
Mumbai News : महाविकास आघाडी आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकींसाठी एकत्रितपणे सामोरे जाणार असे जाहीर केले आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित निवडणूक लढवणार असे सांगितले असले तरी जागावाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत जागावाटपांवरून तिढा निर्माण झाले आहे का? अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकींना सामोरे जाताना शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस तिन्ही पक्षांना सन्माजनक जागा हव्या आहेत. मात्र यावर समाधान होताना दिसत नाही.
महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब पक्ष) पक्षाने २०१९ सालच्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना-भाजप युतीमध्ये २३ जागा लढवल्या होत्या. यापैकी १९ जागा शिवसेनेने जिंकलेल्या आहेत. यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून २३ जागांवर दावा सांगण्यात येतो. यासंदर्भात पक्षाचे प्रवक्ते संजय राऊतांनी राज्यातील २३ लोकसभा जागांवर दावा सांगितला आहे. संजय राऊतांनी केलेला हा दावाच आता महाविकास आघाडीतील वितुष्टाचे कारण बनताना दिसत आहे.
संजय राऊतांनी २३ जागांवर दावा केल्यानंतर यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा तात्काळ प्रतिक्रिया दिली. लोकसभेतील जागावाटप हे निवडून येण्याच्या क्षमतेवर म्हणजेच मेरिटनुसार होणार असे त्यांनी म्हंटले. महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रेसचा राहिला आहे, असेही पटोले सांगायला विसरले नाहीत. जागावाटपचा निर्णय हा मेरिटनुसार होणार या नाना पटोलेंच्या वक्तव्यामागचा मतितार्थ शोधला तर शिवसेनेतल्या फुटीनंतर सर्व २३ जागांवर शिवसेना ठाकरेंकडे तुल्यबळ उमेदवार नाहीत असा आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाने २३ जागांवर दावा करू नये, असे पटोलेंना एकप्रकारे सुचवायचे असेल.
शिवसेनेच्या बहुतांश खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली असली तरी २०१९ च्या जिंकलेल्या जागा या आम्ही लढवणार असा ठाम सूर ठाकरे गटाचा आहे. तर २०१९ साली काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली, यामुळे काँग्रेसने ज्यादा जागांचा मागणी ही रास्त आणि वस्तुस्थितीला धरून नाही, असेही शिवसेनेकडून सांगण्यात आल्याची चर्चा आहे.
माध्यमातील बातम्यांनुसार महाविकास आघाडीत लोकसभेसाठी काँग्रेसने सात-आठ जागा लढावाव्यात असे सुचविण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र मागील दोन लोकसभा निवडणुका वगळता काँग्रेसचा कायम दबदबा राहिला आहे. काँग्रेस देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसला सन्मानजनक जागा मिळाव्यात, लोकसभेच्या जागा मेरिटनुसार लढवाव्यात असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. मात्र महाविकास आघाडीचा चेहरा हे उद्धव ठाकरेंचं असल्याचे स्पष्ट आहे. याचं प्रत्यय तिन्ही पक्षांची मिळून झालेल्या वज्रमूठीसेभेतून हे दिसून आले. शिवसेनेने जिंकलेल्या जागांवर ठाकरे गट आग्रही आहे. तेवीस जागांची मागणी केल्यानंतर किमान १९ जागा मिळाव्यात, यात कोणतीही तडजोड नाही, अशी भूमिका ठाकरे गटाची असल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्रातील ४८ लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीतील तिन्हा पक्षांनी समसमान लढवून, प्रत्येकाच्या वाट्याला १६-१६-१६ अशा जागांवर निवडणूक लढवण्याचा अंतिम प्रस्ताव येऊ शकतो,अशी दाट शक्यता आहे. समसमान जागांमुळे तिन्ही पक्षांचे समाधान होऊन भाजपपुढे तगडे आव्हान निर्माण करण्याचा महाविकास आघाडी प्रयत्नशील असेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.