
Nitesh Rane News : भाजप मंत्री व नेते नितेश राणे हे यांचं एका विधानामुळे राज्यात नवा वाद पेटला आहे. अर्थात त्यांचं विधानामुळे वाद ओढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अनेकदा विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेत वादग्रस्त विधान केली आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद, व्होट जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, केरळ हा मिनी पाकिस्तान,हलाल विरुद्ध झटका मटण असे एक ना अनेक वादग्रस्त विधानांचा सिलसिला नितेश राणेंकडून (Nitesh Rane) दर काही दिवसांनी सुरूच आहे.
पण सरकारमधील जबाबदार मंत्री असं विधानं करत असतानाही महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार सोडले तर कोणीच त्यांच्याविषयी कोणतीच स्पष्ट किंवा कठोर भूमिका घेताना दिसून येत नाही.त्यामुळे भाजप आणि त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून त्यांच्याच सर्वसमावेशक प्रतिमेलाच कुठेतरी धक्का बसण्याची शक्यता आहे.
नितेश राणे हे भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून समोर येत आहेत. ज्या ज्या ठिकाणी हिंदूंचा आवाज दाबला जातो, कुठलीही अत्याचार, अन्यायाची घटना घडते. तिथे नितेश राणे जाऊन धडकतात. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात ते कुठेही गेले तरी तिथे हिंदुत्ववादी संघटना,कार्यकर्त्यांचा मोठा गराडा अवतीभोवती जमताना दिसून येत आहे.
राणे यांच्या रोखठोक व कधी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या विधानांमुळे महायुती सरकारची अनेकदा कोंडीही झाल्याचे समोर आले आहे. तरीही नितेश राणेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूणच महायुती सरकारकडून एवढा फ्री हँड का दिला जातो,अशी शंका उपस्थित केली जात आहे. पण राणे कुटुंबाची राजकीय वाटचाल जर आपण पाहिली, तर त्यात मग नारायण राणे,निलेश राणे किंवा नितेश राणे असो यांनी संयमाचा मुखवटा कधीच चढवलेला नाही. त्यांची भाषणं किंवा कुठलीही प्रतिक्रियेलाच नेहमीच आक्रमकतेचीच धार लावलेली असते.
भाजप (BJP) नेते व मंत्री नितेश राणे यांच्या एका घोषणेमुळे महाराष्ट्रात सध्या नवा वाद पेटला आहे.राणे यांनी 'मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम' लाँच केले असून झटका मटण विक्री करणाऱ्या दुकानदारांना हे प्रमाणपत्र मिळणार आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व 100 टक्के हिंदू समाजाचा प्राबल्य असेल व विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल.कुठेही मटणामध्ये भेसळ झालेले आढळणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
'मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा, किंबहुना जिथे मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे मटण खरेदी करू नये असं आवाहनही यानिमित्तानं त्यांनी केलं आहे. यामुळे मुस्लिम व्यावसायिकांमध्य मोठी नाराजीची लाट पसरली आहे.तसेच विरोधकांकडूनही या घोषणेवरुन रान पेटवत सरकारला घेरण्याचं काम सुरू आहे.
काहीच दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन निर्माण झालेला वाद थांबायचं नाव घेत नसतानाच आता त्यांनी राज्यात मल्हार सर्टिफिकेशनवरुन नव्या वादाची वात पेटवली आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांनी धर्मांतर विरोधी कायद्याबाबत मोठं विधान केलं होतं. देशातील सर्वात कठोर धर्मांतर विरोधी कायदा महाराष्ट्रात आणला जाणार असल्याचे संकेत दिले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात अनेक लव्ह जिहादची प्रकरणे नोंदवली गेली होती,परंतु आता राज्यातील माता, बहिणी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी देशातील सर्वात कठोर धर्मांतर विरोधी कायदा आणला जाणार असल्याचं विधान केलं होतं.
याआधी भाजप मंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये एका कार्यक्रमात बोलताना निधी वाटपासंदर्भात वक्तव्य केलं होतं.एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठवड्यात नवीन वर्षाची यादी घेऊन बसणार आहे.सरपंचांची यादी मी घेऊन बसणार आहे.चला ठीक आहे भाजप 100 टक्के, उबाठा शून्य टक्के निधी, बोंबलत बसा,काही फरक पडत नाही, असं नितेश राणे म्हणाले.
तसेच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू होण्याआधीही त्यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे एक मागणी केली होती.त्यात राज्यातील दहावी आणि बारावीच्या परिक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात यावा असं म्हटलं होतं.
त्याआधी त्यांनी केरळ हा मिनी पाकिस्तान आहे,त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात,असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात,असं वादग्रस्त विधान केलं होतं.यांसारखे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणेंच्या वादग्रस्त विधानं जर आपण शोधत गेलो तर भली मोठी यादीच तयार होईल.
पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंविषयी खूपच राजकारण तापलं, तेव्हा क्वचितच प्रतिक्रिया दिली आहे. तसेच कधी कधी त्यांनी राणेंच्या भूमिकेचं समर्थनही केलं आहे.पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी नितेश राणेंना त्यांच्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या विधानांवरुन कठोर शब्दांत ठणकावलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हते असा दावा केलेल्या नितेश राणेंना इतिहास वाचण्याचा सल्ला दिला होता. ‘इतिहास वाचला तर लक्षात येईल शिवरायांसोबत मुस्लिम होते’.पुढे त्यांनी दोन्ही बाजूच्या सन्मानीय सदस्यांनी कोणत्याही वक्तव्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, याबाबतची काळजी घेतली पाहिजे,अशी भूमिकाही स्पष्ट केली होती. पण तरीही थांबतील ते राणे कसले.
भाजपकडे नेहमीच एक सुसंस्कृत,सामाजिक व राजकीय नीतीमूल्य,सर्वधर्मसमभाव,सद्भावना जपणारा आणि वैचारिक अधिष्ठान असलेला पक्ष म्हणून पाहिलं जातं. पण केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या भाजपमध्ये एकाहून एक टीकेची पातळी सोडलेल्या अशा वाचाळवीरांचा भरणा झाल्याचं दिसून येत आहे.यात गोपीचंद पडळकर,नितेश राणे, निलेश राणे,सदाभाऊ खोत यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे.त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांनी जपलेली भाजपची ओळख हळूहळू वाचाळवीर नेत्यांमुळे हरवू लागली आहे.
गेल्या काही वर्षांपासून आपण जर भाजपकडे बघितलं तर देवेंद्र फडणवीस हा एकच चेहरा असा आहे, जो राज्यभर मान्य आहे.राज्यातले सगळे आमदार,खासदार अगदी विरोधी पक्षातले नेते सुद्धा फडणवीसांचं राजकारणातले स्थान मान्य करतात.पण देवेंद्र फडणवीसांच्या वेळप्रसंगी आक्रमक,तर कधी संयमी भूमिकेत वावरतात.त्यांच्या अभ्यासू पण तितक्याच जशास तशी भूमिकमुळे विरोधकांनाही ते पुरून उरतात.
पण जेव्हा हेच चुकले त्याचे कान पकडणारे मुख्यमंत्री फडणवीस एकापाठोपाठ एक अशा वादग्रस्त विधानांनी सामाजिक सलोख्याला तडे जातील असे वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना समज न देता उलट फ्री हँडच देतात,तेव्हा समाजाच्या मनात कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते. आगामी काळात तरी त्यांच्याकडून नितेश राणेंवर कंट्रोल आणला जातो के पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.