
राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्योरांपोची जुगलबंदी सुरूच असते. निवडणुकीच्या काळात ती शिखरावर असते. निवडणूक संपल्यानंतरही आरोप-प्रत्यारोपांची राळ उठवली जात आहे. शिर्डीत भाजपचे महाविजय अधिवेशन नुकतेच झाले. शरद पवार यांनी विश्वासघाताचे राजकारण केले, असा आरोप शाह यांनी या अधिवेशनात केला होता. या टीकेला शरद पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यामुळे 'आ बैल मुझे मार...; याचा प्रत्यय अमित शाह यांना आला असेल. तुल्यबळ व्यक्तीची क्षमता न ओळखता त्याच्यावर टीका केली की ती अंगलट येते, असे सांगणारी ही म्हण आहे.
शरद पवार अत्यंत मुरब्बी असे राजकीय नेते आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा लीलया वावर असतो. अमित शाह हे देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री आहेत, त्यामुळे नोंद घ्यावी, असे ते नाहीत, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. निवडणुकीत यश-अपयश येतच असते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पदरी अपयश पडले. त्याच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी बलाढ्य महायुतीची झोप उडवली होती. भाजपचे केवळ 9 खासदार निवडून आले. महाविकास आघाडीला 31 तर महायुतीला 17 जागा मिळाल्या.
सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात अमित शाह यांना 2010 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यावेळी ते गुजरातचे गृहराज्यमंत्री होती. अटक झाल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. जामीनावर ते बाहेर आले. मात्र, ते गुजरातमध्ये राहिले तर तपासावर प्रभाव टाकतील, असा आक्षेप त्यांच्या विरोधकांनी घेतला होता. त्यामुळे न्यायालयाने त्यांना गुजरातमधून तडीपार केले होते. नंतर ते या प्रकरणातून सुटले. मात्र, त्यांच्यावर तडीपारीचा शिक्का बसला. पंतप्रधान मोदी यांच्यानंतर अमित शाह हे देशातील क्रमांक दोनचे शक्तिशाली नेते समजले जातात.
अमित शाह हे शक्तिशाली असले तरी शरद पवार हेही काही कमी नाहीत. शरद पवार सत्तेत नाहीत, मात्र देशाच्या राजकीय वर्तुळात त्यांचा दरारा आहे. त्यांच्या शब्दाला किंमत आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशीही पवार यांचे सलोख्याचे संबंध आहेत. शरद पवार यांच्यावर मर्यादा सोडून टीका केली की काय होते, याचा अनुभव पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत घेतला आहे. शरद पवार यांचे नाव न घेता 'भटकती आत्मा' अशी टीका मोदी यांनी केली होती. ही टीका महायुतीला भोवली होती. मोदी यांनी जितक्या सभा घेतल्या होत्या, तितकेही महायुतीचे उमेदवार विजयी झाले नव्हते.
शिर्डीतील महाविजय अधिवेशनात अमित शाह यांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकेची झोड उठवली होती. शरद पवार यांचा उल्लेख त्यांनी दगाबाज असाही केला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनीही शाह यांच्या या टीकेचा समाचार आधीच घेतला होता. शरद पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शाह यांच्यावर प्रतिहल्ला केला. सरदार वल्लभभाई पटेल, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण आदींनी गृहमंत्री म्हणून मोलाचे योगदान दिले आहे, मात्र यापैकी कोणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आले नव्हते, असा हल्ला पवार यांनी चढवला.
शरद पवार यांनी हा हल्ला चढवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी खासदार वंदना चव्हाण यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत जुळवून घेणार नसल्याचे संकेत दिले. शरद पवार आणि अजितदादा पवार आता कधीही एकत्र येऊ शकणार नाहीत असे त्या म्हणाल्या. अजितदादा यांनी ज्या विचारधारेसोबत जुळवून घेतले आहे, त्या विचारधारेसोबत आम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे शरद पवार आणि अजितदादा पवार एकत्र येऊ शकत नाहीत, असे वंदना चव्हाण यांनी स्पष्ट केले. हा योगायोग आहे की आणखी काही?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्यावर टीका केली नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी तर पवारांवर टीका करणे कटाक्षाने टाळले होते. शरद पवार यांच्या वाढदिवशी अमित शाह यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या होत्या. आता राज्यात महायुतीचे प्रचंड बहुमताचे सरकार आहे. असे असतानाही शाह यांनी पवार यांच्यावर जहरी टीका केली होती. त्याला पवारांकडून देण्यात आलेले उत्तर शाह यांच्या जिव्हारी लागणारे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.