

SIR voter list controversy explained India: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालात २०७ जागांसह भाजपने दणदणीत बहुमत संपादन केले आहे. तर १५ वर्षांपासून सत्तास्थानी असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष थेट ८० जागांवर फेकला गेला आहे. या सत्ताबदलामागे भाजपच्या राजकीय रणनीतीसोबतच SIR प्रक्रियेमध्ये ३४ लाख ३५ हजार मतदारांचे विचारात न घेतलेले अपील निर्णायक ठरल्याची चर्चा आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा-२०२४ निवडणुकीत राज्यातील एकूण मतदारांची संख्या ७ कोटी ६० लाख १० हजार होती, तर २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण मतदारांचा आकडा सात कोटी ३४ लाख १४ हजार ७४६ इतका होता. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाने विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया राबवली.
‘एसआयआर’नंतर एकूण मतदारांची संख्या ६ कोटी ७५ लाख होती. म्हणजेच 'एसआयआर’अंती मतदारयाद्यांमधून तब्बल ९१ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. या वगळलेल्यांपैकी एकूण ३४ लाख ३५ हजार प्रभावित मतदारांनी अपील दाखल केले. मात्र निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात हे अपिल फेटाळण्यात आले.
दोन्ही ठिकाणी अपिल फेटाळण्यात आल्यामुळे या ३४ लाख ३५ हजार मतदारांना मतदान करताच आले नाही. आता निकालानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, या दोन्ही पक्षांना मिळालेल्या एकूण मतांमधील फरक ३२ लाख ११ हजार ४२७ इतका राहिला आहे. त्याचाच फटका तृणमूल काँग्रेसला बसल्याची चर्चा आहे.
मागील निवडणुकांमधील आकडेवारी :
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने ३४ जागा जिंकताना ३९.७७ टक्के मते मिळविली होती. २०१६ च्या विधानसभेत २११ जागा आणि ४४.९१ टक्के मते, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ जागा आणि ४३.६९ टक्के मते, २०२१ च्या विधानसभेत २१३ जागा आणि ४७.९४ टक्के मते, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत २९ जागा आणि ४६.१६ टक्के मते मिळविली होती. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र ८० जागा जिंकताना तृणमूल काँग्रेसचा आलेख ४०.८० टक्के मतांवर गडगडला आहे.
दुसरीकडे, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २ जागा जिंकत १७.०२ टक्के मते मिळविली होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत ३ जागा आणि १०.१६ टक्के मते, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १८ जागा आणि ४०.२५ टक्के मते, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत ७७ जागा आणि ३८.१४ टक्के मते, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत १२ जागा आणि ३८.७३ टक्के मते मिळवून ‘एसआयआर’ची प्रक्रिया राबविली जाण्यापूर्वी आपल्या कामगिरीत चढत्या कमानीने सातत्य राखले होते.
मात्र, या पाचही निवडणुकांमध्ये भाजपला तृणमूल काँग्रेसला मागे टाकणे शक्य झाले नव्हते. ते उद्दिष्ट २०२६ सहाव्या प्रयत्नात भाजपने साध्य केले आहे. २०२६ विधानसभा निवडणुकीत भाजपला २ कोटी ९२ लाख २४ हजार ८०४ मते तर तृणमूल काँग्रेसला २ कोटी ६० लाख १३ हजार ३७७ मते मिळाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.