Modi Reshimbagh news : भाजपने सध्या संघटनात्मक निवडणूक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित केले आहे. देशभरातील 36 राज्यांपैकी 29 राज्यातील संघटनात्मक निवडणुका पूर्ण केल्या आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या राज्यात नवीन प्रदेशाध्यक्षांची घोषणा होत आहे. लवकरच भाजपला नवा राष्ट्रीय अध्यक्षही मिळणार आहे. तर दुसरीकडे महत्त्वाच्या सात राज्यांमधील प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडी रखडल्या आहेत.
लोकसभा निवडणुकांपासून आतापर्यंत भाजप आणि त्याचा वैचारिक मार्गदर्शक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील नात्यात काही रंजक चढ-उतार दिसले आहेत. हे नाते अनेक बाबतींत गुंतागुंतीचेही आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या संघटनात्मक निवडणुकांत संघाचा स्पष्ट प्रभाव दिसून येत आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा नेत्यांची निवड केली जात आहे ज्यांची पार्श्वभूमी संघाशी संबंधित आहे. बहुतांश अध्यक्ष हे ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) सारख्या संघटनांमधून आलेले आहेत, किंवा संघाच्या व्यवस्थेतून राजकारणात प्रवेश केलेले आहेत.
भेटीचा परिणाम
लोकसभा निवडणुकीच्या काळात आणि निकालानंतर संघ आणि भाजपमध्ये अंतर असल्याचे दिसून आले होते. पण आता मात्र जवळीक वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. संघटनात्मक निवडणुकांमध्ये याचे प्रतिबिंब दिसते आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीतही संघाची भूमिका असणार हे स्पष्ट आहे. एकमत साधण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळेच अध्यक्ष निवड लांबली असल्याचे मानले जात आहे. भाजपने स्वतःहून संघासोबतचं नातं सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर याच वर्षी ३० मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच नागपूर येथील संघ मुख्यालयात गेले आणि संस्थापकांना आदरांजली वाहिली. मोदी आणि मोहन भागवत यांच्यात विशेष चर्चा झाली. त्याआधी काही महिने नरेंद्र मोदींनी विविध मुलाखतींमध्ये संघाचा उल्लेख केला, त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि संघाच्या प्रभावावर खुलेपणाने भाष्य केले.
वादाला 'या' कारणामुळे झाली सुरुवात
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी संघाविषयी केलेले एक कठोर वक्तव्य हे दोघांमधील तणावाचे पहिले लक्षण मानले गेले. त्यांनी म्हटले की, "भाजप आता स्वतंत्र आणि सक्षम झाली आहे, तिला संघाच्या मदतीची गरज नाही." या वक्तव्यानंतर खळबळ उडाली. काही तज्ज्ञांनी हे भाजपकडून आपली स्वायत्तता दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले, तर काहींनी याला संघाशी वाढलेला तणाव मानत आहेत. नड्डांच्या वक्तव्यामुळे संघात अस्वस्थता पसरली आहे. अनेक स्वयंसेवकांनी नाराजी व्यक्त केली, असेही सांगितले गेले की, निवडणुकीच्या वेळी संघ स्वयंसेवकांनी प्रचारापासून पाय मागे घेतले आणि त्यामुळे भाजपचे नुकसान झाले आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला होता, पण फक्त 240 जागा जिंकता आल्या. मात्र एनडीएच्या अन्य पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्यात आले.
संघानी केली टीका
संघ आणि भाजपमध्ये (BJP) "सर्व काही ठीक नाही" अशा चर्चा तेव्हाच जोर धरू लागल्या जेव्हा निवडणूक निकालानंतर संघातील काही प्रचारकांनी थेट टीका केली. संघाचे वरिष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, “रामराज्याचे विधान पाहा – जे रामभक्त होते, ते गर्वाने भरले गेले. म्हणूनच त्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष जाहीर करण्यात आले तरी त्यांना पूर्ण बहुमत मिळाले नाही, कारण अहंकारामुळे प्रभूंनी ती शक्ती रोखली.” त्यानंतर संघाने स्पष्ट केले की हा इंद्रेश कुमार यांचा वैयक्तिक दृष्टिकोन आहे, संघाचे अधिकृत मत नाही.
पण त्याचवेळी संघप्रमुख मोहन भागवत यांनीही काही ठिणग्या टाकणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या. त्यांनी म्हटले, “एक खरा सेवक मर्यादा पाळतो. तो हे म्हणत नाही की ‘हे मी केले’, त्याच्यात अहंकार नसतो. जो ‘मी’ म्हणतो, तो खरा सेवक नसतो.” नंतर यावरही स्पष्टीकरण देण्यात आले की, हे विधान सरकारकडे निर्देशित नव्हते.
संघ भाजपमध्ये पुन्हा समन्वय
निवडणूक निकालानंतर झालेल्या आढाव्यात संघाने असे निष्कर्ष काढले की अनेक राज्यांमध्ये भाजपचा पक्षसंघटन कमकुवत झाले आहे. त्यानंतर संघाने ठरवले की यापुढे सैलपणा चालणार नाही. त्यानंतर हरियाणा आणि महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये संघाने भाजपला सक्रिय पाठिंबा दिला. संघाच्या विविध घटकांनी अनेक बैठकांचे आयोजन करून भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण केले. यामुळे पुन्हा संघ-भाजप यांच्यातील अंतर कमी झाले असे वाटू लागले आहे.
याच वर्षी विजयादशमीच्या दिवशी संघाची स्थापना १०० वर्षांची पूर्ण होईल. संघाने ठरवले आहे की त्यावेळेपर्यंत देशभरात एक लाख शाखा सुरू करायच्या आहेत. त्या काळात संघ अनेक मोठे कार्यक्रम आयोजित करेल, ज्याचा राजकीय पटलावरही परिणाम होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.