EX MLA Pradeep Naik News Sarkarnama
मराठवाडा

Nanded Political News : किनवटकरांचे 'भाया' माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन

Former MLA Pradeep Naik passes away : शुक्रवारी ते हैदराबादला गेले होते. आज हैदराबाद वरून चेन्नईला ते जाणार होते, पण त्याआधीच पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Jagdish Pansare

साजीद खान / स्वप्निल भालेराव

किनवट : विधानसभेच्या किनवट मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप हेमसिंग जाधव (नाईक) यांचे आज (ता.1) जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता हैदराबाद स्थित त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. प्रदीप नाईकांच्या पार्थिवावर उद्या ता.2 रोजी किनवट तालुक्यातील दहेली तांडा या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

किनवट विधानसभा मतदारसंघाचे ते 2004 पासून सलग तीन टर्म ते आमदार होते. (NCP) माजी आमदार प्रदीप नाईक यांची प्रकृती बऱ्यापैकी ठणठणीत होती, निवडणुकीत पराभव झाल्या नंतर त्यांनी किनवट आणि माहूर तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या व कार्यकर्त्यांना निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून बाहेर निघा आणि जनतेच्या कामांमध्ये हलगर्जीपणा करू नका, 'जिवंत राहिलो तर पुन्हा लढूत'असा धीर दिला होता.

शुक्रवारी ते हैदराबादला गेले होते. आज हैदराबाद वरून चेन्नईला ते जाणार होते, पण त्याआधीच पहाटे झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Nanded) या घटनेमुळे किनवट माहूर तालुक्यातील बंजारा समाजासोबतच इतर अठरा पगड जातींचे नेतृत्व म्हणून परिचित असलेल्या प्रदीप नाईक उर्फ 'भाया' यांच्या निधनाने शोककळा पसरली. संयमी, शांत व्यक्तिमत्व व दुरदृष्टीचा नेता हरवल्याची भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

प्रदीप नाईक यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मराठवाड्यातील नेतृत्व हरपल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. नाईक यांच्या निधनाची बातमी समजताच खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नांदेडचे खासदार अशोक चव्हाण, किनवटचे आमदार भीमराव केराम, रोहित पवार यांच्यासह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व इतर पक्षाच्या नेते व लोकप्रतिनिधींनी शोक व्यक्त केला आहे.

राजकीय प्रवास..

माहूर तालुक्यातील समस्त बंजारा समाजासोबत इतरही अठरापगड जातींना सोबत घेवून प्रदीप नाईक यांनी 1999 मध्ये किनवट विधानसभा मतदार संघातून पहिली निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांना अपेक्षीत यश मिळाले नाही. परंतु, पराभवामुळे खचून न जाता त्यांनी नव्या उमेदीने कामाला सुरुवात केली. पुढे त्यांना शरद पवार यांनी विमुक्त जाती, भटक्या जमाती आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केले. दांडगा जनसंपर्क आणि लोकांच्या मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले.

2004 मध्ये दुसऱ्यांदा किनवट -माहूर विधानसभेची निवडूक त्यांनी लढवली. यावेळी मात्र त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्यानंतर त्यांनी 2004- 2019 सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. मतदार संघात रस्त्यांची प्रचंड समस्या होती. मतदार संघात आरोग्य उप केंद्रांना इमारती नव्हत्या. किनवट तालुक्याला वळसा घालून वाहणारी पैनगंगा नदी तालुक्याला लाभली असली तरी किनवट माहूर या दोन्ही तालुक्यात उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या होती. रब्बी आणि उन्हाळी हंगामात पिके घेणे शेतकऱ्यांना कठीण झाले होते.

मतदारसंघातील जवळपास 50 गावांना वळसा घालून जाणाऱ्या पैनगंगा नदीचे पाणी आडवून मतदारसंघातील सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून प्रदीप नाईक यांनी बारा प्रकल्प हाती घेतले. त्यात पैनगंगा नदीवर चार उच्च पातळी बंधाऱ्यांचा समावेश होता. त्यातील नऊ प्रकल्प पूर्ण केले. त्यामुळे किनवट- माहूर तालुक्यातील अनेक गावांची पाणी पातळी वाढली आणि गांवे टंचाई मुक्त झाली. रब्बी, उन्हाळी हंगामात पीक घेणे शेतकऱ्यांना सोयीचे झाले. तसेच 15 ते 20 टक्के सिंचन क्षेत्रात वाढ झाली.

2008 मध्ये त्यांनी लक्कडकोट, शेख फरीद वझरा येथे साठवण तलाव मंजूर करुन घेतले व ते पूर्ण केले. 2010 मध्ये निराळा साठवण तलाव व मोहपूर येथे पैनगंगा नदीवर उच्च पातळी बंधारे बांधले. 2011 मध्ये सिंदगी साठवण तलाव, पैनगंगा नदीवर दिगडीवल (कुत्तेमार) येथे उच्च पातळी बंधारा, उनकेश्वर, मारेगाव (खा) व किनवट येथे उच्च पातळी बंधाऱ्यांची मंजुरी मिळवून घेतली होती. परंतु पैनगंगा अभयारण्य क्षेत्र ही सबब पुढे करून किनवट व मारेगाव प्रकल्प थांबवण्यात आला.

उनकेश्वरला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली नाही म्हणून हे प्रकल्प रेंगाळले होते. 2015 मध्ये पैनगंगा नदीवर साकुर या उच्च पातळी बंधाऱ्याला मंजुरी मिळाली होती. येंदापेंदा येथेही उच्च पातळी बंधाऱ्यांची मंजुरी मिळून काम झाले. मानिरामथड हाही प्रकल्प प्रदीप नाईक यांच्या आमदारकीच्या काळात झाला. छोटे मोठे सर्वच प्रकल्प केले आणि पैनगंगा नदी बारमाही जिवंत ठेवली. दिगडी उच्च पातळी बंधाऱ्यामुळे वडसा, पडसा या गावातील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली. उजाड रान दिसणाऱ्या दोन्ही तालुक्यात हिरवेगार रान झाले.

प्रदीप नाईक यांच्या प्रयत्नाने अंत्यत सामान्य कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, बांधकाम सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक पदावर संधी मिळाली. तालुक्यातील दहेती तांडा येथील नाईक घराण्यातील प्रदीप हेमसिंग नाईक (जाधव) हे बारावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर व्यवसायाकडे वळले. त्यांनी आदिलाबाद (तेलंगाणा) येथे कापूस व्यवसायात चांगलाच जम बसवला होता. त्यानंतर दहेली तांडा येथील शेतीत पपईची लागवड करून भरघोष उत्त्पन्न मिळविले होते. त्यावेळी पपईवाले भाया म्हणून सर्वत्र त्यांची ओळख झाली होती. नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये व्याच्या पदरी अपयश आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT