<div class="paragraphs"><p>Sindhudurg District Co-operative Bank election</p></div>

Sindhudurg District Co-operative Bank election

 

Sarkarnama

कोकण

राणे-शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सिंधुदुर्ग बॅंकेसाठी ९८. ६७ टक्के मतदान

सरकारनामा ब्यूरो

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि भाजप (BJP), राणे कुटुंबीयांसह (narayan rane) महाविकास आघाडीने (mahavikas Aaghadi) प्रतिष्ठेच्या बनविलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (sdcc bank election) संचालकपदाच्या निवडणुकीसाठी आज 98.67 टक्के मतदान झाले. 981 पैकी 968 मतदारांनी हक्क बजावत 19 संचालक पदासाठी रिंगणात असलेल्या 39 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले. मतदानावेळी कणकवलीत बाचाबाची, घोषणाबाजी वगळता जिल्ह्यातील इतर केंद्रात शांततेत प्रक्रिया झाली. उद्या (ता. 31 डिसेंबर) सकाळी 9 वाजता सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीत मतमोजणी सुरू होणार आहे. (In Election of Sindhudurg District Co-operative Bank 98. 67 percrnt)

दरम्यान, कणकवली येथे सकाळच्या सत्रात जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या जोरदार खडाजंगी झाली. तर मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तंग झाले होते. मात्र, अन्यत्र निवडणूक शांततेत पार पडली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी आठही तालुका तहसील कार्यालयात मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. मतदानासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निवडणुकीत जिल्हा बँकेवर मतदानद्वारे 19 संचालक निवडून द्यायचे होते, त्यासाठी 981 मतदार निश्चित झाले होते. 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्ष ही महाविकास आघाडी समृद्धी विकास पॅनेल म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या विरोधात भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक परिवर्तन पॅनेल उभे होते. दोन्ही बाजूकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही पॅनेलने तगडे उमेदवार देत एकमेकांसमोर तगडे आवाहन उभे केले होते.

या निवडणुकीत आठ तालुका मतदार संघातून आठ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी कणकवलीमध्ये शिवसेनेकडून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत विरोधात भाजपचे विठ्ठल देसाई, देवगड तालुक्यात महाविकास आघाडीकडून अपक्ष अविनाश माणगांवकर विरुद्ध भाजपचे प्रकाश बोडस, वैभववाडी तालुक्यात सेनेचे दिगंबर पाटील विरुद्ध भाजपचे मोहन रावराणे, मालवण तालुक्यात राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस विरुद्ध भाजपचे कमलाकांत कुबल, कुडाळ तालुक्यात काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर विरुद्ध भाजपचे प्रकाश मोर्ये व भाजप बंडखोर सुभाष मंडव, वेंगुर्ले तालुक्यात काँग्रेसचे विलास गावडे विरुद्ध भाजपचे मनीष दळवी, सावंतवाडी शिवसेनेचे विद्याधर परब विरुद्ध भाजपचे गुरुनाथ पेडणेकर, दोडामार्ग सेनेचे गणपत देसाई विरुद्ध भाजपचे प्रकाश गवस यांच्यात लढत झाली.

उर्वरित जिल्हास्तर अकरा मतदारसंघातील पतसंस्था मतदार संघातून शिवसेनेचे सुशांत नाईक विरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, पणन मतदार संघातून राष्ट्रवादीचे सुरेश दळवी विरुद्ध भाजपचे अतुल काळसेकर, मजूर-औद्योगिक मतदार संघातून सेनेचे लक्ष्मण आंगणे विरुद्ध भाजपचे गजानन गावडे, मश्चिमार व दुग्धसंस्था मतदार संघातून राष्ट्रवादीचे मधुसूदन गावडे विरुद्ध भाजपचे महेश सारंग, घर बांधणी देखरेख संस्थेतून राष्ट्रवादीचे विनोद मर्गज विरुद्ध भाजपचे संदीप परब, वैयक्तिक मतदार संघातून काँग्रेसचे विकास सावंत विरुद्ध भाजपचे समीर सावंत, दोन महिला प्रतिनिधी मतदार संघातून सेनेच्या अनारोजीन लोबो व काँग्रेसच्या नीता राणे विरुद्ध भाजपच्या अस्मिता बांदेकर व प्रज्ञा ढवण, अनुसूचित जाती मतदार संघातून राष्ट्रवादीचे आत्माराम ओटवणेकर विरुद्ध भाजपचे सुरेश चौकेकर, इतर मागास मतदार संघातून सेनेचे मनीष पारकर विरुद्ध भाजपचे रवींद्र मंडगांवकर, विमुक्त-भटक्या जमाती मतदार संघातून काँग्रेसचे मेघनाथ धुरी विरुद्ध भाजपचे गुलाबराव चव्हाण अशी लढत झाली.

मतदान प्रक्रिया यंत्राद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्यात आले. एका मतदाराला एकूण सहा मते देण्याचा अधिकार होता. यामध्ये राखीव पाच मतदार संघात पाच मते व ज्या संस्थेचा मतदार आहे त्या मतदार संघासाठी एक, अशी एकूण सहा मते द्यायची होती. त्यानुसार 981 पैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये मालवण, कुडाळ, दोडामार्ग या तीन तालुक्यांत 100 टक्के मतदान झाले आहे. तर सावंतवाडी 99.52 टक्के, वेंगुर्ले 94.79 टक्के, कणकवली 97.57 टक्के, वैभववाडी 54.53 टक्के, देवगड 83.81 टक्के असे तालुकानिहाय मतदान झाले आहे.

जिल्हा निवडणूक पाश्वभूमीवर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला व त्यानंतर ढवळून निघालेला जिल्हा यामुळे ही निवडणूक राज्यस्तरावर गाजली होती. यापूर्वी कधीही झाला नव्हता, एवढा हंगामा या निवडणुकीत झाला होता. तसेच प्रचारादरम्यान खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राबाहेर कडक बंदोबस्त लावला होता. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी घातली होती. तसेच मतदान केंद्राबाहेर उभारलेल्या बूथवर पोलिसांची करडी नजर होती.

तेरा जणांची मतदानाला गैरहजेरी

981 पैकी 968 मतदारांनी मतदान केले. 13 मतदार मतदान करण्यासाठी आले नाहीत. यात वेंगुर्ले पाच, कणकवली चार, वैभववाडी एक, देवगड दोन आणि सावंतवाडी एक अशाप्रकारे मतदार आले नाहीत. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने व जिल्हा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळल्याने भाजप पुरस्कृत पॅनेलचे वेंगुर्ले तालुका उमेदवार मनीष दळवी मतदानासाठी जाऊ शकलेले नाहीत. तसेच याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत हे सुद्धा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला असल्याने मतदान करू शकलेले नाहीत.

महाआघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील : सावंत

ही शेतकऱ्यांची बँक आहे. आमचे पॅनेल शेतकऱ्यांसाठी काम करते, त्यामुळे उद्या निकालावेळी शेतकऱ्यांचा विजय होणार आहे. आपल्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होणार, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT