
Beed Political News : भाजप आमदार सुरेश धस हे बीडच्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बीडचं राजकारण चांगलंच तापलं आहे.त्यांनी बीडमधील गुन्हेगारीवरुन धनंजय मुंडेंवर एकापाठोपाठ टीकेचे बाण सोडून त्यांना घायाळ केले. त्याआधी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर महायुतीत आणि विशेष म्हणजे एकाच पक्षात असूनही पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याविषयी उघडउघड नाराजी व्यक्त करत आपलं काम तर केलंच नाही, शिवाय त्यांच्याविरोधातील उमेदवाराला बळ दिल्याचा आरोपही केला होता.
अशाप्रकारे मुंडे बंधू-भगिनीशी राजकीय वैर घेत त्यांचं बीडच्या राजकारणातील वर्चस्वाला सुरुंग लावण्याचा विडाच उचलला होता. पण एकेकाळी पंकजा मुंडे यांनीच सुरेश धसांच्या (Suresh Dhas) ब्रेक लागलेल्या राजकीय इनिंगला पुन्हा ट्रॅकवर आणलं होतं. मुख्यमंत्री फडणवीसांच्या समोरच याची जाणीव धसांनीच करुन दिली आहे.
सुरेश धस यांचा जन्म आष्टी तालुक्यातल्या जामगावचा आहे. राजकारणाविषयी त्यांना लहानपणापासूनच आवड होती. त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याशी जवळीक साधत 1999 च्या निवडणुकीत भाजपकडून तिकीट तर मिळवून ते आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडूनही आले. त्यानंतर सुरेश धस यांनी 2004 च्या विधानसभा निवडणुकीतही विजय खेचून आणला. बीडच्या राजकारणात त्यांनी हळूहळू जम बसवला.पण या दरम्यान, केंद्रात यूपीएचे आणि महाराष्ट्रात काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडीचं सरकार होतं.तसेच भाजप विरोधी पक्षात असल्यानं गोपीनाथ मुंडेंच्या लोकप्रियता घटू लागली होती.
राजकीय वारं ओळखून सुरेश धसांनी अखेर आपल्या राजकारणाची दिशा बदलली.त्यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती घेतलं.राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून त्यांनी पुन्हा एकदा आष्टी विधानसभा मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळला. शरद पवारांनी धसांचा बीडच्या राजकारणावरील पकड ओळखून आणि मुंडें विरोधात बळ देण्याच्या उद्देशानं तिसऱ्यांदा आमदारकी मिळवलेल्या धसांना राज्यमंत्रिपदांचं गिफ्ट दिलं.
सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे याचदरम्यान,एकमेकांच्या संपर्कात आले.2013 मध्ये धनंजय मुंडेनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली आणि भाजपाला सोडचिठ्ठी दिली.त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत आणून मुंडेंचं घर फोडण्यात अजित पवारांचा मोठा वाटा असल्याचं आजही बोललं जातं.
विशेष म्हणजे सुरेश धसांनी 2014 ची लोकसभा निवडणूकही त्यांचे राजकीय गुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात लढवली होती.मात्र,त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले.धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंविरोधात प्रचार करतानाच सुरेश धसांना जिंकून आणण्यासाठी मैदानात उतरले होते.पण गोपीनाथ मुंडेंनी आपली बीडमधील ताकद दाखवून देत तिथे विजय मिळवला होता. यांनी दाखवून दिलं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरुवातीला सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात चांगले संबंध होते.पण शरद पवारांनी मोठा राजकीय डाव खेळत धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी संधी दिली. तोच धस यांच्या मनात त्यांच्या राजकीय अस्तित्वाबद्दल शंका उपस्थित झाली. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुरेश धस यांना भाजपचं कमळ खुणावू लागलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून थोडी अलिप्तता पत्करत पुन्हा एकदा भाजप नेत्यांशी जवळीक वाढवली. एवढंच नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या विजयात सुरेश धस यांनी गेमचेंजरची भूमिला निभावली. त्यामुळे 2017 मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलं.
आमदार सुरेश धस यांनी त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वावर टीका केली होती.त्यांनी बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात काम करताना आपल्याला गुदमरल्यासारखं वाटत होतं,असं विधान करुन डिवचलं होतं. त्यानंतर धसांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे साहजिकच धनंजय मुंडे यांच्याबरोबर त्यांचं राजकीय शत्रुत्व निर्माण झालं.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनंजय मुंडेंची कारकीर्द बहरत असतानाच त्यांचा बीड जिल्ह्यातील राजकारणातला दबदबा वाढत चालला होता.त्यामुळे पंकजा मुंडे यांना धस यांच्यासारख्या मुंडेंना अंगावर घेणार्या तगड्या नेत्याची गरज होती. त्याचमुळे त्यांनी 2018 मध्ये भाजपात दाखल झालेल्या सुरेश धसांच्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गळ घातली. फडणवीसांनी देखील धसांना राजकीय पाठबळ देताना त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली.
2014 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय कारकीर्द धोक्यात आलेल्या धस यांना पंकजा मुंडे यांनीच बळ दिले होते. पण त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून पराभव झाला. तसेच त्यांना विधान परिषदही नाकारण्यात आली. त्यानंतर त्यांचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. या निवडणुकीतही सुरुवातीला धस यांनी पंकजा मुंडे यांचा प्रचार करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. मात्र, त्यानंतर युतीधर्म म्हणून ते हातचे राखूनच प्रचारात दिसून आले.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषद देत त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं. महायुती सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदंही मिळालं. महायुतीत मुंडे बंधू भगिनींना मंत्रिपद मिळाल्यानंतर सुरेश धस यांच्या मनात आणखी अस्वस्थता निर्माण झाली. त्याआधीच त्यांनी पंकजा मुंडेंविरोधात कधी नाराजी तर कधी टीकेची झोड उठवली होती. पण संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे सुरेश धस यांनी राजकीय टायमिंग साधत मुंडे बंधू -भगिनींना घेरण्यासाठी पूर्ण ताकद लावली. अन् त्यात ते बर्यापैकी यशस्वीही ठरल्याचे दिसून येत आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टीतल्या सुरेश धस यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंकजा मुंडे आणि सुरेश धस हे एकाच मंचावर दिसून आले. यावेळी पंकजा मुंडेंनी आमदार धसांना फडणवीसांसमोरच टोले लगावले. शिवगामी-बाहुबलीच्या उल्लेख दोन्ही नेत्यांनी फडणवीसांसमोर जोरदार भाषणं ठोकली. पण भाजप आमदार सुरेश धसांनी आपल्याला विधान परिषद मिळवून देण्यात पंकजा मुंडे यांचं मोठं योगदान असल्याची जाहीर कबुलीची खरी चर्चा सुरु झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.