
INDIA Alliance Shows Strong Unity Against Modi Government : राजधानी दिल्लीत संसद परिसरात तब्बल 25 हून अधिक विरोधी पक्षांचे 300 खासदार एकाचवेळी रस्त्यावर उतरले. भारतीय निवडणूक आयोगावर वोट चोरीचा आरोप करत सगळ्या खासदारांनी संसदेपासून धडक मोर्चाला सुरूवात केली. पोलिसांनी मोर्चा अडवला. अखिलेश यादव, महुआ मोइत्रा यांच्यासह आणखी काही खासदारांनी बॅरिकेड्सवर चढत पोलिसांचा विरोध जुगारून लावला. शरद पवारांनीही या मोर्चात अखेरपर्यंत सहभाग घेत ताकद दिली. प्रियांका गांधी घोषणा देताना थकत नव्हत्या... सर्व खासदारांनी एकजुटीने आपला बुलंद आवाज मोदी सरकार अन् निवडणूक आयोगापर्यंत पोहचवला.
इंडिया आघाडी अस्तित्वात आल्यापासून दिल्लीत पहिल्यांदाच असे दृश्य पाहायला मिळाले ते राहुल गांधी यांच्यामुळे. काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुरू केलेली आपली लढाई आजही लढत आहेत. जवळपास 9-10 महिन्यांपासून त्यांनी केलेल्या तयारीचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत. आजचा मोर्चा म्हणजे त्याचाच परिपाक म्हणावा लागेल. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी जुळवून आणत त्यांनी एका दगडात दोन नव्हे तर तीन पक्षी मारले आहेत.
मतदारयाद्यांमधील घोळाचे पुरावे दाखवत राहुल यांनी मागील आठवड्यात निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. भाजपसाठी आयोग वोट चोरी करत असल्याचा दावा करत राहुल यांनी एकाच व्यक्तीची तीन राज्यांतील मतदारयाद्यांमध्ये नावे असणे, दोन ठिकाणी मतदान, बोगस पत्ते, नावे अशा अनेक गोष्टी त्यांनी पत्रकार परिषदेत मांडल्या. या माध्यमातून त्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राहुल एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना आपल्या घरी स्नेहभोजनासाठी बोलत त्यांच्यासमोरही या घोळाचे प्रेझेंटेशन दिले. सर्व नेत्यांना त्यांनी आपले म्हणणे पटवून दिले. बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनर्पडताळणी मोहिमेचीही किनार त्याला होती. विरोधकांकडून या मोहिमेला जोरदार विरोध होत असून त्याविरोधात संसदेत आणि संसदेबाहेर जोरदार आवाज उठवला जात आहे. राहुल यांनी हीच संधी साधत आपला एक व्यक्ती एक मतदान, वोट चोरी हा मुद्दा आणखी तापवला आणि निवडणूक आयोगाविरोधात वातावरण निर्मिती करण्यात त्यांना यशही आले.
मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडी विस्कळीत झाली होती. मागील महिन्यात संसदेचे अधिवेशन सुरू होईपर्यंत आघाडीची एकही बैठक झाली नव्हती. त्यामुळे आघाडी अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण राहुल यांनी वोट चोरी आणि SIR म्हणजेच बिहारमधील मतदारयाद्या पुनर्पडताळणीच्या निमित्ताने विरोधकांना एकत्र केले. संसदेतील आवाज थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयांपर्यंत पोहचविण्याचा निर्णय घेतला अन् सोमवारी (ता. ११) ऐतिहासिक असा मोर्चाही काढला.
आजच्या मोर्चाचे वैशिष्टये म्हणजे सर्व विरोधी पक्षातील ३०० खासदार सहभागी झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी, आपचे नेते संजय सिंह, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यासह सर्वच मित्रपक्षांच्या खासदारांनी मोर्चात अखेरपर्यंत सहभाग घेत ताकद दाखवून दिली.
पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर अखिलेश यांनी बॅरिकेड्सवर चढून हनुमान उडी घेतली. महुआ मोइत्रा यांच्या तृणमूलच्या इतर महिला खासदारही बॅरिकेड्सवर चढल्या होत्या. मोर्चातील त्यांची आक्रमकता सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात रोष दाखवित होती. इंडिया आघाडीच्या एकजुटीने पुन्हा वातावरण ढवळून काढले. विरोधी पक्षांसाठी हे नवी सुरूवात असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात राहुल गांधी यांचा आक्रमकपणा अधिकच उभारून आला आहे. निवडणुकीतील घोळाचे आरोप करत ते सातत्याने सरकार आणि आयोगावर निशाणा साधत आहेत. त्यांच्या या आक्रमकतेवर विरोधी पक्षातील इतर खासदारही जणू फिदा झाले आहेत. त्यामुळे सोमवारच्या मोर्चात विरोधकांची एकी पुन्हा एकदा दिसून आली. मोदी सरकारसाठी ही झटका देणारी बाब म्हणावी लागेल. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून राहुल यांच्याकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या मुद्द्यांना विरोधी पक्षांतील इतर सहकाऱ्यांनीही साथ दिली आहे. त्यामुळे राहुल यांच्या सरकारविरोधातील संघर्षाला धार आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.