Manoj Jarange Maratha Reservation  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil On Maratha Reservation : 'जातीतल्याच लोकांना गरीब मराठ्यांचं चांगलं झालेलं बघवत नाही, मनोज जरांगेंनी सुनावले...

Roshan More

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने 'सगेसोयरे' शब्दावर अधिसूचना काढली. हे आंदोलनाचे यश असल्याचे मानत मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र, सोशल मीडियावर सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे, या स्वरुपाची प्रतिक्रिया उमटत होती. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या मराठा बांधवांना सुनावले आहे. (Manoj Jarange Patil On Maratha Reservation )

'गरीब मराठे पुढे जात असल्याचे यांना पाहवत नाही. दुसऱ्यांना उत्तर देण्यास मी सक्षम आहे. पण आपल्याच जातीतील काही जण सोशल मीडियावर टाकतात की सरकारनं फसवलं. हे वरच्या पट्टीतले आहेत. गरीब मराठ्यांचं चांगलं झालेलं यांना पाहवत नाही. ते गोरगरीब मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत', या शब्दांत मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुनावले. विरोधात बोलणारे हे सत्ताधारी आणि विरोधीपक्षातील कार्यकर्ते आहेत. सोशल मीडियावर बोलणारे गप्प बसले नाहीत तर या कार्यकर्त्यांच्या मागे कोण नेते आहेत ते दोन दिवसांत जाहीर करू, असे आव्हान जरांगे यांनी दिले.

माझ्या मागे शरद पवार (Sharad Pawar) असल्याचा सुरुवातील आरोप करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे असल्याचे सांगितले गेले. पण मी कुणालाच मॅनेज होत नाही, हेच आरोप करणाऱ्यांचे दुःख आहे. मराठा म्हणून समाजासाठी लढणार. बाकीच्यांचे मला काही देणं घेणं नाही, या शब्दांत आरोप करणाऱ्यांवर जरांगे यांनी हल्ला चढवला. मी मराठा म्हणून मराठांच्या आरक्षणाविषयी बोलतोय. सत्ताधारी विरोधक यांच्यात श्रेयावरून नाराजी आहे, असे देखील जरांगे म्हणाले.

10 फेब्रुवारीपासून उपोषण

काही जण सुपारी घेऊन बोलत आहेत. श्रेयासाठी यांच्या पोटात दुखत आहेत. मराठा समाजाचे काही जळणारे नेते आहेत. त्यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही. सरकारने काढलेल्या अध्यादेशाला अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी मी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण सुरू करणार आहे. शरीर आता साथ देत नाही.या आंदोलनात काय होईल हे मला माहित नाही त्यामुळे रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले. मात्र मी हटणार नाही. जे मराठा समाजाचे बांधव सोशल मीडियावर विरोध करत आहेत. त्यांनी 10 तारखेला यावे आणि कसा कायदा करावे, हे सांगवे असे आव्हान जरांगे पाटील म्हणाले.

तब्बल 54 लाख नोंदी मिळाल्या

जे 75 वर्षांमध्ये झाले नाही ते या आंदोलनामुळे झाले. मराठ्यांच्या 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यातील 37 लाख प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. शिंदे समितीला मुदत वाढ मिळाली. अधिसूचना निघाली आहे. तिचे कायद्यात रुपांतर होत आहे. सगेसोयरे वरील अधिसूचनेमुळे ज्या मराठ्यांच्या नोंदी मिळत नव्हत्या त्यांना देखील आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. आंदोलनामुळे मराठा समाज एकत्र आला, असे फायदेच मनोज जरांगे यांनी आपल्या आंदोलनाच्या मोजून दाखवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT