
Nitesh Rane Controversy : माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांची अशी पिढी मी आजपर्यंत पाहिली नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे विधान आठवते का? काही महिन्यांपूर्वीच ते असे बोलले होते. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्याबद्दल शरद पवार यांनी ते विधान केले होते.
शरद पवार खरेच बोलले होते, हे नारायण राणे यांचे दोन्ही पुत्र सातत्याने सिद्ध करत आहेत. घटनात्मक पदावर बसलेल्या नितेश राणे यांना देशाची राज्यघटना, लोकशाही मान्य नाही का, असा प्रश्न त्यांच्या एका ताज्या वादग्रस्त विधानामुळे उपस्थित झाला आहे.
मी सर्वांना समान न्याय देईन, भेदभाव करणार नाही, अशी शपथ मंत्र्यांना दिली जाते. नितेश राणे यांनीही तशी शपथ घेतली आहे, मात्र त्यांच्या स्वभावात मुळातच असलेला उथळपणा काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. हा उथळपणा ते भाजपमध्ये (BJP) आल्यापासून नव्हे तर ते काँग्रेस, शिवसेनेत असतानाही होता. नितेश राणे हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी त्यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या विखारी टीकेचे स्क्रीनशॉट्स समाजमाध्यमांतून अधूनमधून व्हायरल होत असतात.
आपल्याला लोकशाही मान्य नाही, अशा आशयाचे विधान त्यांनी नुकतेच केले आहे. नितेश राणे (Nitesh Rane) हे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत. त्यांनी एक धक्कादायक तोंडी फतवा जारी केला आहे, निधी हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा, महाविकास आघाडीच्या सरपंचांना एक रुपयाही निधी देणार नाही, असे ते म्हणाले आहेत.
कुडाळ तालुक्यात भाजपच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे धक्कादायक विधान केले आहे. या मेळाव्यात काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र विरोधी पक्षच राहू नये, विरोधकांना निधीच मिळणार नाही, ही भाषा एका मंत्र्यांच्या तोंडी नक्कीच शोभणारी नाही. ग्रामपंचायतींना विकासासाठी जो निधी दिला जातो, तो कोण्या मंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या किंवा एखाद्या पक्षाच्या पदरचा पैसा नसतो.
तो जनतेचाच पैसा असतो. विरोधकांचा निधी अडवण्याचा अधिकार मंत्री नितेश राणे यांना कुठून मिळाला असेल? भाजप राज्यघटना बदलणार, असा आरोप काँग्रेस आणि अन्य विरोधकांकडून सातत्याने केला जातो. मंत्रिपदावर असलेल्या नितेश राणे यांचे हे विधान म्हणजे विरोधकांच्या आरोपात तथ्य असल्याचे निदर्शक आहे, असे म्हणता येईल. आपल्याला हवे त्या पक्षाला, हव्या त्या उमेदवाराला मत देण्याचा लोकांचा अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न मंत्री राणे करत आहेत.
भाजपमध्ये गेल्यापासून नितेश राणे हे सातत्याने ध्रुवीकरणाची भाषा करत आहेत. निवडणुकीतही त्यांनी अशीच वादग्रस्त विधाने केली होती. मंत्रिपदाच्या रूपाने याचे त्यांना बक्षिसही मिळाले. भाजपमध्ये समंजस नेत्यांचीही कमी नाही. अशा नेत्यांना डावलून नितेश राणे यांना मंत्रिपद देण्यात आले. मंत्रिपद कोणाला द्यावे, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, हे मान्य करावे लागेल, मात्र नितेश राणे यांच्यासारख्या वादग्रस्त, उथळ वक्तव्ये करणाऱ्या आमदाराला मंत्रिपद देऊन भाजपने त्यांच्या वादग्रस्त विधानांशी सहमती दर्शवली आहे काय, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. केंद्रातही भाजपची सत्ता आहे. अशा परिस्थितीत राज्यात करण्यासारखी सरकारसमोर अनेक कामे आहेत. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून केवळ आणि केवळ राजकारण सुरू आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मृत्यू या घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे. पक्षांच्या फोडाफोडीचा, नेत्यांच्या पक्षांतराचा मागचा अंक पुढे सुरू झाला आहे. राणे बंधूंच्या वादग्रस्त वक्तव्यांचाही मागचा अंक पुढे सुरू राहिलेला आहे.
सरकारला पाच वर्षे कोणताही धोका नाही, हे स्पष्ट आहे. मात्र त्यानंतर निवडणूक होणार आहे, हे महायुतीतील पक्ष लक्षात घ्यायला तयार नाहीत, असे दिसत आहे. लोकांना महायुतीतील पक्षांवर मोठा विश्वास टाकला आहे. तो पक्षांची फोडाफोडी करण्यासाठी, केवळ राजकारण करण्यासाठी, वादग्रस्त विधाने करण्यासाठी, लोकांचा अधिकार नाकारण्यासाठी, लोकशाही नाकारण्यासाठी लोकांनी अशा प्रकारचा विश्वास टाकला आहे, असा समज महायुतीचा झालेला दिसत आहे. लोकांची सर्वकाळ दिशाभूल करता येत नाही, हे या पक्षांनी लक्षात घ्यायला हवे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.