जालना : मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड आणि त्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता वेध लागले आहे ते मंत्रीमंडळ विस्ताराचे. 132 जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपच्या वाट्याला सर्वाधिक मंत्रीपद येणार असली तरी निवडून आलेल्या आमदारांची संख्या पाहती ती अपुरी पडणार आहेत. अशावेळी आधी मंत्री राहिलेल्या आणि नव्याने इच्छूक असलेल्यांना बऱ्याच प्रमाणात चाळणी लावली जाणार आहे.
जालना जिल्ह्यात महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेकडून माजी मंत्री अर्जून खोतकर यांना पुन्हा संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. भाजपकडून माजी मंत्री (Babanrao Lonikar) बबनराव लोणीकर यांनाच पुन्हा मंत्री केले जाणार? की मग विजयाची हॅट्रीक करणाऱ्या भोकरदनचे आमदार संतोष दानवे या नव्या चेहऱ्याला फडणवीस संधी देणार? याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांची ही दुसरी टर्म आहे, फुलंब्रीच्या अनुराधा चव्हाण या पहिल्यांदा निवडून आल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्रीपदासाठी संतोष दानवे आणि बबनराव लोणीकर यांच्यात स्पर्धा असणार असे दिसते.
माजी मंत्री बबनराव लोणीकर हे परतूर मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले आहेत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जालन्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. लोणीकर यांचा राजकीय व मंत्री पदाचा अनुभव पाहता त्यांचे पारडे सध्या तरी जड वाटते आहे. मात्र लोणीकर यांच्या नावाला जिल्ह्यातून विरोध होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. जालना जिल्ह्याच्या राजकारणात माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे.
जिल्ह्यात या दोघांचे स्वतंत्र संघटन आणि यंत्रणा काम करतात, हे काही लपून राहिलेले नाही. लोकसभेच्या जालना मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यांची केंद्रात कॅबिनेट मंत्री होण्याची संधी हुकली. परंतु भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातून संतोष दानवे सलग तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. शिवाय राज्यात महायुती 236 जागा जिंकत मोठ्या बहुमताने सत्तेवर आली आहे.
रावसाहेब दानवे हे या विधानसभा निवडणुकीचे मुख्य संयोजक होते, त्यामुळे या यशात त्यांचाही वाटा आहे. अशावेळी मुलाला मंत्री करण्याची संधी दानवे सोडणार नाहीत. रावसाहेब दानवे यांच्या शब्दाला केंद्रात आणि राज्यातील नेतृत्वाकडेही मान आहे. हे पाहता तीन वेळा विजय मिळवलेल्या संतोष दानवे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे, असे प्रयत्न त्यांच्याकडून निश्चित केले जातील. दुसरीकडे बबनराव लोणीकर यांनी यापुर्वीच आपला अनुभव आणि विजयातील सातत्य या जोरावर मला मंत्रीपद मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
संतोष दानवे की बबनराव लोणीकर? हा पेच फडणवीस कसा सोडवतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यावर तोडगा निघाला नाही, तर ऐनवेळी फुलंब्री मतदारसंघातून पहिल्यादांच निवडून आलेल्या अनुराधा चव्हाण यांची लाॅटरी लागू शकते, अशीही चर्चा आहे. लोणीकरांनाच मंत्रीपद दिले जाणार असेल, तर दानवे अनुराधा चव्हाण यांच्यासाठी आपले वजन वापरू शकतात? शिवाय राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे हे देखील त्यांच्यासाठी शब्द टाकू शकतात? असे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.