Girish Mahajan Sarkarnama
मराठवाडा

Girish Mahajan News : जालन्यातील लाठीचार्जमुळे अडचणीत आलेल्या सरकारच्या मदतीला धावले पुन्हा 'संकटमोचक' गिरीश महाजन !

Deepak Kulkarni

Jalna : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. या लाठीचार्जनंतर आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक करतानाच वाहनांची जाळपोळ केली. या लाठीचार्जचे तीव्र पडसाद आजदेखील राज्यभरात उमटत आहे.

मुंबईसह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगरसह अनेक ठिकाणी सकल मराठा समाजाकडून आंदोलन सुरू आहे. विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरत शिंदे - फडणवीस - पवार सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याचवेळी अडचणीत आलेल्या महायुती सरकारच्या मदतीला पुन्हा एकदा 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन धावून आले आहे.

भाजप नेते गिरीश महाजन(Girish Mahajan) संकटकाळात नेहमीच धावून आल्याचे यापूर्वी देखील दिसून आले आहे. अगदी राज्यातील भाजप सरकारवर संकट आले तरीही त्यांना वाचविण्यासाठी ते धावून आले आहेत. याशिवाय जनतेच्या मदतीसाठी वेळोवेळी ते धावून गेल्याचे चित्र दिसून आले आहे. ते रविवारी सायंकाळी आंदोलनस्थळी भेट देणार असून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार आहे. तसेच यावेळी ते सरकारचा प्रस्ताव मांडणार आंदोलनकर्त्यांसमोर ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन सत्ताधारी - विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यासह खासदार उदयनराजे, माजी खासदार संभाजीराजे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत सरकारवर आगपाखड केली होती. यामुळे दिवसागणिक चिघळत चाललेल्या या आंदोलनामुळे सरकार चांगलेच अडचणीत आल्याची चर्चा आहे. (Jalna Maratha Protest)

तसेच विरोधकांकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे. यावेळी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदेंच्याही जवळचे मंत्री गिरीश महाजन आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेणार आहे. हे आंदोलन मागे घेण्यासाठी आंदोलनकर्त्यांना चर्चा करणार आहे. यावेळी ते सरकारचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Jalna Maratha Protest)

आत्तापर्यंतची महाजनांची मध्यस्थी यशस्वी...

भाजप आणि मित्र पक्षाचे युतीच्या सरकारच्या काळातही त्यांनी अनेक प्रसंगी मध्यस्थी केली आहे. नाशिकहून निघालेल्या शेतकरी मोर्चाला तेच सामोरे गेले होते, अगदी मोर्चेकरांसोबत ते चालले आणि नेत्यांशी चर्चा करून त्यांनी प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वेळीही त्यांनी सरकार व मोर्चेकऱ्यांमध्ये मध्यस्थी केली. तर कृष्णा नदीला आलेल्या पुरात स्वत: पोहोत जावून त्यांनी काही जणांना बाहेर काढले होते. त्यामुळे त्यावेळी त्यांना सरकारचे ‘संकटमोचक’असेही म्हटले जात होते.

गिरीश महाजन यांनी राज्य सरकारच नव्हे केंद्रांतील भाजप सरकारच्या मदतीसाठी धावून गेले होते, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजप सरकारविरूध्द आंदोलनाची घोषणा केल्यावर त्यांनी मध्यस्थी करून प्रश्न सोडविला होता.

जालन्यात नेमकं काय घडलं..?

गेल्या चार दिवसापासून म्हणजे २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० कार्यकर्ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले होते. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते आंदोलनस्थळी उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली होती.

त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने वादावादी झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT