
kolhapur/sangli News : राज्यात हिंदीसक्तीवरून राज्य सरकारच्याविरोधात संतापाची लाट उसळल्यानंतर दोन्ही आदेश मागे घेण्यात आले. याला मराठी माणसाबरोबर उद्धव आणि राज ठाकरे यांचा कडवट विरोध कारणीभूत ठरला. त्यानंतर मुंबईत राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांनी एकत्रित मेळावा घेतला. ज्यानंतर आता राज्यभर मनसे आणि ठाकरे गट एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जातेय. पण जे मुंबईत शक्य झाले पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात होणार आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. दोन्ही जिल्ह्यात या दोन्ही पक्षांची ताकद पाहता त्यांच्या एकत्रिकरणाबाबत सध्यातरी साशंकताच व्यक्त होताना दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे आणि उध्दव ठाकरे हे दोघे एकत्र येतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण त्या चर्चा काही सत्यात येताना दिसत नव्हत्या. पण राज्य सरकारने हिंदी सक्तीचा आदेश काढला आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याला हवा मिळाली. ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्यास तयार झाले. मनसेनं दिलेला हात आणि त्यावर शिवसेनेनं दिलेल्या टाळीमुळे राज्य सरकारला हिंदी सक्तीचा आदेशच रद्द करावा लागला. शनिवारी (ता.5) मुंबईत ठाकरे बंधुंचा एकत्र येऊन मेळावा घेतला. यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उध्दव ठाकरे पक्ष यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्याचे परिणाम राज्यात काय होतील याची आता चर्चा सुरु झाली आहे.
सांगलीत मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात दोन्ही ठाकरे एकत्र आल्याने उत्साह आहे. काही दिवसांपुर्वी राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी येथे एकत्र येऊन केक कापला होता. मात्र जिल्ह्यात दोन्ही पक्षांची ताकद मोठी नाही. दोन्ही पक्ष एकत्र आले तरीही जिल्ह्यात महायुतीसमोर किती आव्हान उभे करतात याबद्दल साशंकता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीस अद्याप काही महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे अजून पुलाखालून बरेच पाणी जाणार आहे. मात्र आजची स्थिती पाहिली तरीही या दोन्ही पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फारसे काही हाताला लागेल अशी शक्यता दिसत नाही. काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेससोबत असली तरी यांच्या वाट्याला किती जागा येणार आणि त्यात किती यश मिळणार हे सांगणेही सध्या कठीण आहे. तर फक्त केक कापून जल्लोष करणाऱ्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मने जुळणार का हा देखील मोठा प्रश्न आहे.
कोल्हापुरातही दोन्ही पक्षात गटबाजी ठरलेली असून याकडे दोन्ही पक्षातील नेत्यांचे दुर्लक्ष झालं आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना वाली नसल्यासारखी स्थिती सध्या येथे आहे. दरम्यान मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले असले, तरी जिल्ह्यात दोन्ही पक्षांचे मनोमिलन होणे हेच मोठे आव्हान असेल. जिल्ह्यात दोन्ही पक्षांना त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी धापा टाकाव्या लागत आहेत. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी काहीशी अवस्था दोन्ही पक्षांची असून पक्षातील नेत्याचेच तेहरे वेगवेगळ्या दिशेला असतात. यामुळे जिल्हा पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते एकदिलाने नांदतात का नाही हे येणारा काळच ठरवणार आहे.
एकेकाळी जिल्ह्यात सहा आमदार असलेल्या शिवसेनेची आज स्थिती बिकट बनली आहे. लोकसभा-विधानसभेवेळीही पक्षांतर्गत असलेला वाद नेत्यांना मिटवता आलेला नाही. जिल्हाप्रमुख निर्माण झालेला वाद थेट पक्ष फुटण्यापर्यंत गेला आहे. तर संजय पवार यांनीही उपनेतेपदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त करत कोल्हापूर आणि मातोश्रीतमधल्या पूलाचे ऑडिड करण्याची गरज असल्याचे म्हटलं होते. यामुळे त्यांची नाराजी अद्याप कमी झालेली नाही.
तर मनसेचे नाव जिल्ह्यात माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले, प्रसाद पाटील, विजय करजगार, राजू जाधव, अभिजित राऊत, अजिंक्य शिंदे, नीलेश लाड या नावांच्या पुरतेच मर्यादीत राहिले आहे. या सर्वांचे राजकरण मर्यादित असून शहर असो किंवा जिल्हा येथे मनसेला मोठा नेता तयार करता आलेलं नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.