Mumbai News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात खळबळ निर्माण झाली होती. या हत्येनंतर बीड जिल्हयातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून तपास केला. पोलिसांनी तपास करून नऊ जणांना ताब्यात घेऊन मोक्का लावला आहे तर या प्रकरणांतील एक आरोपी फरार आहे. त्यानंतर आता या प्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे.
या सर्व प्रकारानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येवेळचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून कळाले की, संतोष देशमुखांची हत्या ही किती जास्त क्रूरपणे करण्यात आली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. सीआयडीने आपल्या आरोपपत्रात वाल्मिक कराडला नंबर एकचा आरोपी ठेवले आहे. त्यातच बीड जिल्ह्यातील बड्या नेत्यांने यावरुन माजी मंत्री धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) टार्गेट केले आहे.
मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही धनंजय मुंडे यांच्यावर सत्ताधारी व विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यातच भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी एका वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी धनंजय मुंडेंवर टीका केली आहे. सुरेश धस हे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच हे हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांना भोवले. त्यामुळेच मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे.
या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव आल्यापासून सतत धनंजय मुंडेंना टार्गेट केले जात होते. त्यावरूनच आता धस यांनी टीका केली आहे. शरद पवार साहेबांनी व अजितदादांनी राज्याच्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. त्यानंतर गेली पाच वर्षे तुम्ही राज्याचे मंत्री होता. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद व सर्व जबाबदारी मुंडे यांच्यावर होती. मात्र, त्याकाळात सर्वांशी जुळवून घेत तुमच्या पाठीशी पक्षातील एकादा आमदार तर हवा होता. मात्र, तसे काही केले नाही.
विशेष म्हणजे या काळात वाल्मिक कराड यांचे ऐकून सर्वच जिल्ह्यातील नेतेमंडळीशी वैर घेतले. त्यामुळे मुंडे यांच्या पाठीशी कोणीच उभे राहिले नाही. त्यांच्या एकेकाळी जवळ असलेले बजरंग सोनवणे यांनी देखील त्यांची कराड यांच्यामुळेच साथ सोडली. साथ सोडल्यानंतर बजरंग सोनवणे आघाडीकडे जाऊन जिल्ह्याचे खासदार झाले. हे सर्व लक्षात येऊनही मुंडे यांनी त्यांच्या वागण्यात काही बदल केला नाही. त्यामुळेच धनंजय मुंडेंना कराडमुळे बीडच्या राजकारणात मित्रच उरला नसल्याचे स्पष्ट केले.
अजित पवार यांनी तुमच्याकडे मोठी जबाबदारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्हाला एवढा मान दिला होता. 2019 पर्यंत तुम्ही फार चांगले वागत होतात. 2019 नंतर तुम्ही कुणीकडचे कुणीकडे गेलात, अशा शब्दांतही यावेळी सुरेश धस यांनी मुंडेंवर टीका केली.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.