Governor Haribhau Bagde Birthday News Sarkarnama
मराठवाडा

Haribhau Bagde Birthday News : वारकऱ्यांच्या पंगतीत शोभणारा नेता म्हणजे 'हरिभाऊ बागडे' त्यांचा शताब्दी सोहळा पाहण्याचे भाग्य लाभो!

Haribhau Bagde’s Sahasra Chandra Darshan was celebrated, where saints expressed their wish : गरीब-श्रीमंताच्या लग्नात माझे वडील त्या लग्न घरात असायचे. सगळी स्वयंपाकाची भांडी घासूनच परत यायचे. लोकांना आवडेल असे काम आपल्या हातून घडावे हा त्या मागचा हेतू होता, असे बागडे म्हणाले.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्यात उपस्थित साधू-संतांनी त्यांचा शताब्दी सोहळा साजरा व्हावा, अशी इच्छा व्यक्त करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तुम्ही उपराष्ट्रपती व्हा, अशाही सदिच्छा काही संतानी व्यक्त केल्या. वारकऱ्यांच्या पंगतीत शोभणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे 'नाना' असे म्हणत त्यांच्यावर उपस्थितांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. तर या सत्काराला उत्तर देताना 'आयुष्यात आपण कधी खोटं बोललो नाही, यापुढेही बोलणार नाही. आपल्या हातून काही चुकीचे घडू नये, याचा विचार कायम माझ्या मनात असेल, अशा भावना बागडे यांनी व्यक्त केल्या.

माजी मंत्री, विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते विद्यमान राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी 80 व्या वर्षात पदार्पण केले. त्यानमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या सहस्त्र चंद्र दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात साधू-संत आणि वारकरी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेकांनी हरिभाऊ बागडे यांच्या राजकारण आणि अध्यात्माची त्यांनी घातलेली सांगड यावर भरभरून भाष्य केले. त्यांचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याची संधी मिळो, अशा सदिच्छाही व्यक्त केल्या गेल्या. या सत्काराला उत्तर देतांना हरिभाऊ बागडे यांनी आतापर्यंतच्या राजकीय जीवनाबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला.

सगळ्या महाराजांनी, संतांनी जो आशीर्वाद दिला, त्याची शिदोरी मला पुढच्या आयुष्यासाठी उपयोगी पडेल. तहान-लाडू-भूख लाडूच्या विचारांची ही शिदोरी आहे. कृतीतून माणूस पुढे जात असतो, त्याला लोकांच सहकार्य मिळत असतं. हा नैसर्गिक नियम आहे. (Governor) ज्याला चागलं वागता आलं, त्याच्याभोवती माणसं निश्चित राहतात. 80 वर्ष होणार होते, म्हणून मी दीड वर्षाआधीच विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, हे स्पष्ट सांगितलं. मी पुढची सालदारकी करणार नाही, असं सांगितलं होतं. त्याचा अर्थ लोकांना समजला, कुठे थांबाव हे कळालं पाहिजे, असे सांगत बागडे यांनी आपण शेती, शैक्षणिक संस्था, दूध संघाचे काम करणार होते, असे सांगितले.

शाळा सोडल्यानंतर शेती करावी हा डोक्यात विचार होता. पन्नास एकर जमीन आमच्या काकाकडे होती. शेतीत कामंही केले. एकदा पाहुणे पहायला आले, तेव्हा मी शेतात नांगर धरत होतो. त्यांना वाटलं हे पोरगं असंच राहणार, हे शेतातच राहणार, मग त्यांनी काही मला मुलगी दिली नाही, अशी आठवण त्यांनी सांगितली. आमच्या घरात आजोबा शंभर वर्ष जगले. ते धान्य पेढी चालवायचे. आषाढ महिन्यात लोकांना खायला लागयाचं. दीडीने ते धान्य द्याचे, अन खळ्यावर वसूल करायचे. घरात कोणी शिकलेले नव्हते. माझे वडील गावात लग्न असलं की स्वयंपाकाच्या कामाला जायचे. गरीब-श्रीमंताच्या लग्नात माझे वडील त्या लग्न घरात असायचे. लग्न झाल्यानंतर सगळी स्वयंपाकाची भांडी घासूनच परत यायचे. लोकांना आवडेल असे काम आपल्या हातून घडावे हा त्या मागचा हेतू होता, असे बागडे म्हणाले.

वडील, आजोबांनी अंगी बाळगलेला मदतीचा विचार आजही कायम आहे. प्रमोद महाजन नेहमी म्हणायचे खरं बोलून आपल्याला साधू-संत व्हायचं नाही. पण खरं बोललं तर ध्यानात ठेवावं लागत नाही, . मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही. वैयक्तिक कधी मी कोणाला त्रास दिला नाही, असेही बागडे यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधी यांचे शिष्य विनोबाजी भावे यांचा आपल्यावर प्रभाव असल्याचे सांगताना जन्म, मृत्यू आणि जीवन हे तीन कागदावर लिहलेले असते. यावरच आपले भवितव्य अवलंबून असते. जीवनाच्या या पानावर चांगल लिहलं जावं, हाच प्रयत्न सातत्याने केला. वाईट लिहलं जाऊ नये, याची काळजी घेतली. तोच विचार मनात ठेवला, म्हणून आपल्या हातून चूकीचं काही घडलं नाही. प्रत्येकाने याची काळजी घेतली पाहिजे. तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो, असेही बागडे यांनी सांगितले.

मंत्री असताना रेशनच्या दुकानाची प्रकरणात आपण जागेवर चूक, बरोबर सांगायचो आणि तोंडावर निकाल लावायचो. वशिला, फोन, भेटायला येऊ का? या भानगडीच ठेवल्या नाही. ज्याला निकाल पटले नाही, त्याला हायकोर्टात जा, सगळे कागदं देतो, असंच मी त्यांना सांगायचो. वकील, पक्षकार, अधिकाऱ्यांसमोर निकाल द्यायचो, याची आठवण त्यांनी सांगितली. रोजगार हमी योजना खात्याकडे 'रोजगार हमी अर्ध तुम्ही अर्ध आम्ही' असं याबद्दल बोललं जायचं. पण मी आमदार असताना या योजनेतून सहाशे पाझर तलावं केले. अण्णा हजारेंना मंत्रालयात बैठकीला बोलावून काय बदल केले पाहिजे? हे विचारले. शेतकऱ्यांच्या हिताची योजना असल्याने मी त्यांना आग्रह केला. आधीची रोजगार हमी खूप चांगली होती, आताची नाही. स्वच्छ आणि निर्मळ राहता येईल, असा प्रयत्न मी केल्याचे बागडे म्हणाले.

मोदींचा फोन..

राजस्थानच्या राज्यपाल पदी कशी नियुक्ती झाली, याचा किस्साही हरिभाऊ बागडे यांनी उपस्थितांना सांगितला. 'मै आपको महाराष्ट्र के बाहर लेके जाने वाला हू, किसिको बता ना नही, मै सबको बताऊंगा' असा फोन मला मोदींजीचा आला. त्यानंतर रात्री दोन वाजता मला झोपेतून उठवून तुम्हाला राज्यस्थानचे राज्यपाल केल्याचे सांगितले गेले, असे बागडे यांनी सांगितले. जी संधी मिळाली त्याचं सोनं केलं. परमेश्वराला एकच विनंती आपल्या सगळ्यांच सहस्त्र दर्शन व्हावं हीच माझी सदिच्छा, असल्याचे सांगत बागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT