छत्रपती संभाजीनगर : तीन टर्म मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी नुकतीच गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली. महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे असल्याने सतीश चव्हाण यांनी उमेदवारीसाठी थेट पक्षाशीच पंगा घेतला होता. मराठा आरक्षण व राज्यातील इतर विषय सोडवण्यात महायुतीला अपयश आल्याचा आरोप करत सतीश चव्हाण यांनी महायुतीला घरचा आहेर दिल होता.
याची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी तडकाफडकी सतीश चव्हाण यांच्यावर कारवाई करत त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले. हे अपेक्षित असल्याने सतीश चव्हाण यांनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश आणि गंगापूरमधुन विधानसभेची उमेदवारी निश्चित करून घेतली होती. पक्षातून निलंबनाच्या कारवाईचा सोपस्कार पार पडल्यानंतर सतीश चव्हाण यांनी मोठ्या साहेबांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली.
गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या विषयाचा फायदा उचलत भाजपच्या प्रशांत बंब यांना पराभूत करण्याच्या उद्देशाने दोन्ही राष्ट्रवीदाने मिळून केलेली ही खेळी अखेर फसली. अगदी शरद पवार यांनी सतीश चव्हाण यांच्यासाठी गंगापूर मध्ये येऊन जाहीर सभा घेत थेट प्रशांत बंब यांच्यावर हल्ला चढवला होता. बंब यांच्या जाहीर सभांमधून पंधरा वर्षात काय केले? असा जाब ठिकठिकाणी विचारला गेला.
बंब यांचा यंदा करेक्ट कार्यक्रम होणार, असे वातावरण मतदारसंघात तयार झाले होते. पण सलग तीन निवडणुका जिंकण्याचा अनुभव बंब यांच्या गाठीशी असल्याने त्यांनी सतीश चव्हाण आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे मनसुबे उधळून लावले. प्रशांत बंब यांनी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सतीश चव्हाण यांचे सगळे डावपेच उलटवून लावले आणि सलग चौथा विजय मिळवत आपले मतदारसंघावरील वर्चस्व दाखवून दिले.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा दोन वर्षाचा कालवधी शिल्लक असतांना मुळात सतीश चव्हाण यांनी गंगापूरमधुन विधानसभा निवडणुक लढण्याची नसती उठाठेव का केली? असा प्रश्न त्यांच्या पराभवानंतर अनेकांना पडला. विधानसभा निवडणुक लढवण्याचा डाव उलटल्यानंतर आणि निकालात राज्यात महायुती दोनशे पार जागा जिंकून निवडून आल्यामुळे आता पुढे काय? असा प्रश्न सतीश चव्हाण यांच्यासमोर होता.
त्यामुळे सतीश चव्हाण आता पुन्हा अजित पवारांकडे परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. अर्थात सहा वर्षाच्या निलंबनाची कारवाई त्यासाठी तात्काळ मागे घेतली जाऊ शकते. सतीश चव्हाण यांनीही आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सतीश चव्हाण यांच्यावर सहा वर्षासाठी केलेली निलंबनाची कारवाई त्यांना दोन महिन्यात परत घेण्याची वेळ येते की काय? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.