
Mumbai News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे. भाजपने सदस्य नोंदणीत दीड कोटींचा टप्पा पार केला असून आता जगातील मोठा पक्ष झाला आहे. दुसरीकडे सर्वच पक्षाने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळत आता काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर बदल करण्याचे ठरवले आहे. प्रदेशाध्यपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड झाल्यानंतर आता काही बदल अपेक्षित आहेत. त्यामुळेच येत्या काळात काँग्रेसमध्ये खांदेपालट होणार असून आता युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार आहे.
काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षातील नेतेमंडळींची कानउघडणी केली आहे. त्याचवेळी प्रत्येक ठिकाणी बदल केले जाण्याची शक्यता गृहीत धरली जात होती. अधिवेशन काळातच काँग्रेसमध्ये अनेक संघटनात्मक बदल करण्याचे ठरले होते. त्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्याचे देखील ठरले होते. त्यानंतर आता काँग्रेसने येत्या काळात संघटनात्मक बदल करण्यास सुरुवात केली आहे.
2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला यश मिळाले. लोकसभेच्या 48 पैकी 14 जागी विजय मिळवता आला. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला. केवळ 16 जागी विजय मिळवल्याने विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद सुद्धा मिळवता आले नाही. या खराब कामगिरीनंतर नेतृत्वावर टीका झाली होती. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात नाराजी निर्माण झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली. त्यासोबतच येत्या काळात पक्षात खांदेपालट करण्याची तयारी सुरू आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता आहे आणि या प्रक्रियेत युवकांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी युवा, मेहनती आणि वफादार कार्यकर्त्यांना संधी देण्याचे संकेत दिले आहेत. नवीन चेहऱ्यांना पुढे आणण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लक्षात घेता हे बदल महत्वपूर्ण मानले जात आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता राज्यानुसार एक नवीन काँग्रेस बांधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसमध्ये तरुण नेत्यांना पुढे आणण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो, ज्यामुळे पक्षाच्या संघटनेत नवचैतन्य निर्माण होण्याची शक्यता आहे. तरुण नेतृत्वामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये नवे विचार, सोशल मिडिया प्रभाव आणि युवांशी जोडले जाण्याची शक्यता वाढणार आहे. यामुळे स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी संघटनेचे पुनरुज्जीवन होऊ शकते.
पक्षातील अंतर्गत समतोल राखण्यासाठी येत्या काळात तरुणांना संधी देताना ज्येष्ठ नेत्यांनाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. दोघांमधील संतुलन साधणे काँग्रेससाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे युवकांना संधी देताना सर्वच बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. काँग्रेस जर येत्या याकाळात खरोखरच नव्या युगासाठी सज्ज होत असेल, तर केवळ चेहऱ्यांची नव्हे, तर कार्यपद्धती, संवादशैली, निर्णयप्रक्रिया यामध्येही परिवर्तन आवश्यक आहे. नेत्यांनी ‘त्याग’ आणि ‘परिवर्तन’ हे केवळ घोषवाक्य न ठेवता त्याची अंमलबजावणी केली, तरच हे बदल येत्या काळात खऱ्या अर्थाने पचनी पडणार आहेत.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.