Fake FDA Raid Akola: वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात कारवायांचा धडाका लावला आहे. त्यांच्या या कारवायांनी राज्यभरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. याचाच गैरफायदा घेत एका टोळीने अकोला जिल्ह्यात दोन दुकानांवर बनावट रेड केल्याची घटना समोर आली आहे.
अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी शहरात अन्न व औषध प्रशासनाच्या नावाने आलेल्या कथित पथकाने दोन दुकानांची चौकशी केली. त्यानंतर संशयास्पदरित्या तिथून पसार झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता “आम्ही कोणतेही अधिकृत पथक बार्शिटाकळी येथे पाठविले नव्हते” असे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार (१५ जून) रोजी काही व्यक्तींनी स्वतःला अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगत शहरातील एका किराणा दुकानाची आणि एका स्वीट मार्टची चौकशी केली. या कारवाईची माहिती शहरात पसरताच अनेक पानटपऱ्या, हॉटेल्स, गुटखा विक्रेते व इतर व्यावसायिकांनी घाईघाईने दुकाने बंद केली. मात्र कथित पथकाने इतर कोणत्याही दुकानांची तपासणी न करता काही वेळातच तेथून काढता पाय घेतला.
या दरम्यान संबंधित व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मी दर्शन’ झाल्याच्या चर्चांनी शहरात जोर धरला आहे. जरी या आरोपांना अधिकृत दुजोरा मिळालेली नसला तरी कारवाईची पद्धत, मर्यादित चौकशी आणि त्यानंतरचे संशयास्पद गायब होणे यामुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शहरातील नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींची ओळख उघड करावी, अशी मागणी होत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशा कोणत्याही अधिकृत पथकाला बार्शिटाकळी येथे पाठविले नसल्याचे सांगितले. त्यामुळे शहरात फिरणारे हे पथक खरोखरच विभागाचे होते की प्रशासनाच्या नावाचा गैरवापर करून काही तोतयांनी व्यावसायिकांना लक्ष्य केले, याची चौकशी होणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
जर खरोखरच तोतया पथकाने सरकारी अधिकाऱ्यांचे नाव वापरून चौकशी केली असेल, तर हा प्रकार केवळ फसवणुकीपुरता मर्यादित नाही. यातून शासनाच्या प्रतिमेला काळिमा फासणारा आणि कायद्याची पायमल्ली करणारा गंभीर गुन्हा ठरू शकतो. अशा प्रकारामुळे प्रामाणिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून प्रशासनावरील विश्वासालाही तडा जाऊ शकतो. भविष्यात अशा तोतया पथकांच्या माध्यमातून नागरिक आणि व्यावसायिकांची फसवणूक होण्याचा धोका वाढू शकतो.
याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे अकोलाचे सहाय्यक आयुक्त देवानंद वीर म्हणाले, बार्शिटाकळी येथे दि. १५ जून रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या नावाने कोणतेही अधिकृत पथक पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे संबंधित व्यक्ती खरोखर विभागाचे अधिकारी होते की नाहीत, याची शहानिशा करणे आवश्यक आहे. जर कोणी विभागाचे नाव वापरून कारवाई केल्याचा बनाव केला असेल, तर तो गंभीर स्वरूपाचा प्रकार असून त्याची सखोल चौकशी करण्यात येईल.
संबंधितांकडे याबाबत ठोस पुरावे, छायाचित्रे, व्हिडिओ किंवा इतर माहिती असल्यास ती प्रशासनाकडे सादर करावी. दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद व्यक्तींची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, असेही आवाहन वीर यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.