Pune News : सध्या राज्यामध्ये पोटनिवडणूक होत आहेत. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाबरोबरच दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर देखील पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने जुन्या राजकीय किस्साची चर्चा सुरू असल्याचा पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये कर्डिले पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर घडलेला किस्सा सर्वाधिक चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तर त्याचे घडलं अस होतं की, 1995 साली महाराष्ट्रात भाजप-सेना युतीचं सरकार येणार होते. पण सत्तेच्या चाव्या कुण्या एका पक्षाकडे नाही, तर अपक्षांच्या हाती होत्या. अशातच गोपीनाथ मुंडेंचा एका 'दुधवाल्या शेतकरी पोराला' फोन जातो... "शिवाजीराव, मला राज्यात उपमुख्यमंत्री व्हायचंय, तुमचा पाठिंबा हवाय..."
1995 साली राज्यात भाजप-सेना युतीचं सरकार येणार होतं. शिवसेनेने 73 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपने (BJP) 65 जागा जिंकल्या होत्या. सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती होत्या. 95 च्या निवडणुकीत तब्बल 3 हजार 996 अपक्ष उमदेवार रिंगणात होते. त्यापैकी तब्बल 45 आमदार झाले होते. त्यातलंच एक नाव होते नगर उत्तर विधानसभा मतदारसंघ अर्थात नगर-नेवासा मतदार संघातील शिवाजीराव कर्डीले यांचे.
काँग्रेसने (Congress) विजया कुटे यांना उमेदवारी दिली होती मात्र कुटे यांच्या नावाला त्यावेळच्या बड्या नेत्यांचा विरोध होता. अखेर सर्वानुमते बुऱ्हानगरचा सरपंच आणि बनेश्वर शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या दूधवाल्या शेतकरी पोराला म्हणजेच शिवाजीराव कर्डिले यांना अपक्ष उमेदवारी देण्याचे ठरलं. निवडणूक रंगली पण कर्डीले यांचा 26 हजार 714 मतांनी विजय झाला. एक दूधवाला शेतकरी पहिल्यांदा आमदार झाला होता. पण या पैलवानाची खरी किंमत निकालानंतर वाढली होती. कारण सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती होत्या.
निकाल लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी अपक्षांची यादी पाहिली, निवडणुका कशा झाल्या हे देखील पाहिले. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी यातलच एक नाव हेरले ते होते शिवाजीराव कर्डिले यांचे. तातडीने गोपीनाथ मुंडे यांनी शिवाजी कर्डिले यांना फोन केला फोनवरून गोपीनाथ मुंडे म्हणाले, 'शिवाजीराव मला राज्यात उपमुख्यमंत्री व्हायचय. तुम्हाला सेना-भाजप युतीला पाठिंबा द्यावा लागेल'. तो गोपीनाथ मुंडे यांचा शिवाजी कर्डिले यांना पहिला फोन होता आणि तेव्हापासून मुंडे आणि कर्डिले यांची जी नाळ जोडली गेली ती कायमस्वरूपी साठी.
कर्डीले पाठिंबा देण्यासाठी काहीतरी मोठी मागणी करणार असे मुंडेना वाटत होतं... पण ते शिवाजीराव होते, एक हाडाचा शेतकरी पाठिंब्याच्या मोबदल्यात शिवाजीरावांनी त्यांच्याकडे काहीच मागितले नाही. फक्त एक विनंती केली. ते म्हणाले की, 'माझ्या नेवासा तालुक्यातील काही भाग हा जिरायीत आहे. तिथे पिण्याच्या पाण्याची देखील वणवण आहे. मुळा आणि कुकडी धरणातून जर हा प्रश्न सोडवता आला तर बरे होईल'. नंतर गोपीनाथ मुंडे यांनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांच्या कार्यकाळात तो प्रश्न कायमचा मिटवला.
आता नगरच्या राजकारणातल्या एका अशा किंगमेकर पैलवानाच्या पश्चात आता राहुरी विधानसभेच्या आखाड्यात एक नवी आणि मोठी राजकीय कुस्ती रंगणार आहे. आता काळ बदललाय. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. याच पोकळीतून सुरू झाली आहे सत्तेची नवी साठमारी!
कर्डिलेंचा गड राखण्यासाठी आता तीन प्रमुख नावे शर्यतीत आहेत. पहिलं नाव अक्षय शिवाजीराव कर्डिले. शिवाजीरावांचे सुपुत्र. वडिलांची सहानुभूती आणि तळागाळातलं नेटवर्क अक्षय यांच्या पाठीशी आहे. पण बापाचा राजकीय वारसा पेलणं अक्षय यांना सोपं जाईल का? हे सर्वात महत्वाचं आहे.
दुसरं नाव आणि अक्षय कर्डीले यांना पक्षातूनच उमेदवारीसाठी टफ फाईट देणारे भाजप नेते डॉ. सुजय विखे पाटील. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुजय विखे राहुरीतून स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. विखेंची राजकीय ताकद कर्डिले गटाला भारी पडणार का? याकडे विशेष लक्ष असणारे कारण विखेनी भाजपच्या सर्व्हे नितीचा वापर करत आपले नाव पुढे रेटले आहे.
तिसरं नाव आहे प्राजक्त तनपुरे यांचे महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून हे राष्ट्रवादीचे नेते पुन्हा एकदा राहुरीवर वर्चस्व मिळवण्यासाठी दंड थोपटून उभे आहेत. तनपुरे भाजपमध्ये जाणार असल्याचा देखील चर्चा रंगल्या पण पुढे त्यांनी त्या खोडून काढल्या. इतकंच काय तर गाव भेट दौरे सुद्धा त्यांनी सुरु केलेत. आता 1995 ला अपक्ष लढून जिंकलेल्या शिवाजीराव कर्डिलेंच्या या मतदारसंघात आता खरी रंगत येणार आहे. सहानुभूतीची लाट, विखेंची राजकीय ताकद की तनपुरेंचा अनुभव... राहुरीचा गड कोण राखणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.