
Mumbai News : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशन काळात पहिल्याच दिवसापासून महाविकास आघाडीने सरकारला घेरण्याची रणनीती आखली होती. महाविकास आघाडीने अधिवेशन काळात आक्रमक भूमिका घेण्याच्या उद्देशाने शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बैठका घेत प्लॅन ठरवला होता. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण, परभणी येथील जिल्हा कारागृहामध्ये सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या युवकाचा झालेला मृत्यू. त्यासॊबतच स्वारगेट बसस्थानकांत युवतीवर झालेला बलात्कार या या घटनांमुळे राज्यातील महायुती सरकार बॅकफुटला गेले असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे मंत्री धनंजय मुंडे, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून विरोधकांच्या हाती सरकारला घेरण्याची संधी चालून आली असताना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांना घेरण्याची संधी घालवली आहे. दुसरीकडे विरोधीपक्ष नेते पदावरून मविआमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही पक्षांनी विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात हे दोन पक्ष एक्मेकांविरोधात उभे टाकणार असल्याने सत्ताधाऱ्यांना कोण घेरणार? असा प्रश्न सतावत आहे.
विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील काही आमदार नाराज झाले आहेत. कारण कुठलीही चर्चा न करता ठाकरे गटाने पत्र पाठवल्यामुळे काँग्रेस पक्षातील नेते नाराज असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून थेट चर्चा न करता विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदासाठी, विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवत असेल तर, काँग्रेस पक्षही विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी नाव थेट जाहीर करेल, असा इशारा काही काँग्रेसच्या नेत्यांनी दिला आहे. त्यामुळे येत्या काळात सत्ताधारीविरुद्ध विरोधीपक्ष ऐवजी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकाविरोधातच लढणार असे चित्र दिसत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जुंपण्याऐवजी महाविकास आघाडीमध्ये नाराजी दिसून आली. विरोधी पक्षनेते पदावरून मविआमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही पक्षांनी विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसचाच विरोधीपक्ष नेता होईल, असे वक्तव्य केले आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांकडूनही विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन पक्षामध्ये वाद रंगणार असे दिसते.
विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे, तर काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मविआचा विरोधीपक्ष नेता कोण होणार? याची राज्यात चर्चा सुरू आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधकांकडून विधिमंडळात बैठक घेण्यात आली. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा आणि विरोधी पक्ष नेते पद ठरवण्याबाबत चर्चा सुरू आहे.
या अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष नेता ठरवला जाईल, अशी दाट शक्यता होती. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील ठाकरे गट व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये विरोधीपक्ष नेते पदावरून नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काळात या पदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता आहे.
हिवाळी अधिवेशन उलटून सुद्धा विधानसभा विरोधी पक्षनेत्या संदर्भात निर्णय झाला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत विचार केला जाऊ शकतो. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्ष सकारात्मक असल्यास महाविकास आघाडीकडून विरोधी पक्षनेत्या संदर्भात नाव या अधिवेशन काळात दिले जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता येत्या काळात विरोधी पक्षनेत्याची घोषणा होणार की नाही ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.