Yavatmal : पुण्यात पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि विधिज्ञ असीम सरोदे यांना काही गुंडांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असून गृहमंत्री फडणवीस यांच्या प्रणित गुंडांचा हा हल्ला होता, असा आरोप आता विविध संघटना आणि राजकीय पक्षाकडून केला जात आहे.
या गंभीर घटनेचे राज्यात कुठेही पडसाद उमटले नाही. यवतमाळ शहर मात्र याला अपवाद ठरले. यवतमाळच्या आझाद मैदानात विविध राजकीय पक्ष, संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित येत उठावाच्या दिशेने पाऊल उचलले, त्याला कारणही तसेच आहे. विधिज्ञ सरोदे हे मूळचे यवतमाळचे आहेत. त्यांचे कुटुंब आजही यवतमाळ येथे वास्तव्यास आहे. नेमके हेच कनेक्शन या उठावाला कारणीभूत ठरले.
असीम सरोदे यांचे वडील हे सर्वोदयी नेते होते. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत मोठे योगदान दिले आहे. असीम सरोदे यांचे शिक्षणही यवतमाळ येथेच झाले. त्यांना अन्यायाविषयी प्रचंड चीड आहे. त्यातूनच ते व्यावसायिक नव्हेतर सामाजिक विधिज्ञ म्हणून ओळखले जातात. कुणालाही मदत करणे, हा त्यांचा स्थायीभाव असल्याने यवतमाळ येथे त्यांचा मोठा गोतावळा आहे.
पुणे येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह तिघांवर प्राणघातक हल्ला झाला. त्यात विधिज्ञ असीम सरोदे यांचाही समावेश होता. केवळ दैव बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून तिघेही सुखरूप बचावले. ही गंभीर घटना पुढे आल्यानंतर विविध संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमधून प्रचंड निंदा झाली. राज्य सरकारसह गृहमंत्र्यांवर आगपाखड करण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी, असा आरोपही होऊ लागला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हल्ल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात निदर्शने होतील, ही बाब सत्ताधारीच नव्हे विरोधक आणि जनसामान्यांना अपेक्षित होती. असे असताना राज्यात कुठेही या गंभीर घटनेचे पडसाद उमटले नाहीत. मात्र यवतमाळ त्याला अपवाद ठरले. पत्रकार वागळे यांच्यासह सरोदे यांच्यावर हला झाल्याचे समजताच, विविध संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वकील मंडळी एकत्र आली. सरोदेच नव्हेतर कुणावरही राज्यात असा हल्ला होऊ नये. प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. ही भावना सरोदे यांच्यावरील हल्ल्यानंतर यवतमाळकरांची होती. त्यातूनच 'निर्भय बनो' चळवळीची संकल्पना पुढे आली.
एवढेच नव्हेतर तोच धागा पकडत यवतमाळच्या आझाद मैदानात आज उठाव झाला. 'निर्भय बनो' हे एक आंदोलन नसून आता ती व्यापक चळवळ व्हावी. या चळवळीच्या माध्यमातून दंडुकेशाही आणि गुंडगिरीला उत्तर दिले पाहिजे, असा सूरही या उमटला. त्यामुळे आता या उठावाचे पडसाद राज्यभर उमटण्याची चिन्हे आहेत. नव्हेतर संपूर्ण राज्यात या 'निर्भय बनो' चळवळीचे लोन पसरण्याचे संकेत प्राप्त होत आहे.
सोशल माध्यमातून आणि सार्वजनिक कार्यक्रमातून कुणी सत्ताधाऱ्यांविरोधात व त्यातही भाजप विरोधी काही बोलल्यास तो टीकेचा धनी होतो. एवढेच नव्हेतर त्याच्या विरोधात पोलीस तक्रारी देत, गुन्हे दाखल केले जातात. तरीही ती व्यक्ती शांत न झाल्यास थेट हल्ले केले जातात, असा निर्भय बनो आंदोलनातील अनेकांचा सूर होता. ही मुस्कटदाबी कुठवर खपवून घ्यायची, अशी खदखदही व्यक्त होत आहे.
जय हो या हिंदी चित्रपटात सलमान खान या अभिनेत्याची मुख्य भूमिका आहे. तो अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढताना कथानकात दाखविले आहे. मात्र ज्या कुणाची तो मदत करतो, तेंव्हा त्याला धन्यवाद दिले जातात. तेंव्हा तो प्रत्येकाला थँक्स म्हणू नका, त्याऐवजी अडचणीत असलेल्या तीन लोकांची मदत करा, असे आवाहन करतो. त्यातून मोठी चळवळ उभी राहते. निर्भय बनो या आंदोलन वजा चळवळीतून जय होचा पट उलगडला जाईल का? ही येणारी वेळच सांगेल, एवढे मात्र निश्चित!
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.