Lok Sabha Election 2024 Sarkarnama
देश

Lok Sabha Election 2024 : 'या आत्म्याला आता '56 वर्षे' झाली'; पवारांचा मोदींना सणसणीत टोला!

Pradeep Pendhare

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मा महाराष्ट्रात हिंडतोय,' या विधानाचा शरद पवार यांनी श्रीगोंद्यातील सभेत चांगलाच समाचार घेतला. "या आत्म्याला 50 नाही, तर यंदा 56 वर्षे झाली आहेत. या 56 वर्षात मोदीसारखी कोणी व्यक्ती आली नव्हती. आज कोणाला तरी एका आत्म्याची चिंता वाटते. महाराष्ट्रात मोदींना खात्री नाही म्हणून पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या", असा टोला शरद पवार यांनी लगावला. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार नीलेश लंके यांच्या प्रचारासाठी श्रीगोंदे येथे आज शरद पवार यांची सभा झाली. या सभेत शरद पवार यांनी अनेक गंभीर मुद्यांवर भाष्य केले. देशाची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने होते की नाही, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळे देशातील निवडणुकांकडे जगाचे लक्ष लागले आहे, असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार म्हणाले, "ही लोकसभेची निवडणूक वेगळ्यापद्धतीची आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाली की, एकाचवेळी देशाचे मतदान व्हायचे. जास्तीत जास्त दोन दिवसात निवडणूक व्हायची. आज महाराष्ट्रातील निवडणूक पाच टप्प्यात घेतली आहे. परंतु उत्तरप्रदेशात निवडणूक दोन दिवसात होत आहे. महाराष्ट्रातील पाच दिवस का? कारण की, मोदींना खात्री नाही. त्यांना पुन्हा-पुन्हा येता यावे. यासाठी महाराष्ट्रातील निवडणुकांचे वेळापत्रक त्यांनी बदलले". देशातील लोकशाही संकटात आहे. जगात अमेरिका आणि भारत या दोन देशात मोठी लोकशाहीपद्धतीने निवडणुका होतात. अमेरिकेच्या जनतेला देखील भारतच्या निवडणुका, कशा होणार याची चिंता आहे. या निवडणुकीत लोकशाहीच्या पद्धतीने होते की नाही, याबाबत साशंकता लोकांच्या मनात आहे. जगाला सुद्धा देखील चिंता आहे. जगाचा सुद्धा मोदींवर विश्वास आहे का नाही, ही स्थिती आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

राज्यातील पंचायत राजच्या निवडणुका नाहीत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणुका नाही. आणखी काही दिवसानंतर विधानसभा आणि लोकसभेच्या सुद्धा, हेच चित्र पाहायला मिळेल. ते येऊ द्यायचे नसेल, तर वाटले ती किंमत देऊ लोकशाही आम्ही उद्धवस्त होऊ देणार नाही, असा निकाल तुम्हा-आम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे. मोदीला आम्ही जवळून पाहतो. मोदींना आम्ही संसदेत पाहतो. त्यांची मानसिकता आणि समजून घेण्याची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे देशाबाहेर सुद्धा शंकेची स्थिती आहे. त्याची नोंद तुम्ही-आम्ही घेतली पाहिजे. त्यासाठी या निवडणुकीत लोकशाही टिकेल, अशी राजवट या देशात आली पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. मोदींचा यावर विश्वास नाही. ते काल येथे येऊन गेले. अनेक ठिकाणी येऊन जातात. त्यांच्या भाषणात मी काय, उद्धव ठाकरे काय, यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांचे होत नाही. बोलण्याबद्दल काय हरकत नाही. देशाचा पंतप्रधान येतो आणि आमच्या टिका-टिप्पणी करतो. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांना दुसरे कोणी दिसत नाही, असेही शरद पवार यांनी म्हटले.

महाराष्ट्रात गेली 50 वर्षे एक आत्मा हिंडतो आहे, सगळीकडे, असे पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर येथील सभेत शरद पवार यांना उद्देशातून विधान केले होते. या विधानाचा शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, त्यांना सांगायचे आहे की, 50 नाही. मला विधानसभेत येऊन, यंदा 56 वर्षे झाली. त्यामुळे हा आत्मा 56 वर्षे महाराष्ट्रात फिरतोय. 56 वर्षे हा आत्मा शोधतोय की, मोदीसारखी कोणी व्यक्ती आलेली नव्हती. आम्ही इंदिरा गांधी पाहिल्या. कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू पाहिले. राजीव गांधी पाहिले. नरसिंह राव पाहिले. अनेकांबरोबर काम केले. यांची चिंता आम्हाला कधी वाटली नाही. पण आज कोण तरी एका आत्मा याची चिंता मोदींना वाटते. तो आत्मा महाराष्ट्राच्या सामान्य माणसाला, या आत्माची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल, यासाठी तो महाराष्ट्रात फिरतो आहे".

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना परवानगी का नाही?

शेतीचा प्रश्न काय सोडवले. कांद्याचा प्रश्नावर बोलायलाच नको. गुजरातच्या कांद्याला निर्यात करायला परवानगी. मग महाराष्ट्राला का नाही, असा प्रश्न उपस्थित करत शेतकर्‍यांना आधार देण्याची जबाबदारी सरकारची असते, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी ठणकावून सांगितले. 'काॅंग्रेस सरकारच्या काळात कांद्याचे भाव वाढले होते. तेव्हा भाजप विरोधी पक्ष होता. त्यावेळी मी कृषीमंत्री होतो. भाजप कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसदेत आंदोलन करत होते. माझ्याविरोधात घोषणाबाजी करत होते. पण मी कांद्यामुळे शेतकर्‍यांना दोन पैसे मिळत असतील, त्याचा भाव खाली येईल, असा कोणताही निर्णय घेण्यास ठाम नकार दिला.

सगळ्याच शेतीमध्ये समस्या निर्माण करून ठेवली आहे. याशिवाय बेरोजगारीचा प्रश्न तीव्र झाला आहे. भारतात शंभरपैकी 87 लोकांना नोकरी मिळत नाही. राज्य कशासाठी द्यायची तुम्हाला? राज्य यांच्या हातात द्यायचे नाही, असा निकाल घ्यावा लागेल', असे शरद पवार यांनी म्हटले. कोरोना काळातील नीलेश लंके (NIlesh Lanke) यांनी केलेले काम आपण विसरू शकत नाही. एवढी माणुसकी एका नीलेश लंकेच दाखवू शकतो, असेही शरद पवार यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT