Pune News : महाराष्ट्रातल्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही.गेल्या काही महिन्यांपासून जसं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चांचं वारं वाहू लागलं आहे. तसंच दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत.
पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना ब्रेक लावला आहे.आणि त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे अजित पवारांचा एक निर्णय असल्याचं राजकीय क्षेत्रात बोललं जात आहे.
आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती असो की महाविकास आघाडी दोन्ही बाजूच्या पक्षांनी या निवडणुकीसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. राजकीय आखाडे बांधतानाच नवी समीकरणंही पुढं येण्याची शक्यता आहे.
याचदरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? हा चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता.18) मोठं विधान केलं आहे. पवारांच्या रोखठोक भूमिकेमुळे राष्ट्रवादीतील (NCP) दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या आशा आता जवळपास सध्यातरी संपुष्टात आल्याचं निश्चित मानलं जात आहे.
पिंपरी-चिंचवडमधील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी संधीसाधुपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे साहेब-दादा एकत्र येणार नाहीत, हे आता अधोरेखित झालं आहे. आपल्याला संधीसाधूपणाचं राजकारण करायचं नाही, जे कोणी येत असतील तर त्यांच्याबाबत आमचे नेते विचारविनिमय करतील, असेही पवार यांनी सांगितलं.
कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी संबंध हा काँग्रेसचा विचार असू शकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने संधीसाधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही, त्या दिशेने आपल्याला पावलं टाकायची नसल्याचंही पवारांनी यावेळी ठणकावलं.
पवार म्हणाले, सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे,असं वारंवार म्हटलं जात आहे.पण सगळे म्हणजे कोण? गांधी, नेहरु, फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे असले तर त्यांना सोबत घेऊ.पण जे सत्तेसाठी भाजपसोबत गेले,ही भूमिका कोणी मांडत असेल, तर हा विचार काँग्रेसचा नसल्याची निर्णायक भूमिकाही पवारांनी यावेळी मांडली.
शरद पवारांनी एकप्रकारे आपली भूमिका स्पष्ट करतानाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस येण्याच्या चर्चांनाच पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी काय किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काय, दोन्ही पक्षांतील दादा आणि साहेबांना एकत्र आणण्यासाठी उतावीळ झालेल्यांना शरद पवारांनी थेट आपल्या स्टाईलनं 440 व्होल्टचा झटकाच दिला आहे.
महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात हातखंडा असलेल्या शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना ब्रेक लावताना संधीसाधुपणा करणार्यांना सोबत घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र,या त्यांच्या निर्णयामागं आणखी एक कारण असल्याची बारामतीसह पुण्याच्या राजकारणात चर्चा असल्याचं बोललं जात आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच 4 पॅनेलमध्ये लढत होत आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली असून या निवडणुकीत जातीनं लक्ष घातलं आहे.स्वत:ची उमेदावारी जाहीर करत अर्जही दाखल केला आहे. इथेच महत्त्वाचा खटका पडला आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक (Malegaon Sugar Factory Election) नेहमीच पवारांची कस पाहणारी ठरली आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर आणि विधानसभा निवडणुकीतील यशानंतर कॉन्फिडन्स वाढलेल्या अजित पवारांनी आधी इंदापूर तालुक्यातील भवानीनगरच्या छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक जिंकल्यानंतर आपला मोर्चा थेट माळेगावच्या निवडणुकीकडे वळवला. ही निवडणूक हातातच घेतली नाही तर तिथं ताकदही लावली आहे.
मात्र,उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांच्या याच निर्णयामुळे पुन्हा एकदा नाराजी वाढली आहे. कारण या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील उमेदवार उतरवले आहेत. याबाबत बोलताना शरद पवारांनी या निवडणुकीत आमची टोकाची भूमिका घ्यायची इच्छा नव्हती, आजही नाही. मात्र, कार्यकर्त्यांची इच्छा आणि एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्याने या निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांची भूमिका कायमच महत्त्वाची राहिली आहे. आता या निवडणुकीत शरद पवार कुणाला कौल देणार यावर कारखान्याचा निकाल अवलंबून असणार आहे. कारण चंद्रराव तावरे यांची ओळख सहकारमहर्षी आणि शरद पवार यांचे समर्थक म्हणून राहिली आहे.
शरद पवारांचं तब्बल 40 वर्षे साथ दिलेल्या चंद्रराव तावरे आणि अजित पवार यांच्यात नेहमीच संघर्षाचं राजकारण राहिलं आहे. अजित पवारांचे त्यांच्या राजकीय एन्ट्रीवेळीच चंद्रराव तावरे यांच्यासोबत खटके उडाले होते. त्याचमुळे शरद पवारांचे समर्थक राहिलेल्या चंद्रकांत तावरेंविरोधात अजित पवारांनी दंड थोपटल्यानंतर राजकारण तापू लागलं आहे.
अजित पवारांनी तावरेंविरोधात निवडणूक लढवण्याचा घेतलेला हाच निर्णय नाराजीचं कारण ठरण्याची शक्यता आहे.कारण चंद्रकांत तावरेंविरोधात पवारांच्या मनात कुठेतरी अप्रत्यक्षपणे 'सॉफ्ट कॉर्नर' असल्याचं बोललं जात आहे. याचमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांनाही शरद पवारांनी ब्रेक लावल्याचं बोललं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.