
Mumbai News : राज्यात महायुती सरकार सत्तेत येऊन चार महिने झाले आहेत. या सरकारकडे मोठे बहुमत असल्याने सध्या तरी स्थिर आहे. मात्र, महायुतीमध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन घटक पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या काळात तीन पक्ष एकत्रित राहणे महत्त्वाचे आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून महायुतीमधील नाराजी उघडपणे जाणवत आहे.
सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे नाराज आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असे समीकरण जाणवत आहे. ते समीकरण सत्तास्थापन होऊन चार महिने झाले तरी प्रकर्षाने जाणवत आहे. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी हे सूक्ष्म पण लक्षवेधी राजकीय समीकरण स्पष्टपणे जाणवत होता.
महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातच मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज होते. या नाराजीतूनच ते काहीकाळ सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या गावी गेले होते. त्यानंतर शिंदेंची नाराजी दूर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महायुतीमध्ये भाजपनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे संख्याबळ आहे. त्यामुळे संख्याबळानुसार मंत्रीपदे मिळवीत यासाठी अजित पवार विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद पाहवयास मिळाला.
यावरही तोडगा काढण्यात आला त्यानंतर या तीनही पक्षात मलईदार खात्यावरून रस्सीखेच पाहवयास मिळाली. त्यानंतरही भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात सत्ता वाटपावरून स्पष्ट संघर्ष दिसला. विशेषतः रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गेल्या तीन महिन्यापासून स्थगिती दिली आहे. यावरून तीनही पक्ष आमने-सामने आले आहेत.
सत्तास्थापनेनंतर शिंदे गटाचे आमदार वारंवार नाराजी दर्शवतात की, त्यांना राज्य सरकारमध्ये अपेक्षित वजन मिळत नाही. विशेषतः त्यांना निधी योग्य प्रकारे मिळत नसल्याने मतदारसंघात नाराजीला सामोरे जावे लागते, अशी त्यांची तक्रार आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसापासून अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेतील वाटा वाढवण्याच्या प्रयत्नात आहे, त्यामुळे शिंदे गट अस्वस्थ दिसत आहे.
महायुती सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या अनेक राजकीय कार्यक्रमातील उपस्थितीत फरक जाणवत आहे. अनेक वेळा भाजप व अजित पवार गटाचे कार्यक्रम एकत्र दिसतात, तर शिंदे गट वेगळा दिसतो. हा सर्व घटनाक्रम जाणवतो. यासर्व बाबीमुळे माध्यमांमध्ये यावरून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
दुसरीकडे महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्रित असले तरी त्यांना स्वतःचे पक्ष वाढविण्याचा पूर्ण अधिकार आहे.त्यामध्ये भाजप मोठा भाग ठेवू पाहत आहे, तर शिंदे आणि अजित पवार दोघेही आपापली ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. फडणवीस हे स्पष्टपणे पहिल्या क्रमांकाचे नेतृत्व म्हणून राहिले आहेत, परंतु एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच आहे.
निधीवाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे गट नाराज आहे. अजित पवार यांच्या अर्थखात्याकडून कमी प्रमाणात निधी दिला जात असल्याने शिंदे गटाचे आमदार वारंवार तक्रार करतात की त्यांच्या मतदारसंघांना अपेक्षित निधी मिळत नाही. काही आमदारांनी तर थेट माध्यमांमध्ये किंवा पक्षांतर्गत बैठकीत ही नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः अजित पवार गटाच्या आमदारांना अधिक निधी दिला जातो, असा आरोप शिंदे गटाकडून होतो.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेले काही निर्णय किंवा मंजूर केलेल्या योजना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाने स्थगित केल्या आहेत. यामुळे शिंदे गटात नाराजी आहे. आमच्या निर्णयांना मान्यता दिली जात नाही, अशी भावना निर्माण झाली आहे.अनेक शिंदे गटाचे आमदार ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपलिका यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीबाबतही नाराजी व्यक्त करत आहेत. त्यांच्या मते, त्यांच्या भागात विकासकामं थांबली आहेत आणि निधी वेळेवर मिळत नाही.
अजित पवार हे उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री या दोन्ही भूमिकांमध्ये अत्यंत 'कडक' नियंत्रण ठेवतात. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मंजूर होणारी कामेही अनेकदा 'पुनर्विचारासाठी' परत पाठवली जातात, जे शिंदे गटाच्या आमदारांना अपमानास्पद वाटते. शिंदे गटाने शिवसेना फोडून सत्ता आणली आहे, त्यामुळेच ते आधीच सर्व बाबतीत राजकीय हिशोब लावत असतात. त्यातच निधी मिळत नसल्याने किंवा त्यांच्या निर्णयांना स्थगिती दिल्याने त्यांची असुरक्षितता अधिक वाढली आहे.
निधीवाटप आणि निर्णय स्थगितीचे हे मुद्दे शिंदे गटाच्या अंतर्गत अस्वस्थतेचे प्रमुख कारण आहेत. जर ही नाराजी वेळेत हाताळली गेली नाही, तर याचा परिणाम आगामी काळात महायुतीच्या संबंधावर होऊ शकतो. निधी वाटपावरूनच शिवसेना शिंदे गट महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडला होता, हे विसरून चालणार नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच राज्याच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यावेळी महायुतीमधील तीन ही घटक पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एका मंचावर सहज आणि सहज संवाद साधताना दिसले, तर शिंदे थोडेसे एकाकी वाटले. काही बैठकींमध्ये शिंदेंना फारसा सहभागही दिसला नाही. त्याचवेळी रायगडावर सुरवातीला डावलून एकनाथ शिंदेंना अचानक भाषणाची संधी देण्यात आली, या सर्व घटनाक्रमावरून महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे जाणवत आहे.
त्यासोबतच अमित शाह यांच्या तीन दिवसीय दौऱ्यावेळी पुण्यातील मुक्कामी एकनाथ शिंदे, फडणवीस, अजितदादा एकत्र बैठकीला होते. त्यानंतर मुंबईत शिंदे दोनवेळा एकटेच अमित शाह यांना भेटले. तर दुसरीकडे रायगड व नाशिकमधील पालकमंत्री पदाचा वाद सुरु असताना अजितदादांनी शाह यांना सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी घेऊन गेले. या स्नेहभोजनावरून वेगळीच चर्चा रंगली असून रायगडमध्ये भाजपने भरत गोगावले यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याने शिंदे बॅकफुटावर गेले असल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे हा पालकमंत्री पदाचा वाद न सोडवता शिंदे व अजितदादा यांच्यातील वादाला भाजपकडून खतपाणी घातले जात असल्याचे शिंदे गटाच्या नेत्याने सांगितले. दरम्यान, फडणवीस व अजितदादांकडून नेहमीच शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, आता यावर अमित शाह यांच्याकडुन काही तोडगा काढला जाणार का? याची उत्सुकता सर्वाना लागली आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.