Devendra Fadnavis Mahatama Phule Yojana .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: 'महात्मा फुले' योजनेत तब्बल 16 हजार संशयास्पद प्रकरणं, त्यात एकट्या नाशिकमधील 9500; CM फडणवीसांची मोठी घोषणा

MLA Rahul Aher News: चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत आपल्याच सरकारलाच घरचा आहेर दिला होता.

Deepak Kulkarni

Mumbai News: भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांनी राज्यातील गोरगरीबांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना असलेल्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर मुद्दा उपस्थित केला होता. तसेच सरकारला घरचा आहेर देताना पावसाळी अधिवेशनात या गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणीही उचलून धरली होती. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अत्यंत मोठी घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी(ता.9 जुलै) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी या गैरव्यवहार आणि संशयास्पद प्रकरणांवर नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांतील तज्ज्ञांचा समावेश असणाऱ्या विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,राज्य आरोग्य योजनांमध्ये 2024 ते 2026 या कालावधीतील तपासणीत सुमारे 16 हजार संशयित दावे व शस्त्रक्रियांची नोंद आढळली आहे. त्यापैकी 9,500 प्रकरणे नाशिक जिल्ह्यातील आहेत. या प्रकरणी नाशिकमधील पाच रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करत या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशी केली जाणार आहे. या पथकाचा अहवालप्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

तसेच संबंधितांकडून अपहार झालेल्या निधीची वसुली केली जाईल. यावेळी त्यांनी भविष्यातील अशाप्रकारचे गैरव्यवहार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही करण्यात येणार असल्याचं सांगितलं.

आयुष्मान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य या दोन अत्यंत योजना आढावा बैठक विधीमंडळात झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार डॉ. राहुल आहेर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ निपुण विनायक, सचिव ई रवींद्रन यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी गरीब आणि गरजू नागरिकांना दर्जेदार व पारदर्शक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचा दावा केला आहे. तसेच सरकारच्या जनआरोग्य योजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार कदापि सहन केला जाणार नसल्याचंही ठणकावून सांगितलं.

या योजनांमधील संशयास्पद संभाव्य फसवणूक प्रकरणांची अत्याधुनिक विश्लेषण प्रणालीद्वारे छाननी करत त्यांची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहितीही फडणवीसांनी दिली. यावेळी त्यांनी आरोग्य क्षेत्रातील डिजिटल व्यवहारांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर तातडीने कारवाई करण्यासाठी समन्वित यंत्रणा विकसित करण्यात येणार असल्याचं म्हटलं.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या योजनांमधील संशयास्पद गैरव्यवहारांमधील अत्यंत मोठ्या रकमेच्या उपचार दाव्यांचे विशेष लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र पडताळणी केली जाईल. संशयास्पद आणि पूर्वीपासून चिन्हांकित करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याचसोबत भविष्यात आरोग्य योजनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, डेटा विश्लेषण, सायबर तपास आणि कठोर लेखापरीक्षणांद्वारे आर्थिक फसवणुकीवरुन प्रभावी नियंत्रण आणून योजनांवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ केला जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत आपल्याच सरकारलाच घरचा आहेर दिला होता. तसेच गरीब रुग्णांसाठी असलेल्या या योजनांमध्ये झालेल्या अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती.

आमदार राहुल आहेर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे सांगितले की, 2024 ते 2026 या कालावधीत 16 हजारांहून अधिक संशयास्पद प्रकरणे समोर आली. ज्यात एकाच मोबाईल क्रमांकावरून अनेक रुग्णांची नोंदणी झाल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. यापैकी तब्बल 9 हजार 500 प्रकरणे एकट्या नाशिक जिल्ह्यातील असून, त्यातील सुमारे 8 हजार 500 दावे फक्त 5 रुग्णालयांमधून करण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता.

ज्यांनी प्रत्यक्षात कोणतेही उपचार घेतलेले नाही किंवा अस्तित्वात नसलेल्या रुग्णांच्या नावावर शस्त्रक्रिया दाखवून शासनाकडून निधी उचलण्यात आल्याची बाबही त्यांनी सभागृहात मांडली. चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाशिकला भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी संबंधित पोर्टल बंद पडल्याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, असा संशय त्यांनी व्यक्त केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT