
Mumbai News : विधिमंडळाच्या सभागृहात पावसाळी अधिवेशनावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी संधी मिळताच निशाणा साधत टीकेची झोड उठवली आहे. त्यातच लातूरमध्ये छावा संघटनेचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवदेन देण्यासाठी गेल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. या दोन घटनांमुळे विरोधकांनी आक्रमक होत राज्यभरात रान पेटवले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला तर दबाव वाढत असल्याने अटकही करण्यात आली.
दुसरीकडे या प्रकरणात लक्ष्य करण्यात आलेले माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळून लावले. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे शेतकरी नाही तर त्यांच्याकडून एक रुपया घेणारे राज्य सरकार भिकारी आहे असे म्हणत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे कोकाटेंचं नेमकं कुठं चुकलं? रमी खेळले ते की आठ महिन्यात बडबडले ते? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राज्याच्या मंत्रीमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासूनच माणिकराव कोकाटे (Manikrao kokate) नेहमीच चर्चेत राहिले आहेत. प्रत्येकवेळी वादग्रस्त विधाने करीत त्यांनी वाद ओढवून घेतला आहे. या-ना त्या कारणाने गेल्या आठ महिन्यात ते कामापेक्षा इतर कारणाने जास्त चर्चेत राहिले आहेत. नेहमीच त्यांनी अंगावर वाद ओढवून घेत पक्षाची प्रतिमा मालिन केली आहे. सुरुवातीला त्यांनी वादग्रस्त विधाने केल्यानंतर माफी मागत त्या वक्तव्यावर पडदा टाकला होता.
कृषीमंत्री कोकाटे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद ओढवून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील त्यांनी तंबी दिली होती. त्यानंतरही ते विधान करीत आहेत. 'कृषी मंत्रालय म्हणजे ओसाड गावाची पाटीलकी आहे. ती अजितदादांनी मला दिली आहे.' अशा त्यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. त्यानंतर त्यांनी पिकांच्या ढेकाळाचे पंचनामे करायचे का? असे विधानही केले होते.
'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एक रुपया पीकविमा देतो,' असे वक्तव्य कोकाटे यांनी केले होते. तसेच कर्जमाफीचे पैसे शेतकरी शेतासाठी न वापता त्या पैशात साखरपुडा आणि लग्न करतो, असे देखील कोकाटे यांनी एका शेतकऱ्याने कर्जमाफी विषयी विचारल्यानंतर म्हटले होते. तसेच नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी कांद्याच्या भावावरून शेतकऱ्यांना दोषी ठरवते म्हटले होते की, चांगला भाव मिळाला की सगळेच शेतकरी कांद्याची लागवड करतो. त्यामुळे उत्पादन वाढते आणि भाव पडतो. कोकाटेंनी यांनी वादग्रस्त वक्तवानंतर माफी मागून त्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा देखील प्रयत्न केला होता.
खोटी कागदपत्रे देऊन सदनिका मिळवण्याच्या 30 वर्ष जुन्या प्रकरणात नाशिकच्या न्यायालयाने त्यांना दोन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आमदारकी सुद्धा अडचणीत आली होती. वरच्या न्यायालयाने दोषसिध्दीला स्थगिती दिल्याने गोळी कानाजवळून गेली होती.
त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनावेळी त्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या कृतीवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधत राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे कृषीमंत्री कोकाटे यांनी हा आरोप फेटाळण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये देखील त्यांनी वाद ओढवून घेतला आहे.
दुसरीकडे पाठीमागे केलेल्या विधानावरून घुमजाव करताना त्यांनी शेतकरी नाही तर त्यांच्याकडून एक रुपया घेणारे राज्य सरकारच भिकारी आहे, असे म्हणत कोकाटे यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या या दोन्ही वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची याबाबत एकत्रित बैठक होणार आहे. त्यावेळी कोकाटे यांच्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
एकीकडे कोकाटे यांचा कृषिमंत्री पदाचा राजीनामा घेणार की अभय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांचे मंत्रिपद शाबूत ठेऊन त्यांच्याकडील कृषी खाते राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर मंत्र्याकडे देण्याचा विचार सुरु असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात काय निर्णय घेतला जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शेतकरी जसा चोहोबाजूनी संकटांनी घेरलेला, तसेच या खात्याचा मंत्रीही संकटाच्या कोंढाळयात असतो. शांतपणे आपल्या खात्याचे काम पाहणे, आवश्यक असलेले तेवढेच कमीतकमी बोलणे आणि महत्वाचे म्हणजे या खात्याचा केंदबिंदू जो शेतकरी आहे त्यांच्याबद्दल सहानभूती व कळवळा, संवेदनशीलता बाळगणे हे भान कृषिमंत्र्यांनी बाळगायालाच हवे. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रीपदाच्या पहिल्या दिवसापासून हे उमजले नाही. तेंव्हाच मोबाईलवरील गेमच्या वादात बरोबर कोण, चुकीचे कोण, कृषिमंत्री की विरोधक हे महत्त्वाचे नाही. त्यापेक्षा फटकळ, परखड, बोलण्याच्या नादात शेतकऱ्यांच्या मंत्र्यांमध्ये संवेदनशीलता नाही, हे अधिक महत्त्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.