
थोडक्यात महत्वाचे :
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाषा वाद, विशेषतः हिंदी सक्तीच्या विरोधातील मुद्द्यावरून जोरदार चर्चा होण्याची शक्यता असून, राज ठाकरे यांचे विधान केंद्रबिंदू ठरणार आहे.
पंतप्रधान मोदींनी उज्ज्वल निकम यांना मराठीत शुभेच्छा देत अप्रत्यक्षपणे राजकीय संदेश दिला असून, अधिवेशनात ते भाषावादावर ठामपणे भूमिका मांडतील, हे स्पष्ट आहे.
निशिकांत दुबे, अरविंद सावंत आणि इतर खासदार संसदेत मुद्दा उचलणार असून, दक्षिण भारतातील काँग्रेस सत्ताधारी राज्येही हिंदी सक्तीच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात.
Raj Thackeray’s Position on Language Policy : संसदेच्या पावसाळी अधिवेशन सोमवार (ता. २१) पासून सुरू होईल. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूरसह अनेक मुद्द्यांवर विरोधकांकडून सत्ताधारी मोदी सरकारवर हल्लाबोल चढविण्याची रणनीती आखण्यात आली आहे. काही प्रमुख मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उत्तर देण्याची मागणी विरोधक करत आहेत. ते उत्तर देतील की नाही, हे पुढील काही दिवसांत कळेलच. पण एका मुद्द्यावर ते हमखास बोलणार हे नक्की. अधिवेशन सुरू होण्याआधीच त्यांनी त्याची सुरूवातही केली आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी भाषेचा मुद्दा गाजत आहे. प्रामुख्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा प्रचंड तापवला आहे. दोन दिवसांपूर्वी थेट मिरा-भाईंदरमध्ये जाऊन सभा घेत त्यांनी तापलेल्या मुद्द्याला आणखी हवा दिली आहे. हा विषय आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. देशभरात गाजतोय. देशभरातील नेत्यांकडून त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. दक्षिणेतील बहुतेक नेते ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत. तर उत्तरेकडील राज्यांमधून जोरदार विरोध होतोय.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडींमुळे हा मुद्दा निश्चितपणे गाजणार, हे स्पष्ट झाले आहे. तसे संकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनीही दिले आहेत. रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये त्रिभाषा सुत्राचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याची माहिती त्यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. त्यामुळे भाषेचा मुद्दा अधिवेशनात गाजणार असल्याचे स्पष्टच आहे.
भाषेवरून वाद सुरू असतानाच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या गळ्यात राज्यसभेच्या खासदारकीची माळ पडली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांना अभिनंदनाचा फोन केला होता. मराठीतून बोलू की हिंदीतून असे, पंतप्रधानांनी आपल्याला विचारल्याची माहिती निकम यांनीच दिली होती. मोदींचे हे संभाषण म्हणजेच ‘लोहा गरम है, मार दो हतोडा’ या उक्तीला साजेशे असेच होते. त्यांनी थेट भाषावादावरून अप्रत्यक्षपणे ठाकरेंना लक्ष्य केले. त्यामुळे आगामी अधिवेशन पंतप्रधान मोदीही या वादावर आपली भूमिका सडतोडपणे मांडणार, यात काही दुमत नाही.
राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय बार उडवून दिला आहे. अमराठी लोकांनीही मराठी शिकावी, असा त्यांचा आग्रह आहे. आपला हिंदीला विरोध नाही, पण पहिलीपासून सक्तीला विरोध आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पण मराठी भाषेविषयी गरळ ओकल्यास त्यांना धडा शिकविण्याबाबतही त्यांनी ठणकावले आहे. ठाकरेंच्या या घणाघाताने उत्तर भारतात कानठळ्या बसविणारा आवाज झाला आहे. हा आव्वाज थेट संसतेदही घुमेल.
मुळचे बिहारमधील आणि सध्या झारखंडमधून खासदार असलेले निशिकांत दुबे हे भाजपचे अभ्यासू नेते मानले जातात. संसदेमध्ये नियमांचे पुस्तक हातात घेऊन त्याचे दाखल देत ते विरोधकांची अनेकदा बोलती बंद करतात. त्यांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जणू मोहिमच हाती घेतली आहे. ते सातत्याने काही ना काही विधाने करत ठाकरेंना डिवचण्याचे काम करत आहेत. संसदेतही हिंदी भाषिकांवर महाराष्ट्रात होणाऱ्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित करू शकतात. राज ठाकरे यांचा एकही खासदार संसदेत नाही. मात्र, त्यांचे चुलत बंधून उद्धव ठाकरेंची शिलेदार राज ठाकरेंची ढाल बनून संसदेत प्रत्युत्तर देण्यास सज्ज असतील. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदारही साथ देतील, हे निश्चित.
महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार असलेल्या काँग्रेसची मात्र पुरती कोंडी होणार आहे. त्यातून ते कसा मार्ग काढणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे. तमिळनाडूमध्ये काँग्रेस सत्तेत सहभागी आहे. तेथील सरकारनेही नव्या शैक्षणिक धोरणातील त्रिभाषा सुत्राला आणि हिंदी सक्तीला विरोध केला आहे. तेथील काँग्रेसचे नेते यावर उघडपणे भाष्य करत आहेत. केरळ, तेलंगणा, कर्नाटकातूनही विरोध होत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मुद्द्यावरून दक्षिणेतील राज्यातील खासदारही पुढे येऊ शकतात. हा मुद्दा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही. ठाकरेंनी पेटवलेल्या वातीमुळे अधिवेशनात भडका उडणार, हे निश्चित.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न :
प्रश्न: संसद अधिवेशनात कोणता भाषा-संबंधित मुद्दा गाजण्याची शक्यता आहे?
उत्तर: हिंदी भाषेची सक्ती आणि त्रिभाषा सुत्राचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
प्रश्न: पंतप्रधान मोदींनी भाषावादावर कोणती सूचक कृती केली?
उत्तर: उज्ज्वल निकम यांना मराठीतून बोलायचं का हिंदीतून, असं विचारून अप्रत्यक्ष संदेश दिला.
प्रश्न: राज ठाकरे यांची भूमिका काय आहे?
उत्तर: मराठीचा आग्रह असून, हिंदी शिकवण्यास विरोध नाही; पण सक्तीला तीव्र विरोध.
प्रश्न: दक्षिण भारतातील काँग्रेसची स्थिती अधिवेशनात कशी असणार?
उत्तर: काँग्रेससाठी कोंडीत पकडणारी स्थिती असेल कारण त्यांच्या राज्यांनी हिंदी सक्तीला विरोध दर्शवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.