

Tamil Nadu politics latest news : देशातील पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एक राज्य वगळता सर्वत्रच जोरदार मुसंडी मारली आहे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळवत भाजपने तृणमूल काँग्रेसची १५ वर्षांपासूनची सत्ता उद्धवस्त केली. आसाममध्येही पक्षाने हॅट्ट्रिक करत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले. पुदुच्चेरीमध्ये पुन्हा एनडीएचे सरकार आले. तर केरळमध्ये भाजपला पहिल्यांदाच तीन जागांवर विजय मिळाला.
भाजपकडून चारही राज्यांमधील हा विजय जल्लोषात साजरा करण्यात आला. पण तमिळनाडू हे राज्य अपवाद ठरले आहे. सर्वच बाबतीत भाजपची कामगिरी फ्लॉप शो ठरली आहे. राज्यात भाजपला केवळ एका जागावर विजय मिळाला आहे. मागील निवडणुकीत भाजपला चार जागा मिळाल्या होत्या.अर्थात सुपरस्टार विजय यांच्यासमोर केवळ भाजपच नव्हे तर डीएमके आणि एडीएमके हे मातब्बर पक्षही टिकू शकले नाहीत. पण त्यानंतरही भाजपची झालेली पीछेहाट पक्षासाठी मोठा धक्का आहे.
अण्णामलाई यांना दूर केले
राज्यात भाजपला सध्या कोणताही लोकप्रिय राजकीय चेहरा नाही. माजी आयपीएस अधिकारी अण्णामलाई यांनी २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ते २०२१ ते २०२५ असे चार वर्षे प्रदेशाध्यक्ष होते. या काळात त्यांनी राज्यभर भाजपची ताकद वाढविण्याचा निकराचा प्रयत्न केला. एडीएमकेसोबत न जाता एकला चलोची भूमिका घेण्यास त्यांनीच नेतृत्वाला भाग पाडले होते. पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही.
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला एडीएमकेसोबत असताना चार जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी २.६ टक्के मते मिळाली होती. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एडीएमकेची साथ सोडल्यानंतर ही टक्केवारी ११ टक्क्यांच्या पुढे गेली होती. भाजपला पहिल्यांदाच मतांच्या टक्केवारीचा दुहेरी आकडा गाठता आला होता. मात्र, तमिळनाडूमध्ये पुन्हा आपली ताकद वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एडीएमकेसोबत जाण्याची रणनीती आखली.
अण्णामलाई यांचा एडीएमकेसोबत जाण्यास विरोध असल्याने त्यांना निवडणुकीआधी प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात आले.त्यानंतरच आघाडीची घोषणा करण्यात आली. एवढेच नाही तर त्यांना उमेदवारीही देण्यात आली नाही. प्रचारातही अण्णामलाई यांच्यासारख्या नेतृत्वाला फारसे महत्व दिले गेले नाही. जे मुद्दे विजय मांडत होते, त्याच मुद्द्यांवर अण्णामलाई यांनीही डीएमके सरकारला घेरले होते. त्यामुळे राज्यात त्यांची लोकप्रियता चांगली वाढली होती. कणखर नेता म्हणून त्यांची ओळख झाली होती. पण यावेळच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांनाच डावलले, परिणामी भाजपची चार जागांवरून एका जागेपर्यंत घसरण झाली. मतांची टक्केवारी किंचित वाढली असली तरी ती तीन टक्क्यांच्या खालीच राहिली.
अण्णमलाई यांना पदावरून हटविल्यानंतरही भाजपच्या पदरी निराशाच पडली आहे. तमिळनाडूमध्ये आपले अस्तित्व पुन्हा दाखविण्यासाठी भाजपला आता नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. एडीएमकेला सोबत घेत अण्णामलाई यांना डावलणे पक्षाला भोवले आहे. पण राज्यात पाय रोवण्यासाठी भाजपला एका प्रादेशिक पक्षाची मजबूत साथ मिळणेही गरजेचे वाटते. त्यामुळे यातून राजकीय मार्ग काढण्याची कसरत रणनीतीकारांना करावी लागेल.