Mumbai News : राज्यात चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले तर महाविकास आघाडीचा सुफडासाफ झाला. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले आहे. महायुतीमधील नाराजीनाट्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. त्यावेळी महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपद, खातेवाटप व पालकमंत्री पदावरून रस्सीखेच पहावयास मिळाली.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जवळपास 11 मंत्र्यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी त्यावेळेस मोठी रस्सीखेच पहावयास मिळाली. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राज्यात वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) मोठा पराभव स्वीकारावा लागला होता तर महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले होते. त्यामुळे नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र निवडणूक लढवत विजय मिळवला होता. या निवडणुकीत मोठे यश मिळल्याने महायुतीमध्ये मंत्रीपदासाठी मोठी रस्सीखेच पाहवयास मिळाली होती. त्यातच आता आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाच महिन्यापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. त्यामध्ये भाजपमधील 3, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 5 अशा एकूण 11 मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला. तर जवळपास 19 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतर राज्य मंत्री मंडळाच्या विस्तार होऊन पाच महिने उलटले आहेत. त्यानंतर याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिंगोली येथील कार्यक्रमप्रसंगी बोलताना राज्य मंत्रिमंडळाच्या खांदेपालट अर्थात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठे विधान केले. त्यामुळे आता सर्वच नेतेमंडळींचे त्याकडे लक्ष लागले आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करताना पाच महिन्यापूर्वीच त्यांनी अडीच वर्षामध्ये नवीन लोकांना मंत्रिपदाची संधी देणार, असा शब्द मी दिला होता. तो शब्द मी पाळणार आहे. त्यामुळे चिंता करू नका, असे यावेळी अजितदादा म्हणाले. त्यावेळी मंत्रीपदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शेवटी एकमत झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला होता. यावेळी अजित पवार यांच्या पक्षाने मंत्रिपदे देताना अडीच वर्षांचा फॉर्म्यूला ठरवला होता. त्यावर ते ठाम दिसत आहेत.
सध्या ज्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. त्यापैकी बऱ्याच जणांना अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर खुर्ची खाली करावी लागणार, असे त्यावेळी ठरले होते. म्हणजेच या पुढच्या अडीच वर्षांनी नव्या नेत्याला मंत्रिपदाची संधी देण्याचा फॉर्म्यूला ठरला होता. याच फॉर्म्यूलाचा हिंगोलीत येथील कार्यक्रमप्रसंगी अजित पवार यांनी नव्याने उल्लेख केला आहे. अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मी नवीन नेत्यांना मंत्रिपदाची संधी देणार आहे, त्यावेळी दिलेला मी शब्द पाळणार, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळात नेमके कोणते बदल होणार?
हिंगोलीत अजित पवार यांनी केलेल्या या विधानानंतर आता चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे आता फडणवीस यांच्या सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात नेमके कोणते बदल होणार याची उत्सुकता आतापासूनच शिगेला पोहचली आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळात खांदेपालट झाली तर कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे
येत्या काळात कोणाला संधी मिळणार?
महायुतीमधील तीन ही पक्षातील अनेक नेत्यांची मंत्रिपदी वर्णी न लागल्याने पक्षातील नाराज नेत्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या नाराज असलेल्या नेत्यांची येत्या काळात संधी मिळणार का? याची उत्सुकता आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी उफाळून आली होती. माजी मंत्री छगन भुजबळ मंत्रीपदी वर्णी न लागल्याने नाराज होते. त्यामुळे आता येत्या काळात देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अडीच वर्षानंतर कॊणाला मंत्रिपद देण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.