
Mumbai News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाची मालिका गेल्या काही दिवसापासूनच सुरू आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढू लागला आहे. त्यातच वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांना देखभाल करण्यासाठी दोन लाख रुपये देण्याचे आदेश दिले. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात गेले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी आता स्वपक्षातूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याने त्यात भर पडली आहे.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. गेल्या दोन महिन्यापासून या हत्या प्रकरणाचा तपास सुरु असून या प्रकरणांतील आठ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकारणातील एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलीस यंत्रणेकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाशी गेल्या काही दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा संबंध जोडला जात असल्याने त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सत्ताधारी महायुतीमधील आमदारासह विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंडे यांचा राजनीमा घ्यावा, अशी मागणी लावून धरली आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेतेमंडळीने राज्यपालांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती देत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप आमदार सुरेश धस, शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, अजित पवार गटाचे आमदार प्रकाश साळुंखे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
या प्रकरणाशी मुंडे यांचा संबंध जोडला जात असल्याने राज्य सरकारची बदनाम होऊ लागली आहे, अशी भावना कार्यकर्त्यातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता पक्षाचे हित लक्षात घेता व नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला जावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातूनच अजित पवार यांच्याकडे मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, या साठी दबाव वाढवला जात आहे. तर राज्यातील भाजप नेत्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर टीकेची झोड उठवली असतानाच काही जणांकडून वाल्मिक कराडची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडेंनी मंत्रिपद सोडावे, अशी मागणी होत आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहेत, त्यांना कठोर शिक्षा व्हावी. त्यांचा खटला फास्टट्रॅकवर चालवावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून राहिली आहे. त्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, ते आमच्या पक्षाशी निगडीत असतील, तर त्यांच्यावर नक्कीच निलंबन केले जाईल. आता या प्रकरणाची चौकशी तीन फेजमध्ये चालू आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांकडून चौकशी सुरु आहे. एसआयटी चौकशी करत आहे. त्यासोबचत सीआयडी चौकशी करत आहे. या चौकशींती धनंजय मुंडे दोषी आढळले, तर त्यांच्यावर कारवाई होईल. परंतु, त्यांचा अद्याप या घटनेशी संबंध दिसून आलेला नाही, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत कृषी खात्याच्या कारभारात भ्रष्टचार झाला असल्याचा आरोप केला आहे. मुंडे यांनी बॅग खरेदी प्रकरणात 41 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर मुंडे यांनी कृषी मंत्री असताना डीबीटीच्या माध्यमातून पैसे देण्याचे आदेश काढले होते. मात्र, याप्रकरणी मोठा भ्रष्टाचार झाला असून मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी काही पुरावे देखील दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसातील हा सर्व घटनाक्रम पाहता मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवरील दबाव वाढत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे येत्या काळात या प्रकरणी सरकारकडून काय पावले उचलली जाणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.