
भारतामध्ये हिंदी भाषेवरून प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये नेहमीच राजकारण रंगते. दक्षिणेकडील भाजपविरोधी पक्षातील सर्वच नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून हिंदीला कडाडून विरोध केला जातो. हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा नसल्याचे सांगताना त्यांना थकत नाहीत. त्यामुळे उत्तर आणि दक्षिण असा वाद नेहमीच सुरू असतो. पण परदेशात मात्र चित्र वेगळे असते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांनी स्पेनमध्ये दिलेले उत्तर.
ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेली शिष्टमंडळे जगभरात पाठविली आहेत. दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका आणि पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचे काम ही शिष्टमंडळे करत आहेत. त्यापैकी एका शिष्टमंडळात कनिमोळी यांचा समावेश आहे. सोमवारी हे शिष्टमंडळ स्पेनमध्ये होते. यावेळी भारताची राष्ट्रीय भाषा कोणती असावी?, असा प्रश्न कनिमोळी यांना विचारण्यात आला.
प्रवासी भारतीयांसमोर कनिमोळी यांनी दिलेल्या उत्तरानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तिथे असते तर त्यांनीही या उत्तराचे कौतुक करत नक्कीच टाळ्या वाजवल्या असत्या. त्यांनी उत्तर दिले की, ‘मला वाटते भारताची राष्ट्रीय भाषा अनेकतेत एकता आहे. हाच संदेश आम्ही जगासमोर घेऊन आलो आहोत.’ या उत्तरानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.
काय होतेय चर्चा?
कनिमोळी यांनी दिलेल्या या उत्तराची सध्या जोरदार चर्चा होत आहे. त्यामागे कारणही मोठं आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये त्रिभाषा धोरण स्वीकारण्यात आले आहे. त्याला कनिमोळी यांच्या पक्षाची सत्ता असलेल्या तमिळनाडू सरकारने आव्हान दिले आहे. त्रिभाषा धोरण गैरहिंदी भाषिक राज्यांवर थोपवले जात असल्याचा आरोप डीएमके सरकारकडून केला जात आहे. तमिळ अस्मिता आणि द्विभाषिक धोरण अवलंबणाऱ्या डीएमकेच्या नेत्यांकडून यावरून मोदी-शहांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे.
तमिळनाडूप्रमाणेच कर्नाटक, तेलंगणा, केरळ या दक्षिणेतील राज्यांमध्येही त्रिभाषिक धोरणाला विरोध होत आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रातही शिक्षणामध्ये हिंदी बंधनकारक करण्याच्या निर्णयाला प्रखर विरोध झाला होता. त्यानंतर सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला. पण महाराष्ट्रात हिंदीचा मुद्दा फारसा पेटला नाही. दक्षिणेत मात्र ही अस्मितेची लढाई बनली आहे. त्याच राज्यांतील एका सत्ताधारी पक्षाच्या महिला खासदारने परदेशात राष्ट्रीय भाषेच्या मुद्द्यावर दिलेल्या उत्तराने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.
भारतामध्ये शेकडो भाषा बोलल्या जातात. काही भाषा अलिप्त होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यांची संस्कृती, तेथील सण-उत्सव, बोली भाषा, वेशभूषा, विविध जाती-धर्म असे अनेक बाबतीत वैविध्य आहे. त्यामुळे संपूर्ण जगाला भारताचे आकर्षण आहे. याबाबत देशांतर्गत काही वादविवाद होत असतात. राजकीय पक्षांतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप होतात. पण परदेशात कनिमोझी यांनी दिलेल्या उत्तराने ‘हम सब एक है’चा संदेश जगभरात पोहचला आहे. भारतातही हाच संदेश राज्या-राज्यांत, गावागावांत पोहचायला हवा. जात, धर्म, भाषेबाबत अस्मिता असावी, पण टोकाची नको. राष्ट्रहितासमोर सर्व नगण्य आहे. जिथे राष्ट्रहित तिथे अखंडता अन् एकता ही एकच भाषा, हा एकच धर्म असायला हवा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.