Jaydatta Kshirsagar : जयदत्त क्षीरसागरांची राजकीय हतबलता की चाचपणी? 35 वर्षांत पहिल्यांदाच...

Jaydatta Kshirsagar and Beed Politics : एकेकाळी जयदत्त क्षीरसागर राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांमधील एक.
Jaydatta Kshirsagar
Jaydatta KshirsagarSarkarnama

Beed Loksabha Election News : ३५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत प्रत्येक निवडणुकांत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि अगदी स्वपक्षाच्या उमेदवाराबाबत प्रचारसभेत ‘तुम्ही मुंडकं हत्यार दिलं आणि लढ’ म्हणता अशी ठोस भूमिका घेणारे जयदत्त क्षीरसागर या निवडणूक प्रक्रियेच्या परिघापासून दूर आहेत. त्यांची ही राजकीय हतबलता म्हणायची की चाचपणी, असा प्रश्न असला तरी क्षीरसागर भूमिकेविना असे प्रथमच घडत आहे.

ही निवडणूक भाजपच्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे यांच्यात अगदी अटीतटीची होत आहे. दिवंगत लोकनेत्या केशरबाई क्षीरसागर यांचा राजकीय वारसा चालविणारे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर(Jaydatta Kshirsagar) जिल्हा परिषद सदस्य, आमदार, उपमंत्री आणि राज्याच्या विविध खात्यांचे कॅबीनेटमंत्री असा राजकीय प्रवास करणारे. जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे असलेल्या क्षीरसागरांची राजकीय भूमिका आष्टीत धोंडे तर गेवराईत बदामराव पंडितांना आणि बीडमध्ये सय्यद सलिमांना आमदारकीच्या खुर्चीवर पोचविण्यास मदत करणारी ठरली.

स्वत: देखील जुना चौसाळा (आताचा केज) व बीड अशा दोन विधानसभा मतदार संघातून विजयाची क्षमता ठेवून होते. एकेकाळी जयदत्त क्षीरसागर राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांमधील एक. जिल्ह्याच्या प्रत्येक विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर एक तर रिंगणात किंवा प्रक्रीयेच्या पहिल्या फळीत असे समिकरणच होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jaydatta Kshirsagar
Loksabha Election : इंडिया आघाडी सत्तेत आली तर 'मिशन कॅन्सल', पंतप्रधान मोदींनी सांगितला 'इंडी'चा प्लॅन

राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेनंतर 2004 साली पक्षाला जयसिंगराव गायकवाड यांच्या रुपाने मिळालेल्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तर, 1999 सालच्या निवडणुकीत पक्षाकडून उभे असलेल्या अशोक पाटील यांच्या प्रचारासाठी आलेल्या शरद पवार(Sharad Pawar) यांच्या सभेतच ‘साहेब तुम्ही आम्हाला मुंडकं हत्यार दिलं आणि लढा म्हणताय’, असे भाषणात म्हणण्याचे धारिष्ट्य देखील जयदत्त क्षीरसागर यांच्यामध्येच.

दरम्यान, दहा वर्षांपासून त्यांच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची सुरुवात झाली. राष्ट्रवादीत असताना क्षीरसागर मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री होते. मात्र, ते शरद पवार व भुजबळ यांच्या जवळचे मानले जात असल्याने अजित पवार गट कायम त्यांच्या विरोधात असे. पालकमंत्री असूनही बीड मतदार संघ सोडता जिल्ह्यातील इतर मतदार संघाचे निर्णय वरिष्ठ पातळीवरुच होत. धनंजय मुंडे पक्षात आल्यानंतर क्षीरसागरांचे खच्चीकरण झाले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून पक्षाचे एकमेव जयदत्त क्षीरसागर विजयी झाले. पंरतु, त्या काळात त्यांनीही आपला राबता भाजप नेत्यांशीच अधिक ठेवला. त्या काळी पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या. त्यांच्याशी बंड केलेले पुतणे संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीतल्या नेत्यांकडूनच बळ दिले गेल्याने 2019च्या लोकसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीत असतानाही थेट भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांचा प्रचार केला.

Jaydatta Kshirsagar
Lok Sabha Election 2024: विरोधकांची लंका खाक करून तुतारीची पिपाणी होणार, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

मात्र, त्यांना भाजप ऐवजी शिवसेनेत प्रवेश करावा लागला. एकाच म्यानात दोन तलवारी (पंकजा मुंडे(Pankaja Munde) व जयदत्त क्षीरसागर दोघेही ओबीसी नेते असल्याने क्षीरसागर भाजपात नको होते) नको म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना शिवसेनेची दारे उघडून दिली. मात्र, विधानसभेला त्यांना पुतण्याकडूनच पराभवाचे तोंड पाहावे लागले. या पराभवात भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपली ताकद लावल्याचे लपून नाही. शिवसेनेनेही त्यांना वर्षभरापूर्वी पक्षातून काढले. पक्षाविना असलेले क्षीरसागर भाजपात प्रवेशासाठी मधल्या काळातही प्रयत्नशील होते. परंतु, पुन्हा ‘एका म्यानात दोन तलवारी’ या समीकरणामुळे त्यांचा प्रवेश झालाच नाही.

Jaydatta Kshirsagar
Amit Deshmukh News : लातुरात विजयाचा अमित देशमुखांना विश्वास, म्हणाले 'आपण नक्कीच..'!

आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सत्ता व सर्व बडे नेते भाजपसोबत आहेत. एक आमदार आणि माजी आमदारांची फळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहे. मात्र, कायम हुकमी राजकीय भुमिका असणारे जयदत्त क्षीरसागर मात्र शांत आहे. त्यांनी यासाठी बैठक व मेळावा घेतला. पंरतु, भूमिका जाहीर केली नाही. मागच्या लोकसभेची भूमिका आणि विधानसभेतील परतफेड याचाही उहापोह या बैठकीत समर्थकांनी केला. आता निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. भविष्याचे राजकारण पाहता क्षीरसागरांना अशी ‘मध्य’ किंवा ‘शांत’ भूमिका खरंच परवडणारी ठरेल का? हे पहावे लागेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com