Nashik Ministers : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठी घडामोड घडली आहे. ती म्हणजे महायुती सरकारने अनेक दिवसांपासून मंत्रिपदापासून लांब ठेवलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे एकूण तीन मंत्री झाले आहेत. यामध्ये राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आणि त्यानंतर आता जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यात देखील मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे.
भुजबळांना कोणतं खातं मिळणार हे अद्याप निश्चित झालं नसलं तरी त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेले अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार भुजबळ यांना दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता या जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचं पारडं जड झाल्याचं पाहायला मिळत आहे.
एकीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जिल्ह्यात तीन मंत्रिपदे मिळाल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असली तरी जिल्ह्याला एकूण चार मंत्रिपदे मिळाल्याने जिल्ह्याची ताकद देखील आपसूक वाढली आहे. राष्ट्रवादीचे तीन आणि शिंदेंच्या शिवसेनेचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील नाशिकचेच आहेत.
त्यामुळे महायुती सरकारमध्ये सध्या नाशिक जिल्ह्यातील एकूण चार मंत्री असल्याने या जिल्ह्याचा दबदबा निर्माण झाला आहे. नाशिकप्रमाणेच सातारा जिल्ह्याच्या वाट्याला एकूण चार मंत्रीपदं आली आहेत. त्यामुळे महायुती सरकारमध्ये पुढील पाच वर्षे नाशिक आणि सातारा जिल्ह्याचा दबदबा असणार हे निर्विवाद आहे.
राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर साताऱ्यातील आठपैकी चार आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली. या चारही मंत्र्यांना वजनदार खाती मिळाली. यामध्ये भाजपच्या (BJP) शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं मिलालं. तर जयकुमार गोरेंकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली. हे दोन्ही आमदार पहिल्यांच मंत्री बनले आहेत.
तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शंभुराज देसाई यांना पर्यटन, खाणकाम माजी सैनिक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील यांना मदत आणि पुर्नवसन मंत्रीपद देण्यात आलं आहे.
अशी एकूण चार वजनदार मंत्रिपदे सातारच्या वाट्याला आली आहेत. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर सातारा हा एकमेव सर्वात जास्त मंत्री लाभलेला जिल्हा होता. मात्र, आता छगन भुजबळ यांना मंत्रीपद दिल्याने नाशिक देखील सातारच्या बरोबरीत आला आहे. त्यामुळे आता या दोन्ही जिल्ह्यांचा महायुती सरकारमध्ये दबदबा असणार आहे.
दरम्यान, महायुतीत सरकार सत्तेत आल्यापासून नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत वाद सुरू आहे. नाशिकचं पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार दादा भुसे की गिरीश महाजन हे अद्याप ठरलेलं नाही.
अशातच छगन भुजबळ यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने नाशिकचं पालकत्व भुजबळांना दिलं जाणार का? अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या मंत्रिपदामुळे नाशिकचा दबदबा वाढला असला तरी पालकमंत्रिपदावरून महायुतीची डोकेदुखी देखील वाढल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.