Mumbai News : राज्यातील लोकसभेच्या सात जागेसाठी 16 मार्चला निवडणूक होणार होती, मात्र या येत्या काळात रिक्त होत असलेल्या सात जागेसाठी सातच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून सोमवारीअधिकृतरित्या सात जणांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्राला 5 नवीन खासदार मिळाले आहेत. त्यामध्ये भाजप नेते विनोद तावडे, पार्थ पवार पहिल्यांदाच राज्यसभेवर गेले आहेत तर ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची हॅट्रिक झाली आहे.
राज्यातील 2 एप्रिल रोजी रिक्त होत असलेल्या सात जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी सात जणांचे उमेदवारी अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी निवडणूक आयोगाकडून करण्यात आली . या सात जागेपैकी सहा जागांवर महायुतीचे वर्चस्व आहे. त्यामध्ये भाजपच्या (BJP) वाट्याला 4, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 1, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक तर महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या पक्षाला एक जागा मिळाली.
राज्यातून बिनविरोध झालेल्या खासदारांमध्ये भाजपकडून माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde), आरपीआय (आठवले गट) पक्षाचे प्रमुख तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे हिंगोलीत नेते रामराव वडकुते, नागपूरच्या भाजपच्या नेत्या माया इवनाते, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या ज्योती वाघमारे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्राला 5 नवीन खासदार मिळाले आहेत. त्यामध्ये भाजप नेते विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार, भाजपचे रामराव वडकुते, माया इवनाते, शिवसेनेच्या ज्योती वाघमारे या पहिल्यांदाच राज्यसभेवर गेल्या आहेत तर ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची हॅट्रिक झाली आहे. विशेष म्हणजे शरद पवार, रामदास आठवले तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत.
विधानसभेतील संख्याबळ पाहता राज्यसभेचा एक उमेदवार निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांची गरज होती. महायुतीचे संख्याबळ 232 आहे. तर महाविकास आघाडीकडे 46 मते आहेत. त्यामुळे महायुतीचे सहा व महविकास आघाडीचा सहज निवडून येणार होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 20 मते तर अजित पवार यांच्या पक्षाकडे तीन मते अतिरिक्त आहेत. त्यामुळे ऐनवेळी मतांची जुळवाजुळव करून भाजप सातव्या जागेसाठी ताकद लावण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु सातव्या जागेसाठी शरद पवार यांचे नाव निश्चित झाल्याने महायुतीने सातवा उमेदवार दिला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार, फौजिया खान तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे डॉ. भगवत कराड , धैर्यशील पाटील तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील हे सात जण 2 एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त जागेसाठी ही निवडणूक पार पडली.
यामध्ये शरद पवार, रामदास आठवले यांना पुन्हा संधी देण्यात आली. दोघेही तिसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत. तर इतर पाच जण पहिल्यांदा खासदार झाले आहेत. यामध्ये भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना एक व अजित पवार यांच्या राष्टवादी काँग्रेसचा एक-एक खासदार वाढला आहे. तर काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचा दोन पैकी एक खासदार कमी झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.