Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Nanded Congress News : अशोक चव्हाण भाजपचा दावा खोटा ठरवणार की...?

Laxmikant Mule

Nanded Congress News :

राज्यात 15 दिवसांत राजकीय भूंकप होणार, असा दावा भाजपच्या नेत्यांनी अलिकडेच केला होता. त्यानंतर काँग्रेसनेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत विलीन झाले. त्यामुळे आता अशोक चव्हाणांचे काय होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

काही नेत्यांना थेट भाजपमध्ये आणण्यात अडचणी आहेत. मिलिंद देवरांचे (Milind Deora) उदाहरण समोर ठेवून त्यांनी शिवसेना (ShivSena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा पर्याय स्वीकारावा, असे पर्याय सुचवले जात असल्याची चर्चा आता होत आहे. राजकीय भूंकप होण्याचा हा पहिला अंक असून दुसरा भूंकप केव्हा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिलिंद देवरा यांच्या शिवसेनाप्रवेशानंतर राज्यात पक्षांतराचे वारे पुन्हा वाहू लागले आहे. यात भाजपकडून दावा केला जाणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. देवरा यांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील काही काँग्रेस (Congress) नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून त्यात अशोक चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. खासदार प्रतापराव पाटील-चिखलीकर यांनी वर्षाच्या शेवटी अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात (BJP) येतील, असा दावा केला होता.

अशोक चव्हाण यांनी चिखलीकरांचा दावा तसेच यापूर्वीही झालेल्या भाजपप्रवेशाच्या चर्चा अनेकदा खोडून काढल्या. असे असले तरी भाजपाचे पदाधिकारी अशोक चव्हाण हे भाजपात येणार असल्याचे सातत्याने सांगत आहेत.

अशोक चव्हाण हे काँग्रेसचे, तसेच राज्यातील महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आहेत. दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले चव्हाण हे मराठवाडा, महाराष्ट्रातील मोठे नेते आणि मराठा चेहरा म्हणून ओळखले जातात. पक्षात तसेच दिल्लीदरबारीही त्यांचे मोठे वजन आहे. ते भाजपच्या गळाला लागले तर महाराष्ट्रात पक्षाची ताकद कितीतरीपटीने वाढणार आहे.

काँग्रेससाठीही चव्हाण तितकेच महत्त्वाचे असल्याने राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांचे त्यांच्याकडे विशेष लक्ष आहे. पहिल्या टप्प्यात काढण्यात आलेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या यशस्वी करण्यासाठी चव्हाणांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादीसारखे पक्ष फुटले, पण काँग्रेस मिलिंद देवरा यांचा अपवाद वगळला तर राज्यात सध्या तरी अभेद्य आहे.

विदर्भात काँग्रेस आमदार आशिष देशमुख यांनीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर तोफ डागत काही आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट नुकताच केला.

या पार्श्वभूमीवर ज्या अशोक चव्हाणांसाठी भाजप जाळे टाकून आहे, ते काय निर्णय घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. चव्हाण यांचा मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात चांगला जनसंपर्क आहे. नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या चार लोकसभा मतदारसंघांचे केंद्र नांदेड आहे. त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला तर या चार जागांच्या विजयाचे गणित बदलू शकते.

अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेशाच्या वावड्या नेहमीच उठवल्या गेल्या आणि त्यांनी वारंवार खोट्या ठरवल्या आहेत. उलट पक्षाने त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या व‌ त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इतर पक्षांतील अनेक बेडे नेते भाजपाचा दुपट्टा घालवण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांच्या नांदेड दौऱ्यात सांगत अशोक चव्हाणांबद्दल पुन्हा संशयाचे जाळे निर्माण केले होते. तेव्हा अशोक चव्हाण यांच्या भाजपप्रवेश, पक्षांतराच्या‌ चर्चा म्हणजे केवळ वावड्याच ठरतात की त्यात काही तथ्यही आहे, हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT