. या निवडणुकीतही मतदार अरविंद केजरीवालांच्या मागे खंबीरपणे उभे राहू शकतात. काँग्रेसने प्रचारात जोर लावला असला तरी त्याचा फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसते. भाजपपासून हा मतदार कोसो दूर असल्याचे चित्र आहे.
या निवडणुकीत मध्यमवर्गीय मतदार टर्निंग पॉईंट ठरू शकतात. त्यावरच भाजपचे गणित अवलंबून आहे. हे मतदान जवळपास 40 टक्के असून भाजपला अधिकाधिक मते मिळण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात मध्यमवर्गींना प्राप्तिकरात मोठी सवलत मिळालयाने भाजपसाठी हा बोनस ठरेल, असा अंदाज आहे. दिल्लीतील पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांवरही हा वर्ग भाजपला साथ देऊ शकतो.
मोफतच्या रेवडीचा मुद्दाही निवडणुकीत महत्वाचा मानला जात आहे. आपसह भाजप आणि काँग्रेसने महिला, तरुण आणि इतरांना अनेक आश्वासने दिली आहेत. दर महिन्याला त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या योजना तयार करण्यात आलल्या आहेत. हा मुद्दा निवडणुकीत किती चालणार, यावरही मतदानाचे गणित अवलंबून आहे. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली होती.
सर्वात महत्वाचा आणि पाचवा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा. दिल्लीतील मतदार पुन्हा एकदा केजरीवालांवर विश्वास दाखवणार की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर भाजपला मतदान देणार, हे पाहावे लागेल. मोदींकडून या निवडणुकीत एकदा भाजपला संधी देण्याचे आवाहन केले जात आहे. भाजपसह काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहिर केलेला नाही.
दलित आणि मुस्लिम मतदार आपच्या मागे उभे राहिल्यास पुन्हा एकदा 50 हून अधिक जागा जिंकण्याची पक्षाला संधी असेल. पण जर मध्यमवर्गियांनी साथ सोडली तर भाजपला हरियाणा आणि महाराष्ट्राप्रमाणे मोठा विजय मिळू शकतो. त्यामुळे सर्व पक्षांनी या गटातील मतदारांवर आपले लक्ष केंद्रित करत अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. पण प्रत्यक्ष मतदान कुणाच्या पारड्यात पडणार हे 8 फेब्रुवारीलाच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.