Maharashtra Politics : राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी आता खरेच 'चव' सोडली...?

Latest Maharashtra Politics : राजकारण नको रे बाबा, अशी स्थिती समाजात निर्माण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या भावनेला बळ देणाऱ्या अनेक घटना घडत आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama

Lok Sabha Election 2024 : राजकारणाबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही. ते आपले काम नाही, असे साध्या, सरळ स्वभावाची माणसे नेहमी बोलत असतात. राजकीय नेत्यांच्या नादी लागून अमका वाया गेला, हे ग्रामीण भागात सातत्याने कानावर पडणारे वाक्य आहे. त्यामुळे आपल्या मुलांनी शिकून सवरून चांगल्या नोकरीला लागावे, अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे राजकारण नको रे बाबा, अशी स्थिती समाजात निर्माण झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या भावनेला बळ देणाऱ्या अनेक घटना घडत आहेत.

एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की अमक्याने चव सोडली, असे बोलले जाते. सध्याचे राजकारण आणि काही नेत्यांची पक्षांतरे उबग आणणारी आहेत. काही राजकीय नेत्यांनी चव सोडली आहे का, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित केला जात आहे. पक्षांतर करायला आता कोणतेही कारण पुरेसे ठरू लागला आहे. अशा फुटकळ पक्षांतरांना प्रोत्साहन देऊन मोठ्या पक्षांचे नेतेही राजकारणावरील लोकांचा विश्वास आणखी कमी करण्यास हातभार लावत आहेत. 'तुमचा नेता त्याच पक्षात आहे ना, याची दर तासाला चौकशी करा आणि मगच प्रचाराला लागा,' असे उपहासात्मक संदेश समाजमाध्यमांत फिरत आहेत. ते साधार आहेत. दररोज पक्षांतरे घडत आहेत. आज इकडे तर उद्या तिकडे, अशी अवस्था काही नेत्यांची झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या पाच वर्षांत 'होलसेल'मध्ये पक्षांतरे झाली आहेत. अख्खे पक्ष फुटले आहेत. सत्तेची सर्व पदे उपभोगलेल्या दिग्गज नेत्यांनाही आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. अशा पक्षांतरांसमोर आता निवडणुकीच्या मध्यात होत असलेली पक्षांतरे किरकोळ वाटावी अशी असली तरी उबग आणणारी मात्र नक्कीच आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात अशा घडामोडी सध्या वाढल्या आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे ShivsenaUBT गटाच्या वैशाली दरेकर यांचे आव्हान आहे. वातावरण निर्मितीसाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी बुधवारी शिंदे गटात प्रवेश केला होता.

Maharashtra Politics
Chitra wagh News : ठाकरेंच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारनं केला अभिनय, वाघ यांचा आरोप; तीन 'P' चा उल्लेख करत केला घणाघात

ठाकरे गटाचे कल्याणमधील माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांचा बुधवारी शिंदे गटात प्रवेश झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी ते ठाकरे गटात परत आले. वैयक्तिक कामासाठी ते मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा शिंदे गटात प्रवेश करून घेण्यात आला, असे आता ते सांगत आहेत. याबाबत पुरुषोत्तम चव्हाण यांनी सांगितले, की मी अपात्र ठरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मोठी मदत केली होती. त्यांच्यासोबत माझा चांगले संबध आहेत. त्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी तेथे डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरू होती. त्याचवेळी माझ्याही हातात झेंडा देऊन प्रवेश करण्यात आला.

चव्हाण यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गटाला धक्का बसला होता. आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांच्या कार्यालयातून फोन येत असून, त्यांना आमिषे दाखवली जात आहेत, असा आरोप ठाकरे गटातील नेते विजय साळवी यांनी या प्रकारानंतर केला होता. आता चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला असला तरी, असे कुणी अचानक, भेटायला गेल्यानंतर पक्षात प्रवेश करून घेतो का, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. कल्याण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यापासून वेगळे झालेले आहत. या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

पक्षांतरासाठी आता ठोस, धोरणात्मक कारणच असले पाहिजे असे नाही. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मर्जी राखताना पक्षप्रमुखांच्या नाकीनऊ येत आहेत. गटबाजी दूर करताना त्यांची दमछाक होत आहे. असे असले तरी कुठे ना कुठे एखादा पदाधिकारी नाराज होतोच आणि तो बाहेरची वाट धरतो आहे. पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच सभा झाली. ही सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या घरी भोजनासाठी जाणार होते. त्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र मुख्यमंत्री भानगिरे यांच्या घरी भोजनासाठी जाऊ शकले नाहीत.

मुख्यमंत्री मुद्दाम भानगिरे यांच्या घरी गेले नाहीत, असा संदेश त्यामुळे गेला. यामुळे भानगिरे आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले असून, त्यांनी पक्ष बदलण्याची तयारी केली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. याबाबत भानगिरे यांचे समर्थक लवकरच बैठक घेणार असून, पक्षबदलाचा निर्णय घेणार आहेत. अशा प्रकारांमुळे नेते, पदाधिकाऱ्यांच्या निष्ठेबाबत लोकांमध्ये शंका निर्माण होऊ लागली आहे. राजकारणात संयम संपत चालला आहे. सर्वकाही आपल्याच मनासारखे व्हावे, असे प्रत्येकाला वाटत आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होणे शक्य नसते. त्यामुळे लोकांना उबग यावा, असे प्रकार राजकारण्यांकडून घडत आहेत.

Maharashtra Politics
Belgaum Lok sabha Constituency : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्यापुढे भाजपचा बालेकिल्ला वाचविण्याचे आव्हान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com