Pratap Sarnaik, Udhav thackeray
Pratap Sarnaik, Udhav thackeray sarkarnama
ठाणे

ठाकरेंसोबत फोटो काढायलाही आम्हाला बोलवत नव्हते...

Umesh Bambare-Patil

ठाणे ः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्व सूत्र राष्ट्रवादीच्या हातात होती. आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत वाढदिवसाचे फोटो सुध्दा काढायला बोलावले जात नव्हते. त्यावेळी आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या पण त्याकडे दूर्लक्ष केले गेले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आणि आम्ही त्यांच्यासोबत गेलो, असे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज ठाण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही शिवसेना वाढत नव्हती. याबाबतची खदखद आम्ही पत्राव्दारे उद्धव ठाकरे साहेबांच्या कानावर घातली होती, असे सांगून प्रताप सरनाईक म्हणाले, उद्धव साहेबांसारखा मुख्यमंत्री असताना कामे मात्र, राष्ट्रवादीची होत होती. त्या पत्राची दखल घेतली नव्हती. मात्र, आनंद वाटतोय की या पत्राची दखल राज्यातील शिवसेनेच्या ४० आमदारांनी घेतली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शिंदेसाहेबांचे आणि मी एकत्र काम करत आहोत. आमचे राजकिय करिअर एकाच वेळी सुरू झाले. १९९७ मध्ये ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. त्यानंतर चढती कमान वाढत जाऊन आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. ही ठाणेकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. डोंबिवलीचा रिक्षावाला ठाण्याचा आमदार झाला तर ठाण्याचा रिक्षावाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे, याचा आनंद आहे.

विरोधकांनी हे 'ईडी'चे सरकार आले, अशी बोंबाबोंब चालू केल्यानंतर श्री. फडणवीसांनी उभे राहून सांगितले की, होय हे 'ईडी'चे सरकार आहे. 'ई' म्हणजे एकनाथ शिंदे व 'डी' म्हणजे देवेंद्र फडणवीस असे या दोघांचे 'ईडी'चे सरकार सत्तेत आलेले आहे. मी कंगना राणावत आणि अर्णब गोसाबी यांच्याविरोधात हक्कभंग ठराव मांडला ही वस्तुस्थिती आहे. एका वास्तुविशारदाच्या पत्नीचा अर्ज माझ्याकडे आला होता.

त्यामध्ये त्यांच्या पतीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अर्णब गोस्वामीला राज्य सरकार मदत करतंय, असे म्हटलं होत. मी त्या विधवा महिलेची बाजू घेऊन राज्य सरकारसोबत भांडलो. त्यामुळे त्याला जेलची हवा खावी लागली. त्यावेळी ते महाराष्ट्रातील नेत्यांच्याविरोधात व पोलिसाच्या विरोधात बोलायला लागले, त्यावेळी त्यांच्याविरोधात हक्कभंगाचा ठराव मांडला.

कंगना राणावत ही सुध्दा पोलिस व मुख्यमंत्र्यांच्याविरोधात बोलत होती. तिच्या विरोधात ही मी शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून आवाज उठवला. 'एमएमआरडी'चा घोटाळा झालाच नव्हता, तरीही माझ्या मागे 'ईडी' लावली. पण, न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास असल्याने त्यांनी मला संरक्षण दिले. त्यावेळी राज्य सरकारकडून मला व माझ्या कुटुंबाला कोणतेही संरक्षण मिळाले नाही. आम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत वाढदिवसाचे फोटो सुध्दा काढायला बोलावले नव्हते. त्यावेळी आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

ज्यांनी तुमच्यावर आरोप केले ते किरीट सोमय्यामुळे तुमची ईडीची चौकशी झाली. आज ते तुमच्यासोबत आहेत, या विषयी काय सांगाल या प्रश्नावर ते म्हणाले, कालचक्र कोणासाठी थांबत नाही. ईडीच्या अधिकारी ज्यावेळी माझ्याकडे चौकशीसाठी आले होते, त्यावेळी सीआरपीएफचे जवान माझ्या घरी आले होते. आज तेच जवान माझ्या संरक्षणासाठी आहेत. काळ कोणासाठी कधी थांबेल हे सांगता येत नाही.

प्रत्येकाच्या नशीबात काय आहे, हे देवालाच माहिती आहे. पण, मी जुन्या गोष्टींचा कित्ता गिरविण्यापेक्षा आता ठाण्याच्या विकासाचे दिवस आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्या झाल्या एकनाथ शिंदेंनी माझ्या मतदारसंघासाठी त्यांनी किमान तीनशे ते साडेतीनशे कोटींचा निधी दिला आहे. त्याचा विनियोग कसा करावा, यासाठी मी आयुक्तांकडे चर्चा करण्यासाठी आलो होतो. झाले गेलं सगळं विसरून या मतदारसंघासाठी विकास कसा करता येईल, हे ठरविले जाईल.

किरीट सोमय्या कोण मोठा व्यक्ती आहे, त्यांनी आरोप केला म्हणून झाले. तो काय पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आहेत की त्यांच्या व्यासपीठावर मला जायला मिळले पाहिजे. विरोधी पक्षात असताना त्यांनी माझ्यावर आरोप केले. त्यांनी माझ्यावर केस केली मी त्यांच्यावर केस केली. आता ही न्यायालयीन प्रक्रिया चालू राहिल. व्यासपीठावर त्यांच्यासोबत बसायचे की नाही हे मी ठरवेन. ठाणे विधानसभा मतदारसंघात विकास कामे करण्यावर माझा भर राहिल.

काँग्रेसने आमदारांचे भवितव्य पहावे...

नवे सरकार जास्तवेळी टिकणार नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते करत आहेत. याविषयी ते म्हणाले, काँग्रेस आत असे म्हणणारच, कारण त्यांना त्यांचे आमदार टिकवायचे आहेत. शिंदेसाहेबांवर विश्वासदर्शक ठरावा वेळी काँग्रेसचे १० ते १२ आमदार गैरहजर होते. त्यांनी त्यांच्या आमदारांचे भवितव्य काय ते बघावे, मग आमचे सरकार टिकेल की नाही, यावर भाष्य करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

नगरसेवकांचे कौतूक...

शिवसेनेकडून सध्या मेळावे घेण्यास सुरवात झाली आहे, याविषयी ते म्हणाले, आम्हाला शिवसेनेकडून भरपूर काही मिळाले आहे. ठाणे महापालिकेच्या सगळ्या नगरसेवकांचे कौतूक करायला हवे. एक दोन वगळता ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठींबा दिला आहे. मिरा भाईंदर, कल्याण डोंबवली, उल्हासनगर, भिवंडी, नवी मुंबई असु द्यात सगळे नगरसेवक, नगरसेविका आमच्यासोबत आहेत. भविष्यात ठाणे शहराच्या विकासासाठी आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT