Shivsena News : एसआयआर आणि आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत सध्या छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. संघटनात्मक बांधणीवर जोर आणि पक्षांतर्गत गटबाजी मोडून काढा, असे आवाहन ते आपल्या भाषणातून करत आहेत. आज अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.
विधानसभा निवडणुकीत निसटता विजय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात स्थान न मिळालेल्या अब्दुल सत्तार यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासमोर मोठे शक्ती प्रदर्शन केले. गेल्या दीड-दोन वर्षापासून सत्तार हे शिवसेनेच्या नेत्यांपासून अंतर राखून होते. मतदारसंघ एके मतदारसंघ असाच त्यांचा या काळातील उपक्रम राहिला. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती निवडणुकीत सत्तार यांच्या एकहाती वर्चस्वाला भाजपकडून धक्का बसला.
सिल्लोड नगरपरिषदेत सत्तार यांनी सत्ता कायम राखली असली तरी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेवर भाजपने (BJP) कुरघोडी केली. सिल्लोड-सोयगाव मतदारसं`घातील सोयगाव तालुक्यातही सत्तार यांना भाजपाने धक्का दिला. पंचवीस वर्षाच्या एकाहाती सत्तेला तडे गेल्यामुळे सत्तार सध्या अतिशय सावध पावले टाकताना दिसत आहेत. राज्य पातळीवरील नेत्यांशी संपर्क वाढवण्यावरही त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू मंत्र्यांपैकी एक आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर मतदारसंघात शक्ती प्रदर्शन करत अब्दुल सत्तार यांनी सगळं अलबेल असल्याचे भासवले. सामंत यांनीही आपल्या भाषणात सत्तार यांचे कौतुक करत त्यांना गोंजारण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्तार यांनीच आपल्या भाषणात मतदारसंघात शिवसेनेची (Shivsena) ताकद कमी झाल्याची कबुली देत आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. युवक व महिलांचा एसआयआरमध्ये अधिक सहभाग वाढवण्यावर भर देत ग्रामीण भागातील शिवसेना शाखांची पुनर्बांधणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सिल्लोडच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. असे असले तरी जिल्ह्यात शिवसेना पक्ष मागे पडत आहे, त्यामागील कारणांचा शोध घेऊन आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचे सत्तार म्हणाले.
सत्तारांचे हात बळकट करा..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढवण्यासाठी प्रत्येकाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी झोकून देऊन काम करावे. पक्षामध्ये कोणतीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येकाने पक्षाला प्रथम प्राधान्य देत संघटन वाढीसाठी काम करावे, असे आवाहन उदय सामंत यांनी केले. आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारसंघात चांगली संघटना उभी केली आहे. त्यांनी मांडलेल्या पक्षाच्या अपेक्षा व भूमिका वरिष्ठ नेतृत्वापर्यंत निश्चित पोहोचवल्या जातील.
विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील निर्णय पक्षाचे नेते एकनाथ शिंदे घेतील, कार्यकर्त्यांनी आमदार अब्दुल सत्तार यांचे हात अधिक बळकट करावेत, असे आवाहन उदय सामंत यांनी यावेळी केले. पूर्वी जिल्हाप्रमुख पदाचा मोठा दरारा होता. आजही जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांचा आदरयुक्त दरारा निर्माण करून संघटन वाढीसाठी सक्रिय राहावे. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या बूथची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून घरभेटी घ्याव्यात, प्रत्येक मतदाराची प्रत्यक्ष पडताळणी करावी तसेच मृत, स्थलांतरित व दुबार नावे वगळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावेत, अशा सूचना एसआयआरवर मार्गदर्शन करतांना सामंत यांनी उपस्थितांना दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.