Telangana municipal elections: तेलंगणात 123 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणच्या निकालाची उत्सुकता सर्वाना लागून राहिली होती. एकीकडे महाराष्ट्रात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली जात होती. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकार दूर करावेत व मतचोरीच्या विरोधात महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ईव्हीएमवर झालेल्या मतदानात भाजपला मोठे यश मिळाले होते. तर दुसरीकडे तेलंगणात 13 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसने विरोधकांचा धुव्वा उडवत एकहाती यश मिळवले आहे.
तेलंगणात 13 फेब्रुवारीला मतपत्रिकेवर निवडणुका झाल्या. त्याची मतमोजणी शनिवार पार पडली. या निवडणुकीत 2 हजार 996 वॉर्डांपैकी 2 हजार 995 वॉर्डांचे निकाल जाहीर झाले. त्यामध्ये बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 1 हजार 498 जागांच्या पुढे जात काँग्रेसने 1 हजार 537 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. टक्केवारीत बोलायचे तर 51.3 टक्के जागांवर विजय मिळवत काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
तेलंगणात सत्ताधारी पक्ष असलेल्या काँग्रेसविरुद्ध (Congress) नाराजी आहे, असा दावा करणाऱ्या विरोधकांना मतदारांनी फारसा प्रतिसाद दिलेला दिसत नाही. भारत राष्ट्र समिती (BRS) 781 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर भाजपला केवळ 336 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
तेलंगणात शहरी भागात आपला प्रभाव टिकवून ठेवणाऱ्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) ने 70 जागा जिंकल्या. अपक्ष उमेदवारांनी 183 जागा जिंकल्या. CPI(M) ला 13 आणि BSP ला 2 जागा मिळाल्या, तर TDP आणि जनसेना पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. या निवडणुकीत एकूण 1638 महिला निवडून आल्या, तर पुरुषांची संख्या 1356 राहिली.
हा विजय जनतेच्या विश्वासाचा थेट पुरावा : राहुल गांधी
तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. या विजयानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे निकाल सामाजिक न्याय, आदर आणि समावेशक विकासाच्या दृष्टिकोनाला जनतेचा पाठिंबा स्पष्टपणे दर्शवितात. त्यामुळे हा विजय जनतेच्या विश्वासाचा थेट पुरावा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेलंगणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील विजय हा काँग्रेस सरकारच्या लोकप्रिय धोरणांचे प्रमाणीकरण आहे. हा विजय तळागाळातील कार्यकर्त्यांचा आणि राज्यातील जनतेचा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.