Ajay Maharaj Baraskar, Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil News : आडमुठेपणा झाला हे आता मान्य करावे; बारस्कर महाराजांचा जरांगेंना सल्ला

Amol Sutar

Maratha Reservation News : मनोज जरांगे-पाटील यांच्यावर केलेले अनेक आरोप त्यांनी कबूल केले आहेत. त्यांच्या आडमुठेपणामुळे समाजाचे नुकसान झाले आहे. याआधी एकही नेता तुमच्यावर टीका करत नव्हाता, पण कालपासून तुमच्यावर प्रचंड टीका होत आहे. तुम्ही केलेला हेकेखोरपणा, आतताईपणा आणि आडमुठेपणा कबूल करावा, असा सल्ला अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

बारस्कर महाराज या वेळी म्हणाले, हे जे काही चालू आहे ते थांबवा असे वारंवार मनोज जरांगे पाटील यांना सांगत होतो. मात्र, त्यांनी न ऐकता हेकेखोरपण, आतताईपणा केला. आता त्यांना त्यांची चूक कळते. हेच आम्ही काय इंग्रजी सांगत होताे का? असा सवाल बारस्कर महाराज यांनी या वेळी जरांगेंना केला, तर मी विचार करून निर्णय घेतो, असे आम्हालाच जरांगे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले.

आज कोटींची सभा असणारा समाज दोनशे लोकांवर आला आहे. याच्या आधी तुमच्यावर एकही नेता टीका करत नव्हाता, कालपासून तुमच्यावर प्रचंड टीका होत आहे. प्रसाद लाड यांनी तुमच्यावर 'नटसम्राट' म्हणून टीका केली. 'नटरंग' चित्रपट पाहिल्यानंतर नटसम्राट म्हणजे काय हे कळते.

हा तुमचा अपमान नाही तर तुमच्या पाठीमागे असणाऱ्या मराठा समाजाचा अपमान आहे. तुमच्यामुळे मराठा समाजाला खालच्या दर्जाची वागणूक मिळायला लागली आहे, असा आरोप अजय बारस्कर महाराज यांनी या वेळी केला. मात्र, आमच्या बोलण्याचे अद्याप कोणी खंडण केलेले नाही, असेही ते म्हणाले.

बारस्कर महाराज हा देवेंद्र फडणवीस यांचा माणूस आहे, असा आरोप केला जात आहे. काय संबंध आहे माझा आणि त्यांचा. एक फोटो काल समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यावरून मी फडणवीसांचे समर्थक असल्याचा आरोप केला.

तुम्ही मला फडणवीसांचे पिल्लू म्हणत आहात. यावर बोलताना महाराज म्हणाले, या फोटोतील माझ्या सहकाऱ्यांना विचारा आम्ही त्यांच्याकडे का गेलो होतो. मराठा आरक्षण मागायला 2017 मध्ये आम्ही त्यांची भेट घेतली होती, असे ते म्हणाले.

मंदिरात बसून आरक्षण मिळत नाही....

बारस्कर महाराज या वेळी म्हणाले, आरक्षण काय मंदिरात बसून मिळत नाही. त्यासाठी सरकारपर्यंत यावं लागतं, न्यायालयात जावं लागतं. आज माझा मराठा समाज भावनिक आहे. त्याला भावना आणि बुद्धी याचा मेळ बसत नाही. हा त्याचा दोष नाही कारण या जरांगेंनी समाजापुढे नाटक केले आहे.

उपोषणाच्या चौथ्या दिवशी यांना चालता येत नव्हतं. त्यांना दोन माणसं धरून नेत होती आणि हा माणूस काल 15 माणसांना ऐकेना, हत्तीचं बळ कोठून आले हे. माझ्यावर बलात्काराचे शिंतोडे उडवले, असे काय केले मी, असा सवाल महाराजांनी या वेळी जरांगेंना केला, तर माझ्यावर झालेल्या अत्याचाराच्या आणि पैशाच्या आरोपांचे गावकऱ्यांनी खंडण केलं आहे, त्यामुळे मी त्यांचा आभारी असल्याचे त्यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुम्ही समाजाचा 'करेक्ट कार्यक्रम' केला...

आपली ही लढाई आरक्षणासाठी आहे, की राजकीय टीका करण्यासाठी आहे. लिमिटच्या पुढे गेला की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. हा तुमचा नाही तर समाजाचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे.

काय मिळालं आम्हाला यातून तीस ते चाळीस हजार कुणबी नोंदी आणि त्यातही अडचणी, अशी परिस्थिती आहे. सरकारची इच्छाशक्ती असेल तर ते काम करेल. तुम्ही रागाच्या भरात तमाशा केला आहे, अशी टीका या वेळी बारस्कर महाराजांनी जरांगेंवर केली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT