मुंबई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल दहा मार्च रोजी लागल्यानंतर त्याचा परिणाम देशाच्या राजकारणावर होण्याची चर्चा असली तरी महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकार हे दहा मार्चनंतर पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली होती. नंतर त्यांनी आपण असे कार्यकर्त्यांसाठी बोलल्याचे सांगत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांना दहा मार्चचे वेध लागले आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हट्ट धरूनही तीन अधिवेशनांत या पदाची निवडणूक टळल्यानंतर काँग्रेस नेतृत्व सावध झाले असून, येत्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात निवडणूक घेण्याची तयारी पक्षाने केल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज स्पष्ट केले. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर नव्या अध्यक्षांचे नाव ठरणार असल्याचेही पटोले यांनी संगितले.
मात्र ही माहिती देताना नानांनी सूचकपणे काही गोष्टी सांगितल्या. मंत्रिमंडळात बदलाचे संकेत त्यांनी आपल्या वक्तव्यातून दिले. सरकारमध्ये जे काही घडत आहेत; त्यात १० मार्चनंतर बदल होईल, असे सांगून पटोले यांनी एकप्रकारे मंत्रिमंडळात बदलाचे संकेतच दिले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हाच बदल असल्याचा खुलासा पटोले यांनी केला. मी लोकांसाठी बदल होईल, असे सांगितले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, मला मंत्रीपद मिळावे, यासाठी आग्रह नाही. कोणाला काय द्यायचे, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, अशा सूचक शब्दांत पटोले यांनी मंत्रीपदाबाबत वक्तव्य केले.
महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असून, पटोले यांच्या राजीनाम्यापासून ते रिक्त आहे. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या हालचाली काँग्रेसकडून झाल्या. या काळातील अधिवेशनांत निवडणूक होणार असल्याचे पटोले यांनी तीनदा स्पष्ट केले होते. मात्र आधी कोरोना, हिवाळी अधिवेशनात निवडणुकीच्या प्रक्रियेतील बदलामुळे ही निवडणूक होऊ शकली नाही. परंतु, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांतील मतभेद, ठाकरे सरकार विरोधकांमधील संघर्षातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टळल्याचे दिसले. त्यात काँग्रेसमधील नेत्यांचा वादही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ३ मार्चपासून होणाऱ्या अधिवेशनात पहिल्या आठवड्यातच निवडणूक घेण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.
पटोले म्हणाले,‘‘ काँग्रेसच्या आंदोलनात लोकांची गर्दी कमी ठेवली जाते. जाणीवपूर्वक विदर्भात अधिवेशन होत नसल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. विदर्भाच्या प्रश्नांना प्राधान्य आहेच. काँग्रेसच्या वतीने राज्यभर जनता दरबार घेतला जाणार आहे.’’ दरम्यान, पक्षाच्या सदस्य (डिजिटल) नोंदणीबाबत काँग्रेसचे मंत्री, आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पटोले आणि माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू यांच्या उपस्थितीत झाली. त्यानंतर पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.