Umesh Patil Vs Rajan Patil : सुनील तटकरे, अजितदादांनी उमेश पाटलांना निर्वाणीचा इशारा आताच का दिला?

Mohol NCP Dispute : मोहोळमधील या दोन नेत्यांच्या वादाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या पक्षश्रेष्ठींनीही दुर्लक्ष केल्याचेच दिसून आलेले आहे. या दुर्लक्षाचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळेच अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांना निर्वाणीचा इशारा दिल्याचे मानले जात आहे.
Umesh Patil-Rajan Patil
Umesh Patil-Rajan PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 22 September : राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि पक्षाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील वाद राज्याला सर्वश्रुत आहे. त्या वादावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेश पाटील यांचे नाव न घेता इशाऱ्याच्या माध्यमातून वाद मिटवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, उमेश पाटील हे माघार घेण्याच्या तयारीत नसल्याचे दिसून येत आहे.

कारण, पवार, तटकरेंच्या इशाऱ्यानंतर स्पष्टीकरण देताना स्थानिक राजकारणातून राजन पाटील यांना विरोध कायम राहील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे, त्यामुळे मोहोळ राष्ट्रवादीतील वाद यापुढेही कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत उमेश पाटील यांनी दिले आहेत.

मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील उमेश पाटील (Umesh Patil) आणि राजन पाटील (Rajan Patil) यांच्यातील संघर्षाने शेवटचे टोक गाठले आहे. त्यातच अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीवरून गेल्या महिनाभरापासून चांगलाच भडका उडाला आहे. याच मुद्द्यावरून आमदार यशवंत माने आणि उमेश पाटील यांच्या तू तू मैं मैं रंगली होती. अगदी एकेरी उल्लेख करत या दोघांनी एकमेकांचे वस्त्रहरण केले.

मोहोळमधील या दोन नेत्यांच्या वादाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आतापर्यंतच्या पक्षश्रेष्ठींनीही दुर्लक्ष केल्याचेच दिसून आलेले आहे. आता मात्र या दुर्लक्षाचे परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळेच अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी उमेश पाटील यांना निर्वाणीचा इशारा दिल्याचे मानले जात आहे.

अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी हे मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या छत्राखाली एकत्र आले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असूनही उमेश पाटील सहभागी आहेत. या संघर्ष समितीच्या वतीने विधानसभेला एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय झाला आहे. तो निर्णय प्रत्यक्षात अंमलात तर आमदार यशवंत माने यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

विधानसभेचे हेच गणित लक्षात घेऊन मोहोळमध्ये आज झालेल्या जनन्समान यात्रेत पहिल्यांदा सुनील तटकरे यांनी आणि त्यानंतर अजित पवार यांनी आपल्या भाषणातून नाव न घेता उमेश पाटील यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतरही उमेश पाटील हे काही केल्या राजन पाटील यांच्या विरोधातील लढाई थांबवायला तयार नसल्याचे दिसून येत आहे. कारण, तटकरे व पवारांनी केलेल्या टीकेबाबत स्पष्टीकरण देताना अगोदर राजन पाटील आणि यशवंत माने यांच्यावर कारवाई करा, कारण त्या दोघांनीच पक्षशिस्त मोडली आहे. त्यानंतरच माझ्यावर कारवाई करा, असे आव्हान दिले आहे.

दुसरीकडे अजित पवार यांच्या रद्द झालेल्या दौऱ्यासंदर्भात आपण कुठेही काहीही म्हटलेले नाही, त्यामुळे त्याबाबत आपल्याला काहीही बोलायचे नाही, असे सांगून उमेश पाटील यांनी अजित पवारांवरील आपली निष्ठा कायम दाखवली आहे. मात्र, ही निष्ठा दाखवतानाच मोहोळमध्ये स्थानिक राजकारणातून आपला राजन पाटील यांना विरोध कायम असेल, हेही सांगायला ते विसरले नाहीत, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा उमेदवार अडचणीत आलेला असतानाही उमेश पाटील आणि राजन पाटील यांच्यातील वर्चस्वाची लढाई काही केल्या थांबायला तयार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com