Khaire, Bhumre or Imtiaz Jalil Sarakarnama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar Constituency : आठ दिवसाला पाणी, पण निवडणूक प्रचारात चर्चा दारूवर...

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : महायुती-महाविकास आघाडी, एमआयएम आणि वंचित आघाडी अशा सर्वच प्रमुख पक्षांचे लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले आहेत. सगळ्यांच्या तोंडी विकासाची भाषा असली तरी प्रचारात मात्र लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न फाट्यावर मारले जात आहेत. महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे व एमआयएमचे इम्तियाज जलील या तीन प्रमुख उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होणार आहे.

या मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार असल्याने आता प्रचाराला वेग आला असला तरी आठ दिवसाला पाणी येणाऱ्या शहरात प्रचार मात्र दारूचा पुरवठा केला जातोय. महायुतीचे उमेदवार व जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या जिल्ह्यात नऊ दारूची दुकाने असल्याचा मुद्दा ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याकडून पुढे केला जातोय, तर त्याला उत्तर देताना भुमरे यांच्याकडूनही विकासाऐवजी खैरेंची उणीदुणी काढण्यात शक्ती खर्च केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये या भरकटलेल्या प्रचार आणि मुद्द्याबद्दल चीड व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे पूर्वी शिवसेनेत एकत्र काम केलेले खैरे-भुमरे यांनी आपल्या 30-35 वर्षांच्या राजकारणात आपापल्या मतदारसंघाचा काय विकास केला? याबद्दल अजूनही मतदार प्रश्न उपस्थितीत करतात. संदीपान भुमरे पैठण विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडणूक लढले, तर त्यापैकी पाच निवडणुका ते जिंकले. या दरम्यान, गेली साडेचार वर्षे ते रोजगार हमी योजना व फलोत्पादन आणि आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

संदिपान भुमरे Sandipan Bhumare यांच्या पैठणमध्ये जायकवाडी धरण असून तिथे लोकांना प्यायला पाणी नाही. ते स्वतः आपल्या भाषणात धरण उशाला कोरड घशाला, असे सांगतात. जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना आणल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अजून थेंबभर पाणी पैठणकरांना मिळू शकलेले नाही.

दुसरीकडे ज्या जायकवाडी धरणाच्या पाण्यावर संभाजीनगर शहर, औद्योगिक वसाहत आणि जिल्ह्यातील शेती अवलंबून आहे, त्या शहरवासीयांना दररोज पाणी देण्यासाठी चंद्रकांत खैरे वीस वर्षे खासदार असल्यापासून विविध योजना आणल्याचे दावे करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पण आजही संभाजीनगरकरांना आठ दिवसांना पाणी मिळते. राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी 2017-18 मध्ये 1680 कोटींची पाणी योजना मंजूर केली. त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने या योजनेला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण पाणी आले नाही. आता पुन्हा शिवसेना- भाजप युतीची सत्ता आहे, या योजनाचा खर्च 1680 कोटीवरून 2700 कोटींच्या घरात गेला.

मात्र, योजनेचे काम अजून निम्मेही झाले नाही. पुर्ण न झालेल्या या पाणी योजनेचे श्रेय घेण्यासाठी मात्र शिवसेना शिंदे गट, भाजप BJP , शिवसेना ठाकरे गट यांच्यासह सगळ्याच पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. महापालिकेत सर्वाधिक काळ सत्ता असलेले आणि विरोधी पक्षात असलेल्यांनी पाण्याच्या प्रश्नाकडे कधी गांभीर्याने पाहिलेच नाही.

त्यामुळे वर्षानुवर्ष केवळ घोषणा आणि आरोप-प्रत्यारोप याचाच खेळ सगळ्या राजकीय पक्षांनी केला. आता पुन्हा लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा शहवासीयांना दररोज पाणी देण्याचे जुने आणि फसवे आश्वासन दिले जात आहे. पाण्यावर चर्चा करण्याऐवजी प्रचारात दारूवर चर्चा करण्यातच खासदार होऊ पाहणारे उमेदवार धन्यता मानत आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT