AAP Became Shivsena: अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पार्टी हा पक्ष दिल्लीच्या सत्तेतून पायउतार झाला, त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांचे राज्यसभेतील ७ खासदार भाजपत दाखल झाले. त्यानंतर आता ईडीच्या कारवाईमुळं पंजाबमधील या पक्षाच्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळं आता आपची अवस्था महाराष्ट्रातील शिवसेनेसारखी होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. यासाठी भाजपकडं बोट दाखवलं जात आहे.
पंजाबचे मंत्री संजीव अरोडा यांना ईडीनं अटक केली आहे. शनिवारी सकाळी अरोडा यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांची छापेमारी सुरु होती. सेक्टर दोनमध्ये अरोडा यांच्या निवासस्थानी तब्बल २० गाड्यांमधून ईडीचे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग इथं पोहोचला. गेल्या महिनाभरात अरोडा यांच्यावर ईडीनं दुसऱ्यांदा कारवाई केली आहे. यापूर्वी त्यांच्या लुधियानाच्या ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली होती.
दरम्यान, ईडीच्या मान सरकारमधील मंत्र्याच्या घरावरील ईडीच्या छामेपारीवर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, भाजपची ईडी संजीव अरोडा यांच्या घरी आली आहे. एका वर्षात ईडीनं तिसऱ्यांदा अशी हरकत केली असून महिन्याभरात दुसऱ्यांना हे झालं आहे. तरीही त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही. मी मोदींना सांगू इच्छितो की, पंजाब गुरुंची भूमी आहे. औरंगजेब देखील याला वाकवू शकला नाही. त्याचबरोबर ही भगतसिंग यांची भूमी असून त्यांनी इंग्रजांसमोर कधीही शीर झुकवलं नाही. त्यामुळं पंजाब मोदींच्या चालीसमोर झुकणार नाही. पंजाब ईडी आणि भाजपच्या या राजकीय अनैतिक युतीला संपवून टाकेन.
यानंतर संगरुर इथं पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री मान म्हणाले की, पंजाबचा बंधुभाव तोडण्याची भाजपची निती कधीच यशस्वी ठरणार नाही. तसंच पंजाबींसोबत होत असलेल्या अन्यायाला हीच पंजाबची जनता कडक उत्तर देईल. भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका करताना मान म्हणाले, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपाकडून बॉम्ब स्फोट, अब्रुनुकसानीच्या नोटीसा त्याचबरोबर ईडीची रेड अशी हत्यारं वापरते. भाजप आम्हाला अब्रुनुकसानीचं कारण सांगून भाजप आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्हाला याची पर्वा नाही, उलट मोदी सकारनं आपली हुकुमशाही आणि अशा कुप्त्या शोधून काढणं थांबवायला हवेत.
२०१९ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या ४० आमदारांसह सूरत, गुवाहाटीमार्गे पुन्हा मुंबई गाठली पण तेव्हा उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. त्याचबरोबर शिवसेनेच्या तत्कालीन १८ खासदारांपैकी १३ खासदार हे एकनाथ शिंदेंसोबत गेले तर केवळ ५ खासदार उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले.
यानंतर भाजपच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. त्यावेळी आमच्यामागे महाशक्ती असल्याचं शिंदेंनी म्हटलं होतं. ही महाशक्ती म्हणजे अर्थातच केंद्रातील मोदी सरकार असा अनेकदा खुलासाही त्यांनी केला होता. त्यामुळं मूळ शिवसेनेसोबत घडलेला हा प्रकार आता आम आदमी पार्टीसोबतही घडताना दिसतो आहे. त्यामुळं आपची आता शिवसेना होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.